Traffic Booth Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : स्मार्ट सिटीचे स्मार्ट बूथ कुणामुळे पडले आडवे; ना स्मार्ट सिटीचे लक्ष, ना वाहतूक शाखेचे!

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जी-२० दरम्यान शहरातील चौक चकचकीत करण्यासोबतच वाहतूक पोलिसांचे बूथ चकचकीत व स्मार्ट असावेत यासाठी शहरातील विविध चौकात २५  ठिकाणी स्मार्ट बूथ लावण्यात आले होते.‌ परंतु जी-२० चे पथक निघून गेले आणि छत्रपती संभाजीनगर स्मार्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अनेक ठिकाणी लावलेले बूथ धारातीर्थी, दुभाजकात आडवे तर कुठे कानाकोपऱ्यात धुळ खात पडले आहेत. मुळात वार्यामुळे तकलादू असणार्या अशा हलक्या वजनाच्या स्मार्ट बूथची काही एक आवश्यकता नसल्याचे  चौकांमधील वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र स्मार्ट सिटीतील एका प्रकल्प संचालकाची मर्जी राखण्यासाठी जालन्याच्या एस.आर.जे. स्टील प्रा.लि. कंपनीतून हे स्मार्ट बूध सि.एस.आर.फंडातून मागविण्यात आल्याचे टेंडरनामा तपासातून पुढे आले आहे. याबाबत अद्याप बैठका चालू आहेत. कंपनीचे बिल सुध्दा देण्यात आलेले नाही. त्याआधीच हे बूथ स्मार्ट शहराची रया वाया घालवत असल्याचे दिसत आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर लावलेले जालना रोडवरील हायकोर्ट चौक, जळगाव रोड, व्हीआयपी रोडवरील सिग्नलवरही स्मार्ट सिग्नल बसविण्यात आले. स्मार्ट सिटी तर्फे शहरात विविध चौकांत ७०० पेक्षा जास्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सिग्नलचे कंट्रोल कमांड सेंटर महानगपालिका तसेच पोलीस आयुक्तालयात आहे. मात्र या कॅमेर्यांच्या माध्यमातून सिग्नलवर होणारी वाहनांची गर्दी यावर नियंत्रण केले जात नाही. रेड आणि ग्रीन सिग्नलचे टायमर देखील बिघडलेले आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे शहरात एकुण २५ सिग्नल स्मार्ट केले गेले. हायकोर्ट चौकाच्या स्मार्ट सिग्नल समोरील दुभाजकातच स्मार्ट बूथ आडवे पडले आहे. सोबतच जालना रोड, जळगाव रोड, व्हीआयपी रोडवरील अनेक ठिकाणी कार्यान्वित केलेल्या स्मार्ट सिग्नलसमोरच स्मार्ट बूध धुळखात अडगळीत पडले आहेत. काही ठिकाणी वाहनांच्या धडकेत जखमी होऊन वाहतूकीला अडथळा निर्माण करत आहेत.‌ शहराच्या सौंदर्यात वाढ करण्याचा दावा करत रस्ते, सुरक्षेचा विचार करून स्मार्ट सिग्नल बसविण्यात आलेत, त्या सिग्नलच्या समोरच हे स्मार्ट बूध सौंदर्यात बाधा निर्माण करत आहेत. एकीकडे शहरात स्मार्ट सिग्नल बसवले असताना रस्त्यावरील चौकाचौकात  वाहतूक विभागाच्या कर्मचार्यांना चौकातील गर्दी हात हलवत नियंत्रित करावी लागत आहे . मग कोट्यावधी रुपये खर्च करून बसवलेले हे स्मार्ट सिग्नल का नियंत्रण ठेवू शकत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात प्रतिनिधीने रविवारी शहरातील २५ चौकात पाहणी केली. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना विचारले असता या स्मार्ट सिग्नलची दृश्यमानता बरोबर नसल्याचे समोर आले.वाहन चालकांना वाहतुकीचे उंच दिवे पाहताना मानेला त्रास होत असल्याचे समोर आले आहे. वाहनांचा वेगावर नियंत्रण ठेवण्यात हे स्मार्ट सिग्नल अपयशी ठरल्याचाही मुद्दा समोर आला.

शहर वाहतूक शाखेतील पोलिसांना चौकाच्या मध्यभागी उभे राहूण वाहतूक नियंत्रण करण्यासाठी अजूनही बूथची प्रतीक्षा असल्याचा मुद्दा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.पोलिसांसाठी स्मार्ट बूथ खरेदी करण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. स्मार्ट सिटीने यासाठी २५  ठिकाणी लावलेले स्मार्ट बूथ होत्याचे नव्हते झाले आहेत. नियमानुसार वाहतूक पोलिसांना वाहतूक बूथमध्ये पंखा, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र, बसण्याची व्यवस्था, पिण्यायोग्य पाणी, माईक आणि बायोमेट्रिक यंत्र असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे स्मार्ट सिटीने स्मार्ट सिग्नलसोबतच रस्त्यावर बेशिस्त वाहतूकीला आळा घालण्यासाठी लावलेले लाऊडस्पीकर देखील बंद असल्याचे यानिमित्ताने टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे.