Thane Municipal Corporation Tendernama
मुंबई

Mumbai : गायमुख ते नागलाबंदर खाडी किनाऱ्याचा कायापालट; 150 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : घोडबंदर येथील गायमुख ते नागलाबंदर खाडी किनाऱ्याचा लवकरच कायापालट होणार आहे. या कामावर १५० कोटी रुपये खर्च केले जाणार असून ठाणे महापालिकेने या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबवून ठेकेदाराला कामाचा कार्यादेश दिला आहे. येत्या दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

ठाणे शहराला ३२ किमीचा खाडी किनारा लाभला आहे. या परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर पक्षी-प्रजाती आढळतात. परंतु या भागातील पाणथळ जमिनीवर भूमाफियांकडून अतिक्रमण करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढीस लागले होते. या प्रकारांमुळे खाडी किनारी भागाचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यामुळे ठाणे महापालिकेने खाडी किनारा परिसर संरक्षित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार कोपरी, कोलशेत, वाघबीळ आणि गायमुख भागात खाडी किनारा भागाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. गायमुख भागात पहिल्या टप्प्यात ५०० मीटर, दुसऱ्या टप्प्यात ८०० मीटर खाडी किनारी भागाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यापाठोपाठ आता तिसऱ्या टप्प्यात गायमुख ते नागलाबंदर असा ८०० मीटर लांबीचा खाडी परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. त्याठिकाणी आरमाराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून महापालिका प्रशासनाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी दिली. या कामासाठी राज्य शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या कामासाठी महापालिकेने टेंडर प्रक्रिया राबवून ठेकेदार निश्चित केला. हे काम सुरु करण्यासाठी पर्यावरण व सीआरझेडची परवानगी महापालिकेला मिळाली आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे काही दिवसांपूर्वी भूमिपूजन झाले आहे. नुकतेच महापालिकेने ठेकेदाराला कामाचा कार्यादेश दिला आहे. यामुळे महिनाभरात या कामाला सुरूवात होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजाच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा इतिहास देखील नागलाबंदर खाडी किनाऱ्याला असल्यामुळे या परिसराला ऐतिहासिक महत्व आहे. घोडबंदर गावात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दिसतात. यामुळे खाडी किनारा विकसित होत असताना नागला बंदर येथे आरमार केंद्राची प्रतिकृती उभारली जाणार असून त्यात या संपूर्ण इतिहासाची माहिती नवीन पिढीला, इतिहासप्रेमींना करून दिली जाणार आहे. तसेच नागरिकांसाठी मोठा ‘पाथ वे’, विविध प्रकारचे आकर्षक गार्डन, विसर्जन घाट, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, बसण्यासाठी वेगवेगळ्या जागा तयार केल्या जातील. शिवाय दाट झाडांचे उद्यान, हिरवेगार लॉन, पार्किंगची सुविधा, वॉक वे, खेळण्यासाठी मोकळी जागा, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा, लहान मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, व्हॉली बॉल – फुटबॉल खेळता येईल अशी जागा, आकर्षक लायटिंग, सुसज्ज जेटी, दशक्रिया घाट अशी विविध कामे येथे केली जाणार आहेत.