Nagpur Tendernama
मुंबई

Devendra Fadnavis : 24 हजार कोटींच्या जलविद्युत प्रकल्पासाठी एमओयू; 5630 मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांच्या गुंतवणुकीत भरीव वाढ करण्याच्या वचनबध्दतेस अनुसरुन उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

जलसंपदा विभाग व महाजनको, द टाटा पॉवर लि., आवाडा ग्रुप यांच्या दरम्यान उदंचन जलविद्युत प्रकल्पांसदर्भात सामंजस्य करार करण्यात आले. याव्दारे राज्यात 24631 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून यातून 5630 मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मितीचे उद्धिष्ट असून 10300 एवढी रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात जलसंपदा, महाजनको, द टाटा पॉवर लि. आणि अवाडा ग्रुप यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, 2030 पर्यंत राज्याच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या 50 टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जा निर्मितीव्दारे पूर्ण करण्याच्या दूरदर्शी योजनेची रूपरेषा तयार झाली असून हा उपक्रम महाराष्ट्राच्या ऊर्जा निर्मिती धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे. याव्दारे वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्तता तसेच शाश्वत आणि हरित उर्जा निर्मितीव्दारे राज्याच्या ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या उद्धिष्ट पूर्तीसाठी हे महत्वाचे पाऊल आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा हा केवळ एक पर्याय नसून तो आपल्या भावी आर्थिक स्थिरतेचा एक मूलभूत आधारस्तंभ आहे. द टाटा पॉवर व आवाडा ग्रुपची वचनबद्धता प्रशंसनीय आहे. या धोरणात्मक भागीदारांच्या सहयोगी प्रयत्नांमुळे, महाराष्ट्राला हरित ऊर्जेमध्ये अग्रेसर बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. अपारंपारीक ऊर्जा स्त्रोतांद्वारे पायाभूत सुविधा वाढवण्याची राज्याची वचनबद्धता शाश्वत विकास आणि आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी राज्याचा सक्रिय दृष्टीकोन या करारामध्ये प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.