Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar Water Shortage : संभाजीनगर शहरावर कोसळणार जलसंकट; 'हे' आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावाने तळ गाठला असून, तलावात केवळ साडेचार फूट जलसाठा शिल्लक आहे. परिणामी हडकोतील १६ वार्डांवर जलसंकट कोसळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यासंदर्भात टेंडरनामाने परिसरातील माजी नगरसेवक रुपचंद वाघमारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, जरी तलावाने तळ गाठला असला तरी याला दुसरा पर्याय जायकवाडी धरणाचा असल्याने नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. जायकवाडीतून १३० ते १३५ एमएलडी पाणी उचलले जाते. त्यातही गळती मोठ्या प्रमाणावर असल्याने १०० एमएलडीच पाणी मिळते. त्यात हर्सूल धरणाने तळ गाठल्याने आता जेमतेम एक आठवडा पाणी पुरवठा शक्य आहे. यामुळे याचा परिणाम संपूर्ण शहरावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.

शहराची तहान भागवण्यासाठी तत्कालीन हैद्राबाद सरकारने छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजना राबवली होती. ५ ऑगस्ट १९५४ दरम्यान ३० लाख ५६ हजार ३९७ हजारात हर्सूल धरण बांधले होते.‌ सदर धरणाचे काम ५ जुलै १९५६ दरम्यान पूर्ण करण्यात आले होते. हैद्राबाद सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ.‌ बी. राधाकृष्णन यांच्या पुढाकाराने हे धरण बांधण्यात आले होते.‌ सदर धरणातून गाळ काढून महानगरपालिकेने‌ २०१३ पासून १६ वॉर्डांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.

आता तलावात केवळ साडेचार फूट पाणी शिल्लक आहे. सध्या तलावाने तळ गाठायला सुरवात केली आहे. तलावाची क्षमता सुमारे ३० फुटांपर्यंत आहे. या तलावातून जटवाडा, हर्सुल व दिल्लीगेट परिसरातील १६ वार्डांना  पाणीपुरवठा केला जातो. हर्सूल तलावाच्या जुन्या व नव्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाच एमएलडी पाणी दिल्लीगेट जलकुंभात चढवण्यात येते.‌

उन्हाचा पारा ४० अंशावर सरकल्याने दिवसेंदिवस तलावाचे बाष्पीभवन होत असून तलावातील जलसाठा आटत चालला आहे.  त्यामुळे आता पुढील आठवड्यापासून जायकवाडी धरणातून पाणी घेण्याचा ताण महानगरपालिकेवर वाढणार आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी शहरावर जलसंकट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.‌ यातच महानगरपालिकेचा वीज, वेळ, पैसा सगळ्या बाबतीत भुर्दंड सोसावा लागणार आहे.

तलाव उंचावर असल्यामुळे दिल्लीगेटपर्यंत नव्याने ८० लाख रुपये खर्च करून जलवाहिनीतून ते पाणी आणले जाते. तेथे जुन्या व नव्या शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते पाणी दिल्लीगेट येथील जलकुंभात जाते. तेथून जुन्या शहरातील १६ वॉर्डांतील म्हणजेच सुमारे दीड लाख लोकांना त्याचे वितरण होत आहे. मात्र आता माजी नगरसेवक वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाणी एक आठवडा पुरेल एवढेच आहे. त्यामुळे मे, जून महिना पूर्णपणे जायकवाडी धरणावर या भागातील नागरिकांची तहान भागवावी लागणार आहे.

त्यामुळे महानगरपालिकेने आत्तापासूनच तलावातील गाळ आणि खोलीकरण, रुंदीकरण केल्यास यंदाच्या पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रयत्न केल्यास जुलै महिन्यात  पावसाने दमदार हजेरी लावल्यास धरणात जलसाठा वाढेल.‌ त्यामुळे पाणीसाठ्यात भर पडेल आणि पुढील वर्षी मे, जून पर्यंत जलसाठा टिकून राहील, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.