Road Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : देवळाई रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागणार; महापालिका, जीव्हीपीआर...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील महापालिका हद्दीतून जाणाऱ्या व छत्रपती संभाजीनगरसह पैठण तालुक्याला जोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - देवळाई - भिंदोन - गाडीवाट - घारदोन - कचनेर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-३५च्या दहा किलोमीटर दुरूस्ती साठी पीडब्लुडीने १८ कोटीचे टेंडर प्रसिद्ध केले होते. यात जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर,या कंन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. कंपनीने साई टेकडी ते वन विभागाच्या वनोद्यानापर्यंत काम केले. पण देवळाईचौक ते वनोद्यानापर्यंत गत सहा महिन्यांपासून काम रखडले आहे. यासंदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप वीजेचे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पथदिव्याचे खांब हटविले नाहीत. दुसरीकडे शहराचा पाया उखडणार्या जीव्हीपीआर कंपनीने अद्याप जलवाहिनेचे काम केले नसल्याने या तीन विभागांच्या हलगर्जीपणामुळे सातारा-देवळाईकरांना मोठ्या प्रमाणात खड्डे आणि धुळीचा सामना करावा लागत आहे.

शहरातील देवळाई चौक ते देवळाई गावापर्यंत जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळणी हाेऊन माेठमाेठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत. या भागात नवीन वसाहतींमध्ये सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे हाल हाेत आहे. याच रस्त्यावर प्रसिद्ध शाळा, कृषी विद्यापीठ आणि साई टेकडीचा समावेश आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे साई टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांना माेठा त्रास सहन करावा लागत आहे. ठाकरे सरकारच्या काळात या १० किमी रस्त्यासाठी साडेसहा कोटी मंजूर केले होते. परंतु, ठाकरे सरकार कोसळताच शिंदे सरकारने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे देवळाई रस्त्याचे काम रखडले होते. परंतु, हा रस्ता तयार करावा, अशी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन शिंदे सरकारने साडेदहा कोटी ऐवजी थेट अठरा कोटी मंजुर केल्याने नागरिकांत आनंदोत्सव साजरा झाला हाेता. 

शहरासह सोलापूर महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या मार्गावर छाेट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर छोटे-मोठे अपघातही हाेतात. तसेच, सततच्या वाहतूक काेंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी साई टेकडीवर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावर खड्डे असल्याने पर्यटकांनाही माेठा त्रास सहन करावा लागताे. या रस्त्याची गेल्या पाच वर्षांपूर्वी ५०५४-०१०६ जिल्हा व इतर मार्ग या लेखाशिर्षाखाली एक कोटी ९१ लाख ४७ हजार ४१२ रूपयांना तांत्रिक मान्यता मिळाली होती. ४ टक्के कमी दराने टेंडर भरणार्या चारनिया कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्यात या संपुर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र या रस्ताखाली संपुर्ण काळीमाती असल्याने तसेच महापालिका हद्दीत येणाऱ्या या रस्त्यावर कुठेही स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा नसल्याने शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट वसाहतीचे सांडपाणी रस्त्यावरच येत असल्याने पाच वर्षातच हा नवीन तयार केलेला रस्ता उखडल्याने नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागते. हा रस्ता कचनेर येथील जैन मंदिराकडे जातो. त्यामुळे तेथे जाणाऱ्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागताे. पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप येते. त्यामुळे छोटे-मोठे अपघातही हाेतात. या परिसरात सध्या ६० पेक्षा अधिक वसाहती आहेत.

या प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४० पेक्षा अधिक सोसायट्या आहेत. या रस्त्यावर रॉयल ऑक्स इंग्लिश स्कूलसह छोट्या-मोठ्या १५ पेक्षा अधिक शाळा, एमजीएम कृषी विद्यापीठ, साई टेकडी, साई मंदिर, कचनेर जैन मंदिर आहे. तसेच, सोलापूर हायवेसुद्धा या रस्त्याला जोडलेला आहे. त्यामुळे बीड बायपासकडून सोलापूर हायवेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या माेठी आहे. या रस्त्याचा सखल भाग आणि आजुबाजुला दाट वसाहती आणि स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेचा अभाव त्यामुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी देवळाई चौक ते गावापर्यंत तीन किमीचा रस्ता काँक्रिटचा तयार करण्यात येणार होता . मात्र रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ आणि पर्यटकांसह शहरी हद्दीतील नागरिकांना या कंच्च्या रस्त्यामुळे  गैरसोय सोसावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांना पाठ व मानेच्या मणक्याचा त्रास होत आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ आणि दुसरीकडे धुळे-सोलापुर हायवे या राष्ट्रीय  महामार्गाला हा रस्ता मिळत असल्याने या मार्गाने अवजड वाहने जातात. रस्त्यात खड्डे असल्याने दुचाकीचे अपघातही होतात. देवळाई रस्त्याच्या बाबत टेंडरनामा ने सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करून प्रशासनाला जागे केले. त्यामुळे टेंडरनामा वृत्ताची त्वरित दखल घेऊन रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, अधीक्षक अभियंता विवेक बडे तसेच कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेकर यांनी रस्त्याचे सर्व्हेक्षण केले. याकामी येरेकर यांनी मुख्य व अधीक्षक अभियंत्यांच्या मार्गदर्शनाने तातडीने अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला तातडीने अठरा कोटीची मान्यता देखील मिळाली आणि अखेर टेंडर प्रक्रिया पार पडली होती.रस्त्यासाठी निधी मंजूर असताना महानगरपालिका, महावितरण आणि मजीप्राच्या नियोजनशून्य कारभार्यांच्या कारभारामुळे रस्त्याचे काम रखडले आहे.