water shortage (Pani) Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 5 मंत्र्यांच्या संभाजीनगर जिल्ह्यात प्यायला पाणी मिळेना!

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जिल्ह्यातील चार तांडे आणि एक गाव तर असे आहेत की ज्या ठिकाणी नागरिक पाणी मिळत नाही म्हणून गाव सोडून छत्रपती संभाजीनगर शहराकडे स्थलांतर करत आहेत. तर गावात पाणी नसल्यामुळे इतर गावातील नागरिक आपल्या मुलींचे लग्न या गावातील मुलांशी लावत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी 'टेंडरनामा'शी बोलताना दिली आहे.

१२० धरणांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी संकट निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दक्षिणेला गोदावरी नदी वाहते. जिल्ह्यात जवळपास ९२० धरणे आहेत. मात्र मागील वर्षी कमी झालेले पाऊसमान व यंदाच्या वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठला आहे. सध्या धरणांमध्ये २८.०६ टक्के जलसाठा असून तो गेल्यावर्षी ४०.२८ टक्के होता. यात सर्वाधिक धरणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून ९२० धरणे असून मागील वर्षाच्या तुलनेत जलसाठा यंदा ३५ टक्क्यांनी घटला आहे. गेल्यावर्षी येथे ४६.७९ टक्के पाणीसाठा होता. तो आता फक्त ११.८९ टक्क्यांवर आला आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील जलसाठा ११.८९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे संध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ६३६ टँकरद्वारे ३९३ गावे व ५९ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र खड्डेमय रस्ते आणि घाटाची वळणे अशा अडथळ्याच्या शर्यतीत १२ हजारच्या टँकरला गळती लागत असल्याने पाण्याची नासाडी होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव व पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी अत्यंत खाली आली आहे. आपेगाव धरणात २६. ८६ टक्के, तर १०२ टीएमसी क्षमतेच्या जायकवाडी धरणात सध्या केवळ ७.९७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर आहे.‌ उन्हाचा तडाखा असाच राहिल्यास पाणीपुरवठ्याची स्थिती आणखी चिंताजनक होणार आहे.‌

राज्यात पाणी टंचाईच्या बाबतीत दोन केंद्रीय मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा अग्रक्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जिल्ह्यातील चार तांडे आणि एक गाव तर असे आहे की ज्या ठिकाणी नागरिक पाणी मिळत नाही म्हणून गाव सोडून शहराकडे स्थलांतर करत आहेत. तर गावात पाणी नसल्यामुळे इतर गावातील नागरिक आपल्या मुलींचे लग्न या गावातील मुलांशी लावत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

या गावांमध्ये भीषण उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. अक्षरशः महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागत आहे.

गेल्या महिन्यांपासून जिल्ह्यातील विहिरी, धरणे, तलावांनी तळ गाठला असल्याने नागरिकांना फक्त पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याकरता गावातील हातपंप देखील आटले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत गावागावात बारा हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत.‌ त्यात आठ दिवसाआड तर कधी चार दिवसात एका कुटुंबासाठी दोनशे लिटरचा एक ड्रम पाणी दिले जाते. टँकर गावात येताच हंडाभर पाण्यासाठी बायाबापड्यांची धावपळ सुरू होते.

पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी व आबाळ होत असल्याने जिल्ह्यातील गावागावात टँकरच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली. मात्र आडातच नसल्याने पोहोऱ्यात कोठून येणार अशी स्थिती आहे. यासाठी जिल्हा प्रशासन देखील हतबल झालेले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व तालुक्यातील फुलंब्री मतदार संघाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघातील आडगाव सरक व काटशेवरी तांडा असे एकूण चार तांडे आहेत. याच तांड्यांपुढे वडखा हे गाव आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आमदार संतोष दानवे व खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील भिवपूर गावात भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

गावात पाण्याची समस्या असल्याने बाहेरून जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागामार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. आडगाव सरक व काटशेवरी सह चार तांड्यावरील दोन हजार रहिवाशांसाठी बारा हजार लिटर क्षमतेचे चार टँकरच्या चार दिवसाआड फेऱ्या केल्या जातात. यातून एका कुटुंबाला दोनशे लिटरचा एक ड्रम पाणी दिले जाते. रस्त्यावर ड्रम ठेवले जातात. तेथून दूर वरून नागरिकांना पाणी वाहावे लागते. तांड्यातील विहिरींना पाणीच नसल्याने टँकरचे पाणी पुरत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

वडखा गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील बनगाव धरणातील विहिरीतून पंधरा दिवसाआड पाणी ओतले जाते. पण आता धरणातील विहिर देखील आटल्याने गावातील विहिर देखील कोरडी पडणार असल्याचे गावकरी म्हणाले. ही बातमी करत असताना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दानवेंच्या मतदार संघातील भिवपूर गावातील केळा नदीवरील सिमेंट बंधारा आटल्याने दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात टँकरद्वारे दोन फेऱ्या केल्या जातात.

गावातील सार्वजनिक हौदात पाणी ओतले जाते. टँकरची वेळही निश्चित नाही. गावातील महिलांना रात्री - अपरात्री पाणी हंड्याने वहावे लागते. पाणी टंचाईमुळे गावातील मुलांना कोणी मुलगी देत नाही आहे. गावातील नागरिक हे गाव सोडून इतरत्र पाण्याच्या ठिकाणी जात आहेत, असे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.