Vidhan Bhavan Tendernama
मुंबई

Mumbai: 'या' धरणाच्या निकृष्ट कामाची SIT चौकशी करणार - फडणवीस

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर विविध ठिकाणी धरण दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. कळवंडे धरणाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, याप्रकरणी संबंधित उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नियमानुसार पर्यवेक्षण झाले नसेल तर कार्यवाही केली जाईल. या सर्व कामांची विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात येईल आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना रक्कम अदा केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली. सदस्य भास्कर जाधव यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कळवंडे धरणामध्ये सध्या 22 टक्के इतका पाणीसाठा आहे. 2019 पासून धरणाच्या दोन्ही बाजूस माती भरावामधून पाणी पाझरत असल्याने गळती प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्याबाबत विहित प्रक्रिया राबविण्यात आली.

या कामाचे अंदाजपत्रक दीड कोटी रुपयांच्या आतील असल्याने अशा टेंडरसाठी कंत्राटदाराची टेंडर भरण्याची सक्षमता तपासली जात नाही. मात्र, जलसंपदा विभागाची कामे करताना कंत्राटदाराची टेंडर भरण्याची सक्षमता तपासली जावी या अनुषंगाने स्वतंत्र शासननिर्णय निर्गमित करणे अथवा सध्याच्या शासननिर्णयात बदल करणे या दोन्ही पर्यायांचा विचार केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.