Electronic Toll Tendernama
मुंबई

बूम बॅरिअर नसलेला 'हा' देशातील पहिला टोल मार्ग; 'या' कंपनीस 427 कोटींचे काम

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा २१,२०० कोटी रुपये खर्चाचा शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतूवर कारसाठी २५० रुपये टाेल आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच जाहीर केला. या सागरी सेतूवर ऑटोमॅटिक पद्धतीने टोल वसूल केला जाणार आहे. त्यामुळे याठिकाणी बूम बॅरिअर असणार नाहीत. टोल वसुलीसाठी बूम बॅरिअर नसलेला अटल सेतू हा देशातील पहिला मार्ग असणार आहे. कॅप्श (Kapsch) या ऑस्ट्रेलियन कंपनीस हा टोलनाका उभारण्याचे काम देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात यशस्वी जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांपैकी ही एक आहे.

प्रकल्पावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी पुढील ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी नवी मुंबईतील उलवेजवळ शिवाजीनगर आणि चिर्ले (गव्हाण) या दोन ठिकाणी पथकर नाके उभारण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या मार्गावरील पथकराचा दर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकरांपेक्षा कमी असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने कॅप्श (Kapsch) या ऑस्ट्रेलियन कंपनीस ४२७ कोटी रुपये खर्चाच्या इंटेलेंजेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमची अंमलबजावणी करण्याचे काम दिले आहे. ज्यात प्रशासकीय इमारत, कमांड कंट्रोल सेंटर, रोड लाइट्स, इलेक्ट्रिकल आणि युटिलिटी वर्कमधील १३३ कॅमेरे असलेल्या ओपन रोड टोलिंग सिस्टमचा समावेश आहे. टोलनाक्यावर बूम नसल्याने शिवडी आणि नवी मुंबई विमानतळदरम्यानच्या प्रवासाची वेळ २० मिनिटांपेक्षा कमी लागणार आहे. पॅकेज ४ अंतर्गत संपूर्ण पुलासाठी जीआयसीएच्या देखरेखीखाली ऑस्ट्रेलियन कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी या सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी नवी मुंबई विमानतळानजीकच्या जागेत पंतप्रधानांची सभा होणार आहे. विमानतळ प्रकल्पातील नियोजित जागेवर प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग तसेच अंतर्गत रस्ते बनविण्यासाठी २ कोटी ६५ लाख रुपये आणि मैदान तयार करणे, मंडप बांधणे, वाहनतळाची सोय करण्यासाठी ५ कोटी २३ लाख अशी ७ कोटी ८८ लाख रुपयांची कामे सिडको करणार आहे.