Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar Tendernama
मुंबई

शिंदे सरकारवर आणखी एक आरोप; महाराष्ट्रात प्रस्तावित ‘तो’ 50 हजार कोटींचा प्रकल्प मध्य प्रदेशात

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे अनेक प्रकल्प यापूर्वीच परराज्यात गेले असताना आता अजून एक प्रकल्प परराज्यात गेल्याचा जाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारला विचारला आहे. तसेच राज्यात येणारी गुंतवणूक कमी होत असल्यामुळे राज्य अधोगतीला जाते की काय अशी शंका व्यक्त करत राज्याची प्रगती, तरुणांचा रोजगार दुसऱ्याच्या घशात घालण्याबाबत दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत अशी माहिती की, राज्यातील छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे गेल इंडिया ही पेट्रोकेमिकल्स कंपनी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. या गुंतवणुकीच्या माध्यमातून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्यप्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राचा वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला? याचे उत्तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी द्यावे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

संबंधित कंपनीने प्रकल्प उभारणीच्या जागेसाठी विचारणा केली होती का? विचार केला होता तर त्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प का नाकारला? सरकारी कंपनी असल्याने मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का? याची उत्तरे सरकारने द्यावी, असे दानवे यांनी म्हटले. महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक केंद्राच्या दबावामुळे सतत परराज्यात जात आहे. एकप्रकारे प्रधानमंत्री हे महाराष्ट्रावर बेगडी प्रेम दाखवत आहेत. राज्यातील तरुणांच्या हाताला मिळणारा रोजगार हिसकावून दुसऱ्याच्या घशात घालण्याचे पाप भाजप करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.