Ravindra Chavan. Tendernama
मुंबई

Ravindra Chavan : राज्यातील साकव दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1350 कोटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यातील साकव दुरुस्तीसाठी १ हजार ३५० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वतंत्र लेखाशिर्ष उघडून तरतूद करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही साकवांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी दीड कोटी रुपये निधी प्राधान्याने देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील साकवांसंदर्भात प्रश्न विचारला होता. चव्हाण म्हणाले की, जामदाखोरे (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) येथील सावडाव - नेलें, मिळंद-हातदे या गावांना जोडणारा लोखंडी साकव सन २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेला. या परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी नेर्ले येथे १४ किलोमीटर अंतराचा वळसा मारुन जावे लागत आहे. याशिवाय, वैभववाडी तालुक्यातील नेर्ले व राजापूर तालुक्यातील सावडाव या गावांना जोडणारा वाघोटन नदीवरील साकव आणि राजापूर तालुक्यातील मिळंद-हातदे या दोन गावांना जोडणारा साकव योजनाबाह्य रस्त्यावर आहे. या साकवांच्या बांधकामासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध देण्यात येईल.

मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, साकव बांधकाम खर्चाची कमाल आर्थिक मर्यादा ६० लाख असून ती वाढविण्याची बाब राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. तसेच राज्यातील साकवांच्या दुरुस्तीसाठी १ हजार ३५० कोटी रुपये निधी आवश्यक असून त्यातील ६५० कोटी रुपये केवळ कोकण विभागातील साकवांच्या दुरुस्तीसाठी लागणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शेखर निकम, ॲड. यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, अजय चौधरी आणि ॲड. आशीष जयस्वाल आदींनी उपप्रश्न विचारले.