Eknath Shinde Tendernama
मुंबई

Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी अशी होणार कमी! CM शिंदेंनी सांगितला प्लॅन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मागील दहा वर्षांत रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून, रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देतानाच भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या महानगरातून दररोज किमान ७३ लाख प्रवासी उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. एवढ्या संख्येने प्रवास करणारे प्रवासी असलेले हे एकमेव शहर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील २०५१ विविध रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन झाले ही विशेष आनंदाची बाब असून या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांचा समावेश असून ५६ स्थानकांचा त्यात समावेश आहे.

महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून मदत होत आहे. सध्या राज्यात २२७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे अमृत भारत स्टेशन, रोड ओव्हर ब्रीज ROB आणि RUB असे २४१ रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ५६ स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे अन्य इन्फ्रा प्रोजेक्टप्रमाणे महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांच्या विस्ताराला बळ मिळत आहे. राज्यातील रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठीही केंद्राचे विशेष पाठबळ लाभत आहे. वंदे भारत या श्रेणीतही महाराष्ट्राला सात नव्या रेल्वेगाड्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे देशातील वंदे भारत रेल्वेगाड्यांची निर्मिती लातूर येथील कारखान्यात होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडथळेही दूर करण्यात आले असून या मार्गासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होऊन भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावायला लागेल, असे शिंदे म्हणाले.

रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश येत आहे. रेल्वेच्या विविध प्रकल्पांमुळे प्रवाशांना सुखकर, गतिमान प्रवासाचा अनुभव मिळतानाच रेल्वे स्टेशन्सचे रुप पालटलेले दिसत आहे. एसी लोकल सुरू झाल्या आहेत. त्यांची संख्याही वाढविण्यात येत आहे.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या लौकीकाला साजेसे योगदान मिळाले पाहिजे याची खबरदारी घेण्यात येत आहे. रस्ते विकासांचे असे इतर अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प दृष्टीपथात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे (अटलसेतू) लोकार्पण झाले. काही दिवसात मुंबई कोस्टल रोडचे देखील उद्घाटन होईल.

महाराष्ट्राला देशाचे ग्रोथ इंजिन म्हटले जाते. देशातील सर्वाधिक पायाभूत सुविधांची कामे महाराष्ट्रात सुरू आहेत हे अभिमानास्पद आहे. राज्यात ८ लाख ३५ हजार कोटी रुपये खर्चाची विक्रमी विकासकामे सुरू आहेत. केंद्र सरकारचं भक्कम पाठबळ आहेच.

मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी नरीमन पॉईंट ते वरळी या ११ किमी लांबीच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कोस्टल रोडमुळे सुमारे ७० टक्के वेळ आणि ३४ टक्के इंधनाची बचत होईल, प्रदूषण कमी होणार असल्याने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यासही मदत होईल, असे शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत ३३७ किमी लांबीचे मेट्रो नेटवर्क टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. उर्वरीत मेट्रो रुटही पुढील दोन ते तीन वर्षांत कार्यान्वीत होतील. मेट्रो कनेक्टीविटीमुळे 'एमएमआर'च्या रस्त्यांवरील किमान ३० ते ३५ लाख वाहने कमी होतील असा अंदाज आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. त्यांना आरामदायी प्रवास करता येईल. प्रदूषण कमी होईल आणि इंधनाचीही बतच होईल, असे शिंदे म्हणाले.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, रेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिकीकरणाचे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. देशात जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यांसह रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारले जात आहे.

वंदे भारत रेल्वे वैशिष्ट्यपूर्ण ठरली असून काही दिवसात जागतिक मानकांच्या पूर्ततेनंतर या प्रणालीच्या निर्यातीसंदर्भातही विचार करण्यात येत आहे. अमृत भारत रेल्वेही यशस्वी ठरली आहे. भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक होत असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.