Coastal Road Tendernama
मुंबई

Mumbai : कोस्टल रोडसाठी आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा; ठेकेदाराकडून मुदतवाढीसाठी पत्र

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या महत्त्वकांक्षी मुंबई कोस्टल रोडचे काम पूर्ण करण्यास ठेकेदार एलअँडटी कंपनीने आणखी १८१ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे संपूर्ण कोस्टल रोड सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला होण्याची प्रतीक्षा आणखी काहीकाळ लांबणीवर पडणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा नारळ फुटला होता. आतापर्यंत कोस्टल रोड प्रकल्पाचे ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाच्या "भाग-४ चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. या कामास २५ मे २०२३ आणि २६ नोव्हेंबर २०२३ तसेच २ एप्रिल २०२४ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी भाग एकचे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. या कामास ९ जून २०२३, १० सप्टेंबर २०२३ आणि २२ मे २०२५ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. भाग दोनचे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १५ ऑक्टोबर २०२२ होती. लार्सन अँड टुर्बोतर्फे २३ जुलै २०२४ रोजी लेखी पत्र पाठवून ८ कारणांसाठी १८१ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत, हा प्रकल्प पूर्ण करण्याची मूळ तारीख आणि सद्यस्थितीची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांच्या मते, २०२५ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत हा प्रकल्प १०० टक्के पूर्ण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने निवडणूक लक्षात घेता, घाईगडबडीत कामाचे उद्घाटन करू नये. बृहन्मुंबई महापालिकेमार्फत धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे वरळी सी लिंक) टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे आजतागायत ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी पदपथ आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत.

नागरिकांच्या सुविधेसाठी व वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी प्रकल्पामधील पूर्ण झालेले टप्पे एका पाठोपाठ खुले करण्यात येत आहेत. सर्वात आधी ११ मार्च २०२४ रोजी दक्षिणेला प्रवासाची सुविधा देणारी बिंदूमाधव ठाकरे चौक (वरळी) ते मरीन ड्राईव्ह ही ९.२५ किलोमीटर लांबीची दक्षिण वाहिनी मार्गिका खुली करण्यात आली होती. त्यानंतर उत्तर दिशेने प्रवासाची सुविधा देण्यासाठी १० जून २०२४ रोजी मरीन ड्राईव्ह ते हाजी अली मार्गे लोट्स जंक्शनपर्यंत सुमारे ६.२५ किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला करण्यात आला होता. अलीकडेच हाजी अलीपासून पुढे खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत सुमारे ३.५ किलोमीटरचा तिसरा टप्पा तात्पुरत्या स्वरुपात नागरिकांच्या सोयीसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे मुंबईकरांची सुमारे 70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये सुद्धा 34 टक्के बचत होणार आहे. 10.58 कि.मी. लांब या सागरी मार्गावर १४ हजार कोटींचा खर्च झाला आहे.