BMC Tendernama
मुंबई

Mumbai : बीएमसीचा 'येथे' 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प; 200 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईला शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथे १०० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भातसा धरणातील १०० दशलक्ष लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी मुंबई महापालिका २०० कोटी रुपये खर्च करणार आहे. पांजरापूर येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीसाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. भातसा धरणातून मुंबईला दररोज दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यापैकी पांजरापूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात १३६५ दशलक्ष लिटर पाणी शुद्ध करण्यात येते. तर ६०० दशलक्ष लिटर पाणी भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येते. भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पात ६०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी मुंबईला पुरवठा केला जातो. आता भिवंडी तालुक्यातील (जि.ठाणे) पांजरापूर येथे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पांजरापूर येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारल्यानंतर तेथे १०० दशलक्ष लिटर पाणी शुद्ध करत ते थेट मुंबईला पुरवठा करण्यात येईल तसेच यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईला स्वस्त व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या जल विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. मुंबईकरांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून भांडुप संकुलात दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले.