Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : राजमाता जिजाऊ उद्यानाचे रूपडे पालटणार; ऑक्सिजन हबचे होणार संवर्धन

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तत्कालीन सिडको प्रशासनाच्या माध्यमातून सिडको एन-२ येथील बी-सेक्टर प्रबोधनकार ठाकरे नगरातील आदर्श काॅलनीत विकसित करण्यात आलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उद्यानात बच्चे कंपनीसह नागरिकांना बागडता यावे यासाठी महापालिका प्रशासनाने विकास कामांना पसंती दिली आहे. या उद्यानामध्ये नागरिकांची गर्दी व्हावी, चिमुकल्यांना खेळता यावे, यासाठी उद्यानांची गुणवत्ता राखण्यासाठी उद्यानांची सुरक्षा यासह सर्वसमावेशक वार्षिक संवर्धन व संरक्षण करण्याकरिता एकत्रित कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच उद्यानांचे नूतनीकरणाची कामे देखील करण्यात येत आहेत. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

तत्कालीन सिडको प्रशासनाने सिडको एन-२ प्रबोधनकार ठाकरे नगर भागात बी-सेक्टर येथील आदर्श काॅलनीत उद्यानासाठी मोठी त्रिकोणी प्रशस्त जागा आहे. सुरूवातीला सिडको प्रशासनाने उद्यानासाठी आरक्षित भुखंडावर कुठलेही विकास कार्य केले नाही. त्यानंतर सिडकोचे महापालिकेत हस्तांतरण झाल्यानंतर महापालिकेने आरसीसी व्यासपीठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे आणि पथदिव्यांची सोय केली. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना दिलासा मिळाला. या जागेवर धार्मिक व सांस्कृतिक तसेच परिसरातील नागरिकांचे छोटेमोठे कार्यक्रम होऊ लागले. नागरिक एकत्र आल्याने येथे लोकसहभागातून भारतीय वंशावळीतील झाडांचा मोठा ऑक्सिजन हब तयार झाला. मात्र गेल्या काही वर्षांपासून उद्यानाची दक्षिणेकडील भिंत मोडकळीस आली होती. पावसाळ्यात भिंतीच्या दिशेने असलेल्या अंतर्गत वसाहतीच्या रस्त्याकडून जाताना नागरिकांना भिती वाटत असे. नागरिकांच्या तक्रारीनंतर वार्ड अभियंता मधुकर चौधरी यांनी तातडीने दखल घेत सुरक्षाभिंतीसाठी १५ लाख रूपयाचे अंदाजपत्रक तयार केले. त्यांच्या प्रस्तावावर कार्यकारी अभियंता राजीव संधा, बी.डी.फड, शहर अभियंता एस.बी.देशमुख यांनी कुठलाही वेळ न घेता प्रस्ताव मंजुर केला, अखेर एका ठेकेदारामार्फत सुरक्षाभिंतीचे काम देखील दर्जेदार पणे सुरू केले.आता विद्युत विभागामार्फत देखील पथदिवे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय मुख्य उद्यान अधिकारी डाॅ.विजय पाटील यांनी देखील उद्यानाच्या जागेत चिमुकल्यांसाठी खेळण्या बसवणवयाचा निर्णय घेतला आहे.

असेच लक्ष सर्वत्र द्या

महापालिकेची शहरात शेंकडो उद्याने आहेत. अनेक रस्ता दुभाजक, ट्री बेल्ट व मोकळ्या जागा आहेत.यांच्या स्थापत्यविषयक व विद्युत विषयक बाबी तसेच त्यांची उद्यानांची सुरक्षा यासह सर्वसमावेशक वार्षिक संवर्धन व संरक्षण करण्याकरिता एकत्रित कामे हाती घेणे आवश्यक आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे. ज्योतीनगर भागातील कवितेची बाग, सहकार नगरातील लोककला उद्यान, सिडको टाऊन सेंटर भागातील कॅनाॅट उद्यान, सिडको एन - १ भागातील डाॅ.  शामाप्रसाद उद्यान, सी सेक्टर भागातील उद्यान, टीव्हीसेंटर भागातील स्वामी विवेकानंद उद्यान, हडको येथील वाहतूक उद्यान, सिध्दार्थ उद्यानातील वाहतुक उद्यान, हर्सूल येथील स्मृती उद्यान याकडे देखील बाॅटनिकल उद्यान तसेच पंडित जवाहरलाल नेहरु उद्यानाप्रमाणे याही उद्यानांचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. शहरातील मुकुंदवाडी, पुष्पनगरी, चिकलठाणा, कैलासननगर, भावसिंगपुरा, प्रतापगडनगर, बेगमपुरा, सिडको एन - सहा स्मशानभूमींच्या पायाभुत सुविधांसाठी व सुशोभिकरणासाठी महानगरपालिकेने शासनाकडे दहा कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे, ही आनंदाची बाब असली तरी इतर स्मशानभूमींसाठी महापालिकेने शहरातील नामांकित उद्योजक यांच्या सीएसआर फंडातून तसेच सजग नागरिकांना एकत्रित करून लोकसहभागातून स्मशानभूमी, उद्याने तसेच रस्ता दुभाजकांची व वाहतूक व सौंदर्य बेटांची दुरवस्था बदलावी, असा सुर महापालिकेतील सेवा निवृत्त अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. 

तत्कालीन महापालिका आयुक्त कृष्णा भोगे, पुरूषोत्तम भापकर, सुनिल केंद्रेकर, ओमप्रकाश बकोरिया यांनी असे प्रयोग केल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींच्या निधीतून शहरातील महानगरपालिकेच्या बहुतांश उद्यानांमध्ये खेळणी व बेंचेस बसविले आहेत.ओपन जीम साहित्य बसविले आहे. केवळ सरकारी निधीतून कंत्राटदार आणि अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या आर्थिक हितापोटी बसवलेल्या या कोट्यावधींच्या वस्तूंची  सद्य:स्थितीत असलेली खेळणी व ओपन जीम साहित्य नादुरुस्त झाले आहे. त्याचा नागरिकांना काही दिवसांपुरता उपभोग घेता येतो. त्याच्या दुरुस्तीसाठी नंतर दुर्लक्ष केले जाते. त्यासाठी वार्षिक दरकराराद्वारे पॅनल तयार करणे गरजेचे आहे. त्या अंतर्गत सर्व उद्यानांचे सर्वेक्षण करून प्राधान्यानुसार उद्यानांतील खेळणी व ओपन जीम साहित्य दुरुस्त करण्याचे काम हाती घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे शहरातील उद्यानांच्या आकर्षणात आणखी भर पडणार आहे.