Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात MSRDC का झाली नापास?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी व्हाया सावरकर चौक ते सिल्लेखाना रस्त्यावर अपघात होणे ही नित्याची बाब झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या १५० कोटी निधी पैकी या १७५० मीटर लांबी व १५ मीटर रूंद रस्त्यासाठी ८ कोटी ७१ लाख ४५ हजार २४५ रुपये मंजूर करण्यात आले. रस्ता बांधकामाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) टाकण्यात आली. या रस्त्याचे काम छत्रपती संभाजीनगर शहरातील मापारी कंस्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात आली. मात्र हा रस्ता बांधला की, लोकांच्या मरणाची व्यवस्था करण्यात आली, असा प्रश्न वाहतुकदार विचारीत आहेत. वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी व्हाया सावरकर चौक ते सिल्लेखाना रस्त्याची दोषनिवारण कालावधी आधीच वाट लागली.

कंत्राटदाराला २२ ऑक्टोबर २०२० रोजी या रस्त्याच्या बांधकामाची वर्क ऑर्डर दिली होती. २१ मे २०२१ रोजी कंत्राटदाराने रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र कंत्राटदारांने वेळेत हे काम केले नव्हते. कंत्राटदाराकडे ३६ महिन्यांचा दोष निवारण कालावधी असताना त्याने देखभाल दुरुस्तीकडे कानाडोळा केला. दरम्यान सदर रस्त्या वाहतुकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याचे डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असतानाच दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेला खिंडार पडले आहेत. दोषनिवारण कालावधी आधीच अल्पावधीत रस्त्याचे बेहाल झाले आहेत. परिणामी नागरिकांना कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या फुटपाथचा वापर करता येत नाही. खड्डे टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

३६ महिन्यांच्या आतच ९ कोटीच्या रस्त्याची लागली वाट
वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी व्हाया सावरकर चौक ते सिल्लेखाना या शहरातील मुख्य व अत्यंत वर्दळीच्या व जालना रस्त्याला समांतर असलेल्या रस्त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने काही महिन्याभरापूर्वी डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम संपण्यात आले. या बीटी रस्त्याचे काम होऊन दोष निवारण कालावधी संपण्याआधीच निकृष्ट बांधकामामुळे डांबर उखडून रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून गिट्टी निघून रस्त्यावर गिट्टीचा पसारा पडला आहे. यामुळे वाहन चालकांचा जीव संकटात सापडला आहे. परिणामी यापूर्वी प्रमाणेच रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे.

दुसरीकडे रस्त्याच्या कडेला शोल्डरमध्ये पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याखालून स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा आणि वरून पेव्हर ब्लॉक टाकून पदपथ तयार करण्यात आला आहे. मात्र स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेतील चेंबरचे ढापे निघून येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उघड्या डक्टमध्ये काही बेजबाबदार आणि बेशिस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कुडादान केल्याने खड्ड्यात आणि पाईपमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

एक नव्हे तर सगळ्याच ढाप्यांची तोडफोड होऊन, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी रस्त्याचे बांधकाम केले आहे की, लोकांच्या मरणाची व्यवस्था, असा प्रश्न वाहतूकदार विचारीत आहेत.

वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी ते व्हाया सावरकर चौक ते सिल्लेखाना हा रस्ता वाहतूकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याच्या स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेच्या ठिकऱ्या उडाल्या असताना रस्त्याच्या डांबरीकरणाचा पृष्ठभाग सोलून खड्डे पडले आहेत. हे कमी म्हणून की काय अल्पावधीत रस्त्याचे बेहाल होत झाले असताना राज्य सरकारचे कोट्यवधी रुपये रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणावर खर्च झाले असताना रस्ता वर्षभर नाही तर सहा महिनेही का टिकाव धरत नाही, हा चौकशीचा विषय आहे. कारपेट न करता काही ठिकाणी रस्ता तसाच सोडून देण्यात आलेला आहे. रस्ता अनेक ठिकाणाहून खड्ड्यांनी बरबटलेला आहे. खडी उखडून रस्त्यावर पसरलेली आहे. जुना रस्ता वाहतुकदारांना दिसत आहे. रस्त्यावरील बीबीएम पूर्णत: उखडला असून निकृष्ट बांधकामाचे पाप लपविण्यासाठी  कंत्राटदाराकडून ट्रक चालकांकडे बोट दाखवले जात आहे.

दुसरीकडे राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी या गैरप्रकाराकडे डोळेझाक करीत आहेत. ‘अंधेर नगरी, चौपट राजा’ सारखी परिस्थिती या मार्गावर दिसून येत असल्याने वाहतूकदारांमध्ये कमालीचा असंतोष आहे. वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे.

अवकाळी पावसाळ्यामुळे बीबीएम मातीत दाबल्या गेले आहे. पावसाळ्यात बीटी झालेल्या रस्त्याची वाट लागली आहे. खड्ड्यांमुळे अपघात बळावले आहेत. यासंदर्भात टेंडरनामा प्रतिनिधीने अधिकाऱ्यांना व कंत्राटदार अरूण मापारी यांना जागे केल्यानंतर रस्त्याची पाहणी करून डागडुजी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. परंतु या रस्त्यावर अजूनही वाहन चालविताना कसरत करावी लागते. 

दोष निवारण कालावधी संपण्याआधीच रस्ता उखडणे म्हणजेच गैरप्रकाराला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने डांबरीकरण व मजबुतीकरण करताना कंत्राटदाराचे कामात हलगर्जीपणा केल्याचे धाडस दिसून येते. बांधकामाच्या वर्ष दोन वर्षानंतर लगेच  रस्त्याला खड्डे पडणे सुरू झाले. जुना रस्ता डोके वर काढून डोकावू लागला. खड्ड्यांची संख्या वाढून आज रस्त्याचे बेहाल झाले आहेत. बांधकामाचा फटका या रस्त्यावरील सर्व नागरिकांना भोगावा लागत आहे. नागरिकांनी अनेकदा चौकशीची मागणी केली असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडस न करता पाठबळ दिल्याचे दिसून आले.