Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Tendernama
मुंबई

नवी मुंबई महापालिकेचा 'अर्धवट' कारभार; पावसाळ्यात नागरिकांसमोर अडचणींचा डोंगर...?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात सुमारे ७५० विकासकामे सुरु आहेत. त्यातील रस्ते व चौक काँक्रिटीकरणाची कामे अर्धवट आहेत. ज्या ठिकाणी कामे अर्धवट आहेत, त्या ठिकाणी काँक्रिटीकरण थांबवून डांबरीकरण करण्यात येत आहे. महापालिकेच्या या सावळागोंधळामुळे नवी मुंबईतील नागरिकांना यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

पावसाळा तोंडावर असतानाही अद्याप चौकांचे काँक्रिटीकरण व पामबीच मार्गावरील मायक्रोसर्फेसिंगची कामे सुरूच आहेत. चौकांच्या काँक्रिटीकरणाच्या अर्धवट कामामुळे त्या ठिकाणी डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात याठिकाणी खड्डे पडण्याची भीती असून अपघात होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात सुमारे ७५० विकासकामे सुरु आहेत. त्यातील रस्ते व चौक काँक्रिटीकरणाची कामे अर्धवट आहेत. ज्या ठिकाणी कामे अर्धवट आहेत, त्या ठिकाणी काँक्रिटीकरण थांबवून डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे चौकातील अर्धवट कामांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या कामांचा खर्च कोणाचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्धवट कामांमुळे पावसाळ्यात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.

विविध चौकांचे काँक्रिटीकरण तसेच पामबीच मार्गावर मायक्रोसर्फेसिंग, नालेदुरुस्ती, गटारे यांसह महापालिकेच्या विविध इमारती यांची कामे सुरू आहेत. रस्ते दुरुस्ती, मल:निसारण वाहिन्या टाकण्यासाठीची खोदकामे यासह विविध कामे केली जात असून ती तात्काळ थांबवणे आवश्यक आहे. पामबीच मार्गावर मायक्रोसर्फेसिंगची कामे करण्यात येत आहेत. पावसाळा सुरु होण्याची स्थिती असताना अद्याप खोदकामे सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. १५ मेनंतर डांबरीकरणाची कामे करू नयेत असा नियम असतानाही नवी मुंबई महापालिका याकडे दुर्लक्ष करते. तसेच महापालिकेच्या या भोंगळ कारभाराला नवी मुंबईकर विरोध करत असताना बिनधास्तपणे कामे सुरू आहेत. चौक काँक्रिटीकरणाच्या अर्धवट कामामुळे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात अर्धवट कामाच्या ठिकाणच्या चौकामध्ये खड्डे पडणार आहेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पामबीच मार्गावरची मायक्रोसर्फेसिंगची कामे पुढील दोन तीन दिवसांत पूर्ण होतील. चौक काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी पावसाळ्यात वाहतुकीसाठी अडचण येऊ नये त्यासाठी ठेकेदाराकडूनच डांबरीकरण करवून घेण्यात येत आहे. त्याचा खर्च ठेकेदारच करणार आहे. पावसाळ्यानंतर कार्यादेशाप्रमाणे चौकांच्या काँक्रिटीकरणाचे काम ठेकेदाराकडून पूर्ण करुन घेण्यात येणार आहे.
– शिरीष आरदवाड, शहर अभियंता