Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

Devendra Fadnavis : राज्यातील दुसऱ्या मोठ्या नदीजोड प्रकल्पाबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

नार-पार-गिरणा हा प्रकल्प 7015 कोटी रुपयांचा असून, यात पश्चिमी वाहिनी नदीखोर्‍यातून 10.64 टीएमसी पाणीवापर प्रस्तावित आहे. याचा प्रामुख्याने लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर सिंचन क्षेत्राला होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील 25,318 हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यातील 17,024 हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे. स्थानिक वापर 7174 हेक्टर इतका असेल. असे एकूण 49,516 हेक्टर इतके सिंचनक्षेत्र असेल.

या योजनेत 9 नवीन धरणे बांधण्यात येणार असून, एकूण 305 मीटर उपसा करून हे पाणी तापी खोर्‍यातील चणकापूर धरणात आणण्यात येईल. या योजनेला 15 मार्च 2023 रोजी एसएलटीएसीने मान्यता दिली होती. 2016 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना उपसा सिंचन योजना म्हणून शासकीय खर्चाने हाती घेण्यास या योजनेला मान्यता घेण्यात आली होती.

यापूर्वी 10 जुलै रोजी राज्यपालांनी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी दिली होती. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या 6 जिल्ह्यांना 3.71 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन लाभ या योजनेमुळे मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील महायुती सरकार जलसमृद्धीच्या दृष्टीने मोठे काम करीत असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.