bridge Tendernama
मुंबई

Mumbai : मढ-वर्सोवा पुलाचे टेंडर 'या' कंपनीच्या खिशात; 2029 कोटी रुपयांची यशस्वी बोली

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अंधेरी पश्चिम येथील महत्वकांक्षी मढ-वर्सोवा उड्डाण पुलाचे टेंडर अॅप्को इन्फ्राटेक APCO Infratech Pvt. Ltd. कंपनीने पटकावले आहे. कंपनीने सर्वात कमी किंमतीची 2029.80 कोटी रुपयांची बोली लावली होती. मढ-वर्सोवा दरम्यान १.५३ किलोमीटर लांब केबल आधारित पूल निर्मितीचे हे काम आहे. मढ बेट-वर्सोवादरम्यान २२ किमीचे अंतर स्वामी विवेकानंद मार्गाने कापण्यासाठी ४५ ते ९० मिनिटे इतका वेळ लागतो, मात्र हा पूल पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हे अंतर गाठता येणार आहे.

मुंबईतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपुलांचे जाळे वाढवले जात आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात नवीन पुलांची उभारणी करण्यात येत आहे. मढ ते वर्सोवा थेट सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे फेरीसेवा आहे. मात्र ही सेवा वर्षातून चार महिने बंद असते. त्यामुळे मढ किंवा वर्सोवा येथे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग किंवा स्वामी विवेकानंद मार्ग असे दोन अन्य वाहतुकीचे पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. काही वर्षांपासून नवीन पुलाची मागणी केली जात होती. मालाड पश्चिमेकडील मढ परिसर आणि अंधेरीतील वर्सोवा हा भाग सागरी किनारपट्टीने वेढलेला आहे. त्यामुळे या भागांत प्रवासासाठी सागरी बोटीचा वापर होतो. ही जलवाहतूक अधिक जलद करण्यासाठी मढ ते वर्सोवा या जलवाहतूक पुलाचा पर्याय काढण्यात आला आहे. या नव्या पुलामुळे दोन्ही भागांतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, मच्छीमार बांधव, व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

अंधेरीत ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील 'हिमालय' पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने, तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. या पुलांसाठी महत्त्वपूर्ण असणारी सीआरझेड परवानगी मिळाल्यामुळे हे पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेने मार्च २०२४ मध्ये मढ-वर्सोवा उड्डाण पुलासाठी १,८०० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले होते. टेंडरसाठी अॅप्को इन्फ्राटेक २०२९.८० कोटी रुपये, अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि २०९८ कोटी रुपये आणि एनसीसी लि २,१२५ कोटी रुपयांची बोली लावली होती. आगामी ३ वर्षात पुलाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीवर असणार आहे.