Adani Group Tendernama
मुंबई

Mumbai : कुर्ल्यातील 'ती' मोक्याची 21 एकर जागा टेंडरशिवाय 'अदानीं'च्या घशात! वर्षा गायकवाड यांचा घणाघात

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : धारावी प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची 21 एकर जागा 'अदानीं'च्या घशात घालण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया राबवलेली नाही. कोट्यवधी रुपये किमतीची ही मोक्याची जमीन अत्यंत नाममात्र दराने 'अदानीं'ना बहाल केली असून हा एक महाघोटाळा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

कुर्ला येथील मदर डेअरीच्या जमिनीबद्दल माहिती देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, मोदानी अॅण्ड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची भूमिका भाजप सरकारने घेतलेली आहे. जी जमीन सरकारी आहे, ती जमीन 'अदानीं'ची असा प्रकार सुरू आहे. भाजप सरकारने 'अदानीं'साठी धारावी टेंडर आणि टीडीआर महाघोटाळा केला आणि धारावीकरांचा हक्क मारण्याचा कट रचला. नंतर धारावी पुनर्वसनाच्या नावाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी व पूर्वी जकात नाक्यासाठी असलेली मुलुंड येथील महापालिकेची जागा आणि डंपिंग ग्राऊंडची जागा लुबाडण्याचा डाव मांडला. आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणारी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा यांना गिळून टाकायची आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली 'अदानीं'ना नाममात्र दराने हा भूखंड भेट देण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या आधीही भाजपच्याच एका उच्चपदस्थ नेत्याचा डोळा या भूखंडावर पडला होता आणि या जागी औद्योगिक संकुल उभारण्याचा खेळ मांडला होता. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परममित्र 'अदानीं'ची नजर या भूखंडावर पडली आहे. एकनाथ शिंदेंच्या पूर्वीच्या आदेशांना केराची टोपली दाखवत महसूल व दुग्धविकास विभागाने ही जागा 'अदानीं'च्या 'डीआरपीपीएल' कंपनीला भेट देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. मदर डेअरीने पूर्वी वापरलेल्या कुर्लाच्या भूखंडावर 800 ते 900 मौल्यवान झाडे आहेत, ज्यांच्यामुळे इथला परिसर हा पर्यावरणपूरक आणि संवेदनशील आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व इथल्या रहिवाशांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी हा संपूर्ण भूखंड सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित करण्यात यावा यासाठी स्थानिकांनी एक लोकचळवळ उभारली आहे. या मागणीला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.