Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

मराठवाड्यातील दहा लाख शेतकऱ्यांच्या शेतात लोंबू लागल्या विजेच्या तारा अन् वाकलेले पोल

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मराठवाड्यातील दहा लाख शेतकऱ्यांच्या शेतात विजेबाबतच्या अनेक समस्या निर्माण होत असताना आता चक्क शेतकऱ्यांच्या शेतात विजेच्या तारा लोंबकळत असल्याने आणि पोल वाकलेले असल्याने शेतात दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने येथील तारा पूर्ववत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांतील ४ लाख ९४ हजार ९१८.३० हेक्टरवर शेती क्षेत्र आहे. शेतकरी कापसासह रबी पिके, फळबागांद्वारे उत्पन्न मिळवतात. गेल्या दोन महिन्यांपूर्वी अवकाळी पावसाचा आणि आता नियमित सुरू असलेल्या पावसामुळे वारा - वादळाचा फटका बसल्याने ९ लाख ६७ हजार ५६१ शेतकरी आर्थिक आधीच अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात ७०९ कोटी ९२ लाख ४१ हजार रुपयांचा मदतनिधी शासनाने जाहीर केला होता. तो तर मिळालाच नाही. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड , लातूर,बीड, धाराशिव आदी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात शेताशेतात सध्या झालेल्या पावसामुळे शेतातील विजेच्या तारा चक्क खाली येत जमिनीला टेकण्याची वेळ आली आहे. सदर तारांमुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होऊन शेतातील कामे करणे जिकरीचे झाले आहे.

शेतातील तारा खाली आल्याने शेतात मशागत करताना व शेतमालाची आयात - निर्यात करताना तसेच शेतात फिरताना बैलगाडी , ट्रॅक्टर व इतर वाहनांना तारा घासत आहेत त्यामुळे आधीच दुष्काळात मराठवाड्यात दररोज तीन शेतकऱ्यांचा बळी जात असताना वीजतारा आणि वाकलेल्या पोलमुळे देखील दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील अपघात तसेच दुर्घटना टाळण्यासाठी विभागीय आयुक्तांनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तंबी देणे गरजेचे आहे. विद्युत वितरण कंपनीकडे स्थानिक शेतकरी
तारा पूर्ववत करण्याची मागणी करतात. पण अधिकारी तारा तुमच्या, पोल तुमचे केवळ दुरूस्तीची हमी आमची असे म्हणत काम टाळतात तसेच काही भागात शेतातील विजेच्या तारा तातडीने दुरुस्त केल्या जातील असे सांगतात, परंतु वर्षानुवर्षे समंस्या हल होत नाही. यासंदर्भात प्रतिनिधीने विभागीय आयुक्तालयाकडे विचारणा केली असता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विजेसंबंधी समंस्या सोडविण्यासाठी शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव दिला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.‌ सन २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले, तर २०२२ - २३ - हंगामात पावसाचा खंड राहिल्याने खरीप हातून गेले. पुढे रब्बी हंगामात २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ दरम्यान विभागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. शेताशेतात विजेचे खांब कोलमडले, तारा जमिनीवर आल्या.‌ त्यातच मराठवाड्यातील ४ लाख ७६ हजार ७७८.९८ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने केले. ४ हजार २१८.७५ हेक्टरवरील बागायत क्षेत्राला, तसेच १३ हजार ९२०.५७ हेक्टवरील फळपिकांना फटका बसला.याच समंस्येसोबत विजतारांची गंभीर समंस्या असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.