Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : कोट्यवधींचे टेंडर काढूनही अखंड विजेचे 'महाविरण'चे नियोजन का फसले?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : अवकाळी पावसाने हजेरी लावली की महावितरणचा भोंगळ कारभार उघडा पडतो आणि नियोजनशून्य कारभार समोर येतो. हलकासा जरी पाऊस आला तरी संपूर्ण शहरात पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे, काही भागात विजेचा पुरवठा कमी दाबाने होणे यासह तां‌त्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते.

काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अवकाळी पाऊस घोषित केल्यानंतर महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी सालाबादप्रमाणे त्याच त्या मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधींची कामे दिली गेली. मात्र तरीही अवकाळी पावसाळा सुरू झाल्यानंतर विजेच्या पुरवठ्यात खंड पडू लागला आणि महावितरण कंपनीचे आश्वासन फोल ठरले.‌ अवकाळी पाऊस हा, फक्त ट्रेलर आहे, मग खऱ्या पावसाळ्याचे आवाहन महावितरण कसे पेलणार, हा खरा प्रश्न आहे. कोट्यवधींचा चुराडा करूनही अवकाळी पावसात महावितरणचे नियोजन फसले. त्यामुळे पावसामुळे वीज गायब होण्याचे प्रकार घडत आहेत.

हवामान खात्याने अवकाळी पावसाचा आणि वारा वादळाचा अंदाज व्यक्त करताच महावितरण कंपनी त्याच त्या मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे देते. त्या मान्सूनपूर्व कामांमध्ये महावितरणने वीज वाहिन्यांपर्यंत वाढलेल्या झाडांची छाटणी करणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, विजेचे खांबांसह काही ठिकाणी विजेच्या तारा बदलण्याची कामे केल्याचा दावा केला.

तुटलेले पीन आणि डिस्क इन्सुलेटर्स बदलण्याची कामे केली गेली. याशिवाय वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्ट्रेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, विजेचे खांब आणि तारांचे मजबुतीकरण, विजेचे खांब आणि तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे आदी कामेही पूर्ण करण्यात आल्याचा दावा केला. शहरासह जिल्ह्यात आणि जालना शहरातही ही कामे केली जात असल्याचे सांगितले.

ग्रामीण भागात तंत्रज्ञ व लाइनमन यांना नाइट शिफ्ट थांबण्याचे आदेश दिले गेले, असे असताना अवकाळी पावसाळ्यात वीज सेवा खंडित होत आहे. एकीकडे या कामासाठी महावितरण सालाबाद प्रमाणे दहा ते बारा कोटी रुपये खर्च करते. दुसरीकडे संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाय योजना राबवण्याचे आदेश देते.

शहरात जवळपास ३ लाखाहून अधिक वीज ग्राहक आहेत. शहर विभाग एक आणि शहर विभाग दोन अशा दोन विभागातून शहरातील वीजपुरवठा करण्यात येत असतो. यंदाच्या वर्षी महावितरण कार्यालयाने दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी वीज व्यवस्था दुरुस्त ठेवण्याबाबत निर्देश दिले होते. या अंतर्गत मान्सूमपूर्व कामे करण्यात आली आहेत.

काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात शहरात २ ‘पॉवर ऑन व्हील्स’ वाहने तयार ठेवण्यात आली होती. ही वाहने आता दिसेनासी झाली आहेत. एखाद्या भागात ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास तेथे ‘पॉवर ऑन व्हील्स’च्या माध्यमातून वीजपुरवठा केला जात होता. याशिवाय बिघाडातील दुरुस्तीसाठी आठ लॅडर व्हेइकल खरेदी करण्यात आल्या होत्या. याशिवाय २६ सबस्टेशन येथे  लाइन स्टाफची नियुक्ती केल्याचा दावा महावितरण कंपनीने केला होता.‌

दोन विभागात वीज कर्मचाऱ्यांची नाइट ड्यूटीसाठी नियुक्ती केल्याचे अधिकारी म्हणत होते. मग मान्सूनपूर्व कामे आणि इतक्या नियोजनामुळे यावर्षी अवकाळी पावसातच वीजपुरवठा कसा खंडीत होऊ लागला. त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकारी यांची मिली भगत असल्याचा संशय बळावत आहे.

शहरातील अनेक डीपींजवळ कचरा टाकण्यात येतो. या कचऱ्यामुळे डीपींला धोका आहे. डीपींजवळ कचरा टाकू नये, असे पत्र महानगरपालिकेला देण्यात आले. त्यानंतरही महानगरपालिकेकडून डीपीजवळील कचरा हटविण्याची कार्यवाही केली जात नाही. त्याचा फटकाही शहरवासीयांना बसण्याची शक्यता आहे.