sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा कोणी केला बट्ट्याबोळ? 'या' रस्त्याचे काम अर्धवट कसे?

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग - १७ आडगाव तांडा ते वडखा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे अर्धवट काम करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्याला सहा वर्षे देखील होत नाहीत, तोच रस्त्याची निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुरावस्था झाल्याचे व काही ठिकाणी रस्त्याचे कामच न झाल्याने सरकारची दिशाभूल झाल्याचे चित्र ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर स्पष्ट झाले आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत आडगाव सरक तांडा - वडखा हा साडेपाच किमी अंतराच्या रस्त्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने ३ कोटी ४३ लाख ७५ हजार रुपये टेंडर रकमेनुसार मंजूर केले होते. या रस्त्याचे काम छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐ. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते.

संबंधित कंत्राटदाराला २४ मे २०१७ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्याने २३ मे २०१८ दरम्यान काम संपविणे गरजेचे होते. मात्र कधी मनुष्यबळाची कमतरता तर कधी गौणखनिजाची कमतरता तर कधी निधी नसल्याचे कारण सांगून कंत्राटदाराने मुदत संपल्यानंतर काम पूर्ण केले. परंतु काही वर्षातच रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे व डांबरखडी निघण्याचा प्रकार सुरू झाला आहे. 

पाच वर्षे देखभाल- दुरुस्‍तीचे काय?

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामावर लावण्यात आलेल्या फलकावरून हे काम झाल्यावर रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम पाच वर्षांपर्यंत संबंधित ठेकेदाराची असेल. पण फलक नावापुरतेच असल्याचे समोर आले आहे. फलकावर संबंधित ठेकेदाराकडून रस्ता देखभाल व दुरुस्ती तसेच इस्टिमेट देखील लावण्यात आले आहे. पण फलक लावले आहे व त्यानुसार कार्य करायचे आहे; हेच संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार विसरले की काय, असा प्रश्न नागरिक करीत आहे. 

रस्‍त्याचे काम अर्धवट

रस्त्याबाबत एवढेच प्रकरण नसून वडखा गावादरम्यान रस्ताच न बनविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा रस्ता अपूर्ण सोडण्यात आला आहे, की रस्ता पूर्ण झाला असल्याचे दाखविण्यात आला आहे, याबाबतचे रहस्य गुलदस्त्यात आहे. असे असून देखील रस्ता पूर्ण झाल्याचा अहवाल कोणी दिला असेल? मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या रस्त्याबाबतची कल्पना नसावी का? असेही प्रश्न या रस्त्याबाबत उपस्थित होत आहेत. 

हा मार्ग बनला धोकादायक

ज्या घाटात अनेक भीषण अपघात घडले आहेत, गौणखनिजाची अनेक वाहने पलटी झाली तो आडगाव सरक तांडा ते वडखा मार्गेपर्यंतचा दोन किलोमीटर घाटमार्ग अतिशय धोकादायक बनला आहे. फक्त साडेपाच मीटर अरुंद असलेल्या या मार्गावर एकावेळी दोन गाड्या जाऊ शकत नाहीत. समोरासमोर गाड्या आल्यास त्यातील एका गाडीला थोडे खाली उतरावेच लागते.

आडगाव सरक ते वडखा घाटरस्ता दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र घाट रस्त्याच्या कडेला साईडपट्ट्यांची अत्यंत खराब अवस्था आहे. खड्डेयुक्त अशा या साईड पट्ट्यांवरून येणारी माती ही कायमची डोकेदुखी बनली आहे. त्यातच या घाटमार्गावरचे काम करताना घाटाच्या दरीच्या साईडने रस्त्यावर पांढरे पट्टे आणि रात्रीच्या वेळी चमकणारे रेडियम किटकॅट ऑईज न बसवल्याने तसेच धोकादायक वळणांवर सूचनाफलक न लावल्याने‌ चालकांना घाट मार्गाचा अंदाज येत नाही.