Raj Thackeray Tendernama
मुंबई

Narendra Modi Raj Thackeray : मुंबई-गोवा हायवे 12 वर्षांत का पूर्ण होऊ शकला नाही? राज ठाकरेंनी कोणावर साधला निशाणा?

टेंडरनामा ब्युरो

Mumbai News मुंबई : गेल्या 12 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) बनवण्याचे काम सुरू आहे, मात्र तो अद्याप तयार झालेला नाही. त्याचे काम अपूर्णच आहे, अशी विचारणा करीत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे (PM Narendra Modi) मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडकथेला हात घातला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडली. आपल्या भाषणादरम्यान राज यांनी पंतप्रधान मोदींकडे सहा मागण्या केल्या. यामध्ये त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर प्रकाश टाकला.

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईबाबत मनसेने अनेक आंदोलने केली. या मुद्द्यावरुन राज ठाकरे सातत्याने सरकारला धारेवर धरले. गेल्या 12 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग बनवण्याचे काम सुरू आहे, मात्र तो अद्याप तयार झालेला नाही. त्याचे काम अपूर्णच आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2007 मध्ये सुरू झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. 2007 नंतर एवढी सरकारे आली पण महामार्गाचे काम होऊ शकले नाही, अशी खंत राज यांनी व्यक्त केली होती.

रस्त्यांच्या दुरवस्थेवर ते म्हणाले होते की, केवळ कोकणातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी 8 तास लागतात. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडण्याबाबत राज ठाकरे यांनी येथे सुरू असलेले जमिनीचे व्यवहार हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले होते. कोकणी लोकांच्या जमिनी कवडीमोल दराने विकल्या जात आहेत. जेव्हा या महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा याच जमिनी व्यापाऱ्यांना विकल्या जातील. त्यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एकदा रस्ता झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव गगनाला भिडतात हे समजून घ्या, असेही राज यांनी यापूर्वी सांगितले होते.