Kalyan-Dombivali Municipal Corporation Tendernama
मुंबई

Kalyan-Dombivali : 'कार्टेल' करणारे 4 ठेकेदार वर्षासाठी ब्लॅकलिस्ट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कल्याण डोंबिवली महापालिकेत तब्बल २५ वर्षे 'कार्टेल' करुन नालेसफाईची कामे करणाऱ्या चार ठेकेदारांना एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याची मोठी कारवाई महापालिका प्रशासनाने केली आहे. मे. रिशी कन्सट्रक्शन (गिता काॅम्पलेक्स, हाॅस्पिटल रोड, उल्हासनगर), मे. सुमित राजेंद्र मुकादम (रा. मल्हार आशीष बंगला, कचोरे गाव, गावदेवी मंदिरा समोर, खंबाळपाडा), मे. भावेश रमेश भोईर (रा. सरवलीपाडा, सरवली, भिवंडी), मे. गणेश ॲन्ड कंपनी, (दुल्हान महल चेंबर, उल्हासनगर) या ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेने अ, ब, क, जे, ह, फ, ग, आय, ई, ड या दहा प्रभागांमधील आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार ११ नाले सफाईच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. २९ ते ३० टक्के कमी दराने सहभागी ठेकेदारांनी टेंडर भरली होती. १९ लाख ते ४२ लाख रुपयांपर्यंतची ही टेंडर होती. ११ ठेकेदारांपैकी चार टेंडर मे. रिशी कन्स्ट्रक्शन, तीन टेंडर मे. सुमित, दोन टेंडर मे. भावेश, मे. गणेश यांनी भरणा केल्या होत्या. शासन नियमाप्रमाणे शहर अभियंता विभागाने ठेकेदारांना आठ लाखांपासून ते १८ लाखांपर्यंतच्या सुरक्षा अनामत रकमा २४ एप्रिलपर्यंत भरण्याचे आदेश दिले. विहित कालावधीत ठेकेदारांनी रकमा भरल्या नाहीत. या कमी-अधिक दराने टेंडर भरणा केलेल्या ठेकेदारांना महापालिकेने तुम्ही कमी दराने काम करण्यास तयार आहेत का, अशी विचारणा करण्यासाठी चर्चेस बोलविले. त्या बैठकीकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली. नालेसफाईच्या ३ कोटी ६९ लाख ६४ हजार रुपयांची टेंडर भरणाऱ्या प्रस्थापित ठेकेदारांनी यावेळी प्रशासनाची कोंडी केली. कमी दराची टेंडर भरणा करूनही महापालिकेच्या कोणत्याही प्रक्रियेला चारही ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही.

महापालिकेची संगनतमाने कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या ठेकेदारांमुळे पालिकेला पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे विहित वेळेत सुरू करता आली नाहीत, अशी प्रशासनाची खात्री झाली. त्यामुळे अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. "टेंडर प्रक्रियेच्यावेळी प्रशासनाची अडवणूक करण्याची प्रवृत्ती बळावू नये यासाठी चार ठेकेदारांना वर्षभरासाठी टेंडर प्रक्रियेत सहभागासाठी प्रतिबंध करून त्यांच्या अनामत रकमा जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे." असे शहर अभियंता अर्जुन अहिरे म्हणाले. वर्षानुवर्ष ठराविक ठेकेदार महापालिकेत राजकीय दबाव, दहशतीचा वापरुन स्वतःला काम मिळेल अशा साखळी पद्धतीने टेंडर भरण्याची कामे करत आहेत. पालिकेच्या प्रत्येक कामांमध्ये अशी मक्तेदारी निर्माण केलेले ठेकेदार आहेत. ते सचोटीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना टेंडर स्पर्धेत उतरणार नाहीत अशा पद्धतीने वर्षानुवर्ष व्यूहरचना आखत आले आहेत. त्यांचे हे डाव आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी उधळून लावले.