coastal road

 

tendernama

मुंबई

कोस्टल रोड : मच्छिमारांच्या आंदोलनामुळे अडथळ्यांचा सागरी सेतू

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : स्थानिक मच्छिमारांचा विरोध डावलून कोस्टल रोडच्या (Coastal Road) एका भागाचे काम रेटण्याचा प्रयत्न सुरु झाल्याने तापलेले पाणी अधिक उसळी मारु लागले आहे. पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त होईल या भीतीपोटी उभे राहिलेल्या मच्छिमारांच्या आंदोलनामुळे कोस्टल रोडचे बांधकाम दोन महिन्यांपासून रखडले आहे. कोस्टल रोड प्राधिकरण मात्र या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक सुरळीत होईल, असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तज्ज्ञांच्या समितीने तपासणी करुन प्रकल्पाचा आराखडा बनवला असल्याचे सांगत आहेत.

मुंबईत सध्या मासेमारीचा हंगाम आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ, वरळी कोळीवाड्यातील सुमारे 200 मच्छीमार दररोज सकाळी त्यांच्या बोटी मच्छिमारीसाठी बाहेर काढत नाहीत. तर कोस्टल रोडचे बांधकाम बंद पडायला आणि त्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी सध्या त्यांची हालचाल सुरू आहे. 20 सप्टेंबरपासून, कोस्टल रोड बांधकामाच्या निषेधार्थ, वरळीतील क्लीव्हलँड बंदर येथून सुमारे 25 मोटार चालवलेल्या आणि मोटारी नसलेल्या बोटी रात्रंदिवस जेट्टीभोवती पार्क करण्यात येत आहेत.

मच्छिमार आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याने कोस्टल रोडचे बांधकाम 12 वेळा बंद करावे लागले. यावर आता वरळी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना नोटिसा बजावण्यासाठी सुरवात केली आहे. नोटीस बाजावल्यानंतर ही बेकायदेशीरपणे आंदोलन केल्यास आरोपपत्र दाखल केले जाईल असा इशारा दिला आहे. त्यासाठी सध्या कोळीवाड्याजवळील जेट्टीवर पोलिसांचा पहारा बसवण्यात आला आहे. मात्र, या इशाऱ्यानंतर ही मच्छिमार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. कोस्टल रोड प्रकल्पामुळे वरळी जेट्टीच्या शेवटी येणार्‍या दोन खांबांमधील अंतर वाढवा. कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा मरीन ड्राईव्ह पासून वांद्रे-वरळी सी-लिंकच्या वरळीपर्यंत जाणारा रस्ता आहे.

हाजी अली येथील मरीन लाईन्स येथील दक्षिणेकडील कोस्टल रोडचे काम सुरू असून त्यावर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. वरळी जवळ मुंबई महापालिका वांद्रे वरळी सी लिंकला कोस्टल रोडशी जोडणारे दोन पूल बांधणार आहे. यालाच मच्छिमारांनी विरोध केला असून यामुळे येथील काम दोन महिन्यांपासून रखडले आहे. वरळी जवळील क्लीव्हलँड बंदर वरळी कोळीवाड्यातील 200 कुटुंबांना आधार देते. यात नाखवा, मच्छिमार, किरकोळ विक्रेते गुंतलेले आहेत. हा व्यवसाय आजचा नाही तर किमान एक शतक जुना असल्याचे येथील जुन्या मच्छिमारांचे म्हणणे आहे.

मुंबई महापालिका कोस्टल रोडच्या वरळीच्या टोकाला एक इंटरचेंज बांधत आहे जो सध्याच्या सागरी सेतूला-वांद्रे-वरळी सी लिंकला जोडेल. क्लीव्हलँड बंदरपासून समुद्राच्या आत फक्त एक किमी अंतरावर, इंटरचेंजचे बांधकाम सुरु असलेले खांब बोटींसाठी उपलब्ध असलेला एकमेव जलवाहतूक मार्ग बाधित करेल असे मच्छिमारांचे म्हणणे आहे. सध्या क्लीव्हलँड बंदरामधून बाहेर पडल्यानंतर बोटीना खडकाळ आणि अवघड वाटेवरुन मार्गक्रमण करावे लागत आहे. सध्या समुद्राच्या खोलात न जाता आगाफी किनाऱ्या जवळील उथळ पाण्यातील लहान, पारंपारिक मच्छिमारी छोट्या मच्छिमारांच्या उदरनिर्वाहासाठी गरजेची आहे. सध्या, वांद्रे-वरळी सी लिंकला आधार देणाऱ्या 30 मीटर अंतर असणाऱ्या दोन खांबांमधून बोटी जातात. या ठिकाणी इंटरचेंज आल्यावर बोटींना पुन्हा चार खांबांमधून जावे लागेल. सध्याच्या योजनेनुसार, पालिका खांबांमध्ये 60 मीटर अंतर ठेवणार आहे. मात्र, हे अंतर पुरेसे नसल्याचा दावा मच्छिमारांनी केला आहे.

आमच्या बोटी सुरक्षितपणे ने-आण करण्यासाठी आम्हाला किमान 200 मीटर अंतराची आवश्यकता आहे, असे वरळी कोळीवाडा नाखवा व्यवहार सहकारी सोसायटीचे संचालक नितेश पाटील म्हणाले. समुद्रात वारा आणि लाटा मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे बोटी हेलकावे खाण्याचा धोका अधिक असतो. एक जोरदार लाट किंवा अचानक येणारा वारा, यामुळे लहान बोटी खांबांवर आदळून फुटू शकतात अशी भीती ही पाटील यांनी व्यक्त केली आहे. सी-लिंकच्या खांबांनी आधीच आमची गती कमी केली आहे आणि आता आणखी दोन पूलांमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका असल्याचे ही पाटील म्हणाले. एका ठराविक वेळी एकाहून अधिक बोटी या खांबांमधून जाऊ शकत नाहीत, खांबांमुळे त्यांचा वेग कमी झाला आहे असेही पाटील म्हणाले.

कोस्टल रोड प्रकल्पाचा आराखडा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करुन तयार करण्यात आल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मच्छिमारांसाठी सध्याच्या वांद्रे-वरळी लिंक रोडच्या दोन खांबांमधील स्पष्ट अंतर 17 मीटर आहे आणि बोटी केवळ एकाच ठिकाणाहून जाऊ शकतात, तरी देखील मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामध्ये बोटींना तीन स्पॅनमधून जाऊ देणार असून प्रत्येक स्पॅनमधील अंतर 56 मीटर आहे असे पालिकेचे म्हणणे आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने जारी केलेल्या भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 30 मीटरचा नेव्हिगेशन कालावधी पुरेसा आहे असे पालिकेचे म्हणणे आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वाहतुकीसाठी नेव्हिगेशन स्पॅन बोटीच्या रुंदीच्या 8 पट असणे आवश्यक आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या आकडेवारीनुसार, वरळी जेट्टीवरील सर्वात मोठे परवानाधारक वाहन 10.4 मीटर लांब आणि 3.8 मीटर रुंद असून त्याची वाहून नेण्याची क्षमता 4,980 किलो आहे आणि पाण्याची खोली 3.6 मीटर आहे. यानुसार, दुहेरी गाडीसाठी नेव्हिगेशन स्पॅन कमाल 30.4 मीटर असायला हवा. मात्र मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामध्ये 60 मीटरचा नॅव्हिगेशनल स्पॅन देण्यात आला आहे, हा गरजेपेक्षा दुप्पट आहे असे ही सांगण्यात आले.

प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची नियुक्ती केली आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीत, महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी इंटरचेंजच्या पुनर्रचनेच्या मच्छिमारांच्या मागण्यांचा स्वतंत्र आढावा घेण्यासही सहमती दर्शवली. तथापि, पालिकेने मच्छिमारांना एक स्वतंत्र, तांत्रिक समिती नियुक्त करण्यास सांगितले आहे जी त्यांच्या मागण्यांचा कोणताही पक्षपात न करता पुनरावलोकन करु शकेल. मात्र याला देखील मच्छिमार संघटनांचा विरोध असल्याचे मच्छिमार दीपक पाटील यांनी सांगितले. समुद्र किंवा मच्छिमारीचा कोणताही अनुभव नसलेले किंवा समुद्रातील अडचणीशी अनाभिज्ञ असलेले अधिकारी यावर कसा तोडगा काढणार असा प्रश्न ही दीपक पाटील यांनी विचारला आहे.