Aditya Thackeray Tendernama
मुंबई

कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी नव्याने 6 हजार कोटींची टेंडर; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई पालिकेतील सहा हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर याच रस्ते कामांची किंमत 900 कोटींनी कमी झाली. असे असताना कॉंट्रक्टर मित्रांना पुन्हा काम देण्यासाठी कोट्यवधींची 'आगाऊ रक्कम' देण्याचे कारस्थान सुरू आहे, असा हल्लाबोल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला. तसेच निवडणुका तोंडावर आल्यामुळे मागच्या वर्षीची कामे झाली नसताना कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी आता नव्याने सहा हजार कोटींची टेंडर प्रक्रिया राबवली जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यातून शिंदे सरकारला किती खोके मिळणार, असा सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्राची लूट करणाऱ्या शिंदे-भाजप सरकारकडून कंत्राटदारांच्या फायद्यासाठी काम सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. वांद्रे-वर्सोवा लिंक रोडच्या कामाची किंमत पावणे सात हजार कोटींनी वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हा प्रकार कंत्राटदार मित्रांच्या भल्यासाठी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या रस्ते कामातील एकही काम झाले नसल्याचे ते म्हणाले. 2021-22 मध्ये एकही टेंडर मिळाले नाही. त्यामुळे एकही रस्ता काम झाले नाही. यानंतर ऑगस्ट, नोव्हेंबरमध्ये टेंडर निघाले, पण सरकारच्या काँट्रक्टर मित्राला ते आवडले नाही, म्हणून नव्याने टेंडर काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

महापालिकेत आपण 6080 कोटींचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर 2023 मध्ये कंत्राटदाराने काम सोडले. त्यांना दंड केला, ब्लॅकलिस्ट केले हे अजून स्पष्ट केले नाही. त्या पाच कंत्राटदारांवर कोणती कारवाई केली, दंड अजून घेतला नसेल तर का नाही घेतला याची माहिती प्रसारमाध्यमे किंवा आपल्याला का देत नाही, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. याआधी ब्लॅकलिस्ट केलेली कंपनी पुन्हा काम करण्यासाठी येते. त्यामुळे ही ब्लॅकलिस्ट सिरीयसली घ्यायची का, असा सवालही त्यांनी केला. तसेच घटनाबाह्य राज्य सरकार आणि महापालिकेने लक्षात ठेवावे की आमचे सरकार आल्यावर मुंबईला लूटणारे लाडके कंत्राटदार आणि भ्रष्ट मंत्री, अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकणार, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.

केंद्राच्या अखत्यारीमधील नॅशनल हायवे अॅथोरिटीला मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गाची दुर्दशा दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला. कोस्टल रोडवरही हाजीअली येथे रस्ता उखडला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर अपघात वाढले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. रस्ते कामाबाबत भाजपकडूनही टीका केली जाते, मग भाजप शिंदे सरकारचा पाठिंबा का काढून घेत नाही, असा सवालही त्यांनी केला.