Samruddhi Mahamarg Tendernama
मुंबई

Samruddhi Mahamarg News : विस्तारित 'समृद्धी'च्या कामासाठी बड्या कंपन्यांत स्पर्धा; तब्बल 46 टेंडर्स दाखल

टेंडरनामा ब्युरो

Mumbai Nagpur Samruddhi Expressway News मुंबई : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा (Mumbai Nagpur Samruddhi Expressway) चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विस्तारासाठी नियोजित तीन महामार्गांच्या टेंडरला (Tender) बांधकाम कंपन्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) ४६ टेंडर (Tender) सादर झाली आहेत. आठवड्याभरातच कमर्शियल टेंडर खुली केली जाणार आहेत. तसेच लवकरच या विस्तारित प्रकल्पासाठी कंत्राटदारांची (Contractor) नियुक्ती केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, हा महामार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे.

राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांना थेट मुंबईशी जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना थेट मुंबईपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टेंडर मागवली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 46 टेंडर दाखल झाली असून, एमएसआरडीसीने या महामार्गासाठी टेक्निकल टेंडर खुली केली आहेत.

समृद्धीचा तीन महामार्गाच्या माध्यमातून विस्तार केला जाणार आहे. यात नागपूर-चंद्रपूर महामार्गासाठी २२ टेंडर प्राप्त झाली आहेत. नागपूर-चंद्रपूर हा १९४ किलोमीटरचा महामार्ग सहा टप्प्यात तयार केला जाणार आहे. या महामार्गाच्या विविध टप्प्यांसाठी अॅफकॉन इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, एनसीसी, माँटेकार्लो, गवार कन्स्ट्रक्शन, एचजी इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, पटेल इन्फ्रा, बीएससीपीएल इन्फ्रा या कंपन्यांनी टेंडर सादर केली आहेत.

समुद्धीच्या विस्तारात नागपूर, गोंदिया या १६२ किलोमीटरच्या महामार्गाची उभारणी केली जाणार आहे. हा महामार्ग चार टप्प्यात तयार केला जाणार असून, यात अॅफकॉन इन्फ्रा, जी. आर. इन्फ्रा, माँटेकार्लो, एनसीसी, अँपको इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, ओरिएंटल स्ट्रक्चरल इजिनिअरींग अशा कंपन्यांनी टेंडर सादर केली आहेत.

समृद्धी महामार्गाला भंडारा गडचिरोलीपर्यंत महामार्गाच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. हा महामार्ग १४२ किलोमीटर इतका लांबीचा आहे. यासाठी गवार कन्स्ट्रक्शन, जी.आर इन्फ्रा, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स, पटेल इन्फ्रा या कंपन्यांनी टेंडर सादर केली आहेत. तांत्रिक टेंडरमध्ये कंपन्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता समृद्धीच्या विस्ताराचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्ताराने विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील विकासाला चालना मिळणार आहे.

समृद्धी महामार्गाचे काम 95 टक्के पूर्ण झाले असून हा महामार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. महामार्गावरील इगतपुरी या शेवटच्या टप्प्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. कसारा येथील उड्डाणपुलाचे काम वगळता उर्वरित काम जुलै अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऑगस्टपासून शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

कसारा येथील उड्डाणपुलाची एकच बाजू ऑगस्टपर्यंत तर दुसरी बाजू डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. यानंतर डिसेंबरपर्यंत वाहतूक सेवा थांबवता येणार नाही. त्यामुळे पुलाजी दुसरी बाजू ऑगस्टपर्यंत सेवेत दाखल होणार आहे. त्याचबाजूने दुसरी वाहतूक सुरू करून हा टप्पा खुला करता येऊ शकतो. त्यामुळे समृद्धी महामार्ग ऑगस्टपर्यंत खुला झाला तर मुंबई ते नागपूर अंतर 8 तासांत पूर्ण करता येणार आहे.