BMC Tendernama
मुंबई

Mumbai : 13 हजार कोटींच्या 'त्या' टेंडरला दसऱ्याचा मुहूर्त?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी बनवणाऱ्या प्रकल्पाच्या टेंडरला अखेर मुहूर्त मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून हे टेंडर रखडले आहे, दसरा सणाच्या तोंडावर येत्या पंधरा दिवसांत हे टेंडर काढण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील असून सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुंबई जवळ मनोरी येथे १२ हेक्टर जागेवर सुमारे १३ हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला सध्या ४ हजार ५०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे मत आहे, मात्र त्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची संख्या मर्यादित आहे. मुंबईची पाण्याची तहान भागवणारा सांडपाण्यावरील जलशुद्धीकरण प्रकल्प आणि समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी बनवणारा गोडे पाणी प्रकल्प रखडला आहे.

खाऱ्या पाण्यापासून खनिजे आणि मीठ वेगळे करून पिण्याचे पाणी तयार केले जाणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने मनोरी येथे जागाही निश्चित केली आहे. १२ हेक्टर जागेवर हा प्रकल्प राबवला जाणार असून हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. प्रकल्पाला सौर ऊर्जेतून वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रकल्पाला सुमारे १३ हजार कोटींचा खर्च येणार आहे. हा प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण करायचा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून मुंबईकरांना दैनंदिन चारशे दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांत उंच इमारती आणि टॉवरची संख्या सातत्याने वाढत आहे. हॉटेल आणि सेवा उद्योगांचाही मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. रहिवासी प्रकल्पांबरोबरच भेंडी बाजार, धारावी पुनर्विकासासारखे समूह पुनर्विकासाचे प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबईकरांची पाण्याची मागणी वाढत जाणार आहेत. शिवाय क्लायमेंट चेंजमुळे पाऊस लांबत असून भविष्यात केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे महापालिका मुंबईसाठी पाण्याचे नवे स्रोत शोधत आहे.