Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगरकरांवर सिडको उड्डाणपुलाने का पाडली छाप; इतर उड्डाणपुलांचे काय?

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुलाच्या गुळगुळीत धावपट्टीवर कंत्राटदार जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा. लि. या मुंबईच्या कंत्राटदाराकडून एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांनी चढ - उतारावर वाहतूक नियमानुसार झेब्रा क्रॉसिंग, रेडियम लाइट आणि रिफ्लेक्टर लावल्याने रात्रीच्या अंधारात चमकणारे रेडियम लाइट आणि पांढऱ्याशुभ्र पट्ट्यांनी सिडको उड्डाणपुलाने छत्रपती संभाजीनगरकरांवर छाप पाडली आहे.

सिडकोतील छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी सरकारी तिजोरीतून ५६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत जळगाव टी पाॅईंट येथे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली.

राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळावर (MSRDC) संपूर्ण बांधकामाची जबाबदारी टाकण्यात आली होती. टेंडरमध्ये यशस्वी झालेल्या मुंबईतील रंजन मिश्रा या ठेकेदाराच्या मे. जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा. लि. कंपनीला १३ फेब्रुवारी २०१४ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. २० जून २०१६ मध्ये त्याने प्रकल्प पूर्ण केला होता. त्यानंतर ९ वर्षे पुलाच्या देखभाल दुरुस्तीची त्याच्याकडे जबाबदारी होती.

मात्र, रस्त्याचा दोषनिवारण कालावधी बाकी असताना पुलाच्या देखभाल - दुरुस्तीकडे कंत्राटदाराकडून कानाडोळा करण्यात येत होता. दर पावसाळ्याआधी खड्ड्यांची लिपापोती तर , सोडाच पण पावसाळ्यात उखडलेल्या सरफेसची खडी सफाईकडे देखील कंत्राटदाराकडून दुर्लक्ष केले जात होते.

आधीच खड्डेमय रस्ते त्यात, खडी पसरल्याने रस्त्यावर वाहतूककोंडी होत होती. त्यात पुलावरील सांडपाण्याचे नादुरूस्त पाईपामुळे पुलावर आणि रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना या सर्व समस्यांचा सामना करावा लागत होता.

याबाबत 'टेंडरनामा'ने बातमी प्रसिद्ध करताच, एमएसआरडीसीचे तत्कालीन मुख्य अभियंता बी. पी. साळुंखे यांनी अधिकाऱ्यांना जागे करत जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा. लि. या कंत्राटदाराला नोटीस पाठल्यानंतर तात्काळ कंत्राटदारामार्फत पुलावरील धावपट्टींचे नुतनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे उड्डाणपुलावरील खड्यांपासून छत्रपती संभाजीनगरकरांची सुटका झाली.‌ कंत्राटदार देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याचे काम गुळगुळीत केल्याने स्थानिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला. पुलाच्या दोन्ही बाजुंना आता झेब्रा क्रॉसिंग पांढरे पट्टे, गतिरोधक, रेडियम दिवे लावल्याने या उड्डाणपुलाने छत्रपती संभाजीनगरकरांवर छाप पाडली आहे.

इतर उड्डाणपुलांचे काय?

शहरात नियोजनशून्य कारभारी आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळेच जालनारोडवर वाहतूककोंडी जैसे थे आहे. पाच उड्डाणपूल होऊनही वाहनचालक वाहन चालविताना, तर नागरिक रस्ता ओलांडताना दररोज तारेवरची कसरत करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक, शाळा-महाविद्यालयातील मुलांना जीव मुठीत धरून दररोज ये-जा करावी लागत आहे. शहराची जीवनवाहिनी म्हणून नाही, तर वाहतूककोंडीत हरवलेला जालना रस्ता हीच या रस्त्याची ओळख बनली आहे.

जालनारोडवर सेव्हनहील हा सहाशे मीटर लांबीचा पहिला पूल पूर्ण झाला. त्यानंतर जालनारोडवर वाहतूककोंडी होत असल्यामुळे पुन्हा सिडको जळगाव टी पाॅईंट, मोंढा नाका, क्रांतीचौक, महावीर चौक, असे चार उड्डाणपूल उभारले. मात्र हे उड्डाणपूल उभारतांना शहरातील बडे उद्योजक आणि राजकीय नेत्यांच्या मालमत्ता डोळ्याआड जाऊ नयेत, याचा पूरेपूर विचार करण्यात आले. चुकीचे पूल उभारण्यात आल्याने पूर्व - पश्चिम - दक्षिण - उत्तर प्रत्येक सिग्नलवर वाहनांच्या रांगाच रांगा लागून वाहतूक कोंडी होते.‌

सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली रस्त्यांवर सिग्नलच्या दोन्ही बाजूला महावितरणचे खांब न हटवता खांबाना सिमेंटच्या भिंती बांधल्या त्यामुळे पूलाखाली वाहतूक कोंडी कायम आहे. पुलाच्या खालच्या रस्त्यांपर्यंत बड्या उद्योजकांनी  बांधलेली दुकाने, ओटे, भिंंत सरकवणे गरजेचे आहे. जालना रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांसाठी उड्डाणपूल करण्यात आले. एकापाठोपाठ पाच उड्डाणपूल झाले, तरीही जालना रस्त्यावरील वाहतूककोंडी का सुटत नाही, हा प्रश्न गंभीर आहे. वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटील बनल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

संरक्षक कठडे उंच हवेत

पुलांवरील रस्त्यांच्या डांबरीकरणादरम्यान‌ पुलांवर उभारलेल्या संरक्षक कठड्यांची उंची अत्यंत कमी झाली आहे.‌ उड्डाणपुलांवरील कठड्यांना रेडियम दिवे नाहीत. दुभाजकासह रस्त्यांवर आणि कठड्याला लागून पांढरे पट्टे, गतिरोधक व रिफ्लेक्टर नाही. आयआरसीच्या मानकानुसार कुठेही वाहतूक नियमांचे पालन करणारी झेब्रा क्रॉसिंग नाही.

दुभाजकांची उंची देखील कमी झाल्याने बेशिस्त वाहतुकीमुळे सारखे अपघात होत आहेत. पाचही उड्डाणपुलांच्या संरक्षक कठड्याची उंची वाढवण्याची गरज आहे. कठड्याची उंची कमी असल्यामुळे पुलावरून वाहन चालवतानाही धोकादायक वाटू लागत असल्याने चालकांनी सांगितले.

नगरनाका ते कॅम्ब्रीज १८ किलोमीटर अंतरावर पाच उड्डाणपूल होऊनही वाहतूककोंडी सुरळीत होण्याऐवजी अत्यंत धोकादायक बनली आहे. शहराबरोबर चारही दिशांना शहराचा विस्तार झपाट्याने झाला आणि कोंडीचा प्रश्न गंभीर बनू लागला. त्यावर उपाय म्हणून उड्डाणपुलांचा पर्याय समोर आला.

दूरदृष्टी नसल्यामुळेच जालना रस्त्यावरील वाहतूककोंडी दिवसेंदिवस जटिल बनत आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, ते होताना दिसत नसल्याची खंत सुज्ञ मंडळींनी व्यक्त केली.