Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 'या' मुख्य रस्त्याचे ऐन पावसाळ्यात काढले काम त्यामुळे नागरिक...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या चंपाचौक ते महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत रस्त्याच्या भिजत घोंगड्यावर टेंडरनामाने सातत्याने वृत्तमालिकाद्वारे वाचा फोडली. अखेर स्मार्ट सिटी
प्रशासनाने या रस्त्याच्या कामाला सुरूवात केली; पण कामाचा मुहुर्त चुकल्याने आता नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी ऐन पावसाळ्यात व सणासुदीच्या काळात रस्त्याचे खोदकाम केले. त्यावर गिट्टीचे डोंगर उभे केले आणि दिड महिन्यापासून काम बंद केले. यानंतर मनपाने रस्त्याच्या मधोमध भूमिगत गटार योजना शिफ्ट करणे, जीव्हीपीआरने पाइपलाइन टाकणे व महावितरण कंपनीने विद्युत खांब न हटवल्याने काम थांबल्याचे कारण अधिकाऱ्यांनी पुढे केले आहे. स्मार्ट सिटीने दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लाऊन दुरूस्तीसाठी रस्ताच बंद केल्याने शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्याची वाहतूकच बंद करण्यात आल्याने परिणामी शहागंज, बुढ्ढीलेन, मंजुरपुरा, चेलीपुरा, निजामगंज, रेंगटीपुरा या भागातील चिंचोळ्या अरूंद रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी जाम झालेली पहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांची मोठी त्रेधातिरपीट उडत असल्याचे दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील चंपाचौक ते महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी कैफियत 'टेंडरनामा'कडे असंख्य व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांनी मांडली. चंपाचौक-महापालिका मुख्य प्रशासकीय इमारती दरम्यान किराडपुरा, रोशनगेट, शाहबजार, चेलीपुरा, लोटाकारंजा, बुढ्ढीलेन, मंजुरपुरा, शहागंज हा रस्ता उत्तरेकडील व्हीआयपीरोडवरील गणेश काॅलनी, म्युनिसिपल काॅलनी, लेबर काॅलनी, किलेअर्क, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय, शासकीय महाविद्यालय, ज्युब्लीपार्क, हिमायत बाग, सलीम अली सरोवरसह अन्य शेकडो वसाहतींना जोडतो. या शिवाय दक्षिणेकडील गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज परिसरातील शहरातील जुन्या बाजारपेठांना देखील जोडतो. सिडकोतील जळगाव रोड ते बजरंग चौक - मौलाना आझाद चौक - रोशनगेट - चंपाचौक - शाहबजार- चेलीपुरा - लोटाकारंजा - बुढ्ढीलेन - महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत हा शहरातील सिडको आणि जुन्या शहराला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या अनेक बाजार पेठांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पार चाळणी झाली होती.‌त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असे. परिणामी वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती केल्यास जालना रस्त्याची कोंडी फोडण्यास मोठी मदत मिळणार आहे. कारण शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी जालना रस्त्याच्या समांतर हा महत्वाचा रस्ता गणला जातो. मात्र या महत्वाच्या रस्ता दुरूस्ती कडे ना अधिकाऱ्यांचे, ना पदाधिकाऱ्यांचे लक्ष होते.

या रस्त्याच्या बांधकामासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून १४ कोटीचा निधी मंजुर करण्यात आला होता. यातून या रस्त्याचे "नशीब उजळणार" अशा वल्गना करत काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती. मात्र त्यानंतर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांना या रस्त्याचा विसर पडला होता. टेंडरनामा ने यावर सातत्याने प्रहार करताच आता सद्यस्थितीत मोठ्या पावसाळ्यात आणि ऐन सनासुदीच्या काळात या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याचे कारभाऱ्यांनी काम हाती घेतले आहे. त्यात पर्यायी रस्त्याची व्यवस्था न केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. किमान दररोज दोन लाख वाहनधारक नियोजनशून्य अधिकाऱ्यांच्या गलथानपणा ची शिक्षा भोगत आहेत. स्मार्ट सिटीमार्फत शहरात १११ रस्त्यांसाठी ३१७ कोटी रुपये मंजूर केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नसल्याचे समोर आल्यावर तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांनी रस्त्यांची संख्या कमी केली. मात्र नंतर आलेले महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांनी रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी स्मार्ट शहर बससेवेसाठी राखीव ठेवलेल्या निधीची एफडी मोडून १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.‌ त्यात १११ पैकी ८० रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आल्याचा दावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी केला आहे. मात्र यातील एकही रस्ता धडाचा नसल्याचे व तांत्रिक दृष्ट्या चुकीचे काम असल्याचे टेंडरनामाने सातत्याने उघड केले.‌ मोठ्या पाठपुराव्यानंतर आयआयटीच्या तपासणीत देखील ते सिध्द झाले. मात्र मिंध्या प्रशासनाने कंत्राटदारावर कुठलीही कारवाई केली नाही.‌

जुन्या शहराला सिडको हडकोला जोडणारा चंपाचौक ते महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत या मार्गावर प्रचंड खड्डे होते. सदर रस्त्याचा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या यादीत समावेश असल्याचे म्हणत महापालिका प्रशासनाने गत चार वर्षांपासून कसलीही डागडुजी केली नाही.‌ काही महिन्यांपूर्वी महापालिकेने याच मार्गावरील मंजुरपुरा ते रोशनगेट दरम्यान अतिक्रमणे काढली होती. १९९१ च्या शहर विकास आराखड्यानुसार हा रस्ता १८ मीटर अर्थात ६० फुटाचा दर्शविण्यात आला आहे. त्यानुसार या रस्त्यासाठी १४ कोटीहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मंजुरपुरा ते चंपाचौक असे काम करण्यात येणार होते. मात्र ठरल्याप्रमाणे महानगरपालिकेने गत काही महिन्यांपासून जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या स्थलांतरित केल्या नाहीत.‌ रस्त्याचे मोजमाप आणि अतिक्रमण काढताना या भागातील नागरीकांच्या भावना दुखवत बड्यांच्या अतिक्रमणांवर हातोडा मारला नाही. त्यानंतर जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून दिलेल्या मुदतीत जलवाहिनी टाकण्यासाठी मुहुर्त हुकला. महावितरण कंपनीने विद्युत खांब शिफ्ट केले नाहीत. आता मात्र वर्षानुवर्षे खड्ड्याच्या जाण्यापासून सुटका मिळेल,या आशेवर मात्र कारभाऱ्यांनी पाणी फिरवले. या रस्त्याचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी पावसाळ्याआधी करायला हवे होते.‌ मात्र आता सरकारी धोरणानुसार पावसाळ्यात रस्त्यांचे खोदकाम करण्यास मनाई असताना अशा धोरणांना बगलेत ठेऊन हे काम सुरू केले. दरम्यान महानगरपालिका, महावितरण व जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराचा योग्य समन्वय नसल्याने ऐन पावसाळ्यात व सनासुदीच्या काळात काम सुरू केल्याने जवळपास सर्वच बाजारपेठांवर परिणाम होत आहे.तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम आधीच केले असते, तर छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा मिळाला असता.