Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : शहरात पाणीबाणी;  मनुष्यबळाअभावी 37 जलकुंभांचे रखडले काम

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा विभागांतर्गत तत्कालीन वार्ड क्रमांक-३ यादव नगर, नवजीवन काॅलनी येथील २० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ १७ वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता. जलकुंभाच्या बांधकामासाठी प्रमोद महाजन क्रीडा संकुलानजीक जागा निश्चित करण्यात आली होती. या जलकुंभाचा माजी उप मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते ११ मार्च २००७ रोजी मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला होता. मात्र जलकुंभ बांधण्यास महानगरपालिका प्रशासनास अपयश आले आहे. त्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत त्याच जागेवर महानगरपालिकेने सुचविलेल्या जागेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तीन वर्षांपूर्वी जलकुंभाचे बांधकाम सुरू केले. मात्र केवळ काॅलम उभे करून काम रेंगाळले आहे. टाकीचे बांधकाम रखडल्याने नागरिक संतापले आहेत. यामुळे हडकोतील नागरिकांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा महानगरपालिका प्रशासनास दिला आहे.

शहरातील हडको भागातील दोन लाख नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नवजीवन काॅलनी-यादव नगरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलालगत जलकुंभ बांधण्यासाठी लागणारी जागा महापालिकेने उपलब्ध करून दिली. मात्र मंजूर असलेल्या जलकुंभाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून सुरू करता आले नाही. यासंदर्भात "टेंडरनामा" अधिक माहिती घेतली असता शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५० जलकुंभ उभारण्यात येणार आहेत, त्यापैकी मागील तीन वर्षांत कंत्राटदाराने केवळ १३ जलकुंभ उभारण्यात आले. यापैकी केवळ दोनच जलकुंभ महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आले.‌ अद्याप ११ जलकुंभांचे काम अर्धवट आहे. उर्वरित ३७ जलकुंभाचे कुठलेही काम करण्यात आले नाही. यासंदर्भात टेंडरनामा प्रतिनिधीने संबंधित कंत्राटदाराच्या प्रतिनिधींशी संपर्क केला असता मनुष्यबळाचा आणि निधीचा तुटवडा असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

याच योजनेंतर्गत हडकोतील यादवनगर-नवजीवन काॅलनी येथील जलकुंभाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने तीन वर्षांपूर्वी सुरू केले होते. मात्र, कंत्राटदाराकडुन केवळ काॅलम टाकण्यात आले. पुढे त्यात काहीही झाले नाही. याचा परिणाम हडको परिसरातील १४ वार्डांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.हडको परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात यादवनगर-नवजीवन काॅलनी परिसरातील महानगरपालिकेने २००७ मध्ये जलकुंभाचा अर्धवट सांगाडा पाडून तेथे नवीन २० लक्ष क्षमतेचा जलकुंभ व वाढीव पाण्याची गरज भागविण्यासाठी नवीन जलकुंभ बांधण्याच्या कामास महानगरपालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास मंजुरी दिली होती.याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपविली होती.मात्र, अजून जलकुंभाच्या  बांधकामास  मुहूर्त सापडला नाही.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने कार्यारंभ आदेशानुसार १६ ते १७ महिन्यात शहरातील सर्व जलकुंभाचे  बांधकाम करणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंते आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे शहरात केवळ १३ जलकुंभाचे बांधकाम होऊ शकले. ३१ मार्च २०२४ पर्यंत किमान १३ जलकुंभांचे बांधकाम करून महानगरपालिकेला हस्तांतरित करणे बंधनकारक होते. मात्र कंत्राटदारामार्फत जलकुंब उभारण्यात कमालीचा हलगर्जीपणा झाला आहे.शहरात महापालिकेच्या ताब्यातील अस्तित्वातील जलकुंभ जीर्ण झाले आहेत. उन्हाळ्यात शहराची तहान भागविण्यासाठी महानगरपालिकेने दोनशे कोटी खर्च करून नवीन जलवाहिनी टाकली. मात्र शहरात साठवन क्षमता नसल्याने त्याचा काही परिणाम झाला नाही. जर कंत्राटदाराने जलकुंभ वेळीच बांधले असते आणि महानगरपालिकेच्या ताब्यात दिले असते, तर शहरातील सर्व भागांना समान व सुरळीत पाणी पुरवठा करता आला असता.