Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : एसटी काॅलनी की ‘चिखलदरा’? जलवाहिनीसाठी खोदून ठेवला रस्ता

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना रोडलगत उदयास आलेल्या एस.टी.काॅलनीचे सिमेंट रस्ते छान गुळगुळीत होते. पण जलवाहिनीच्या कामासाठी ते खोदले गेले... पावसाळ्यात आता नागरिकांना चिखलाच्या दलीदलीतून वाटा शोधूनही सापडत नाहीत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रत्येक वेळी जलवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यांसाठी ५४ कोटीची तरतूद असल्याचे सांगत वेळ मारून नेत आहे. मात्र अद्याप एस.टी. काॅलनीसह इतर कोणत्याही रस्त्याची दुरूस्ती केली जात नसल्याने छत्रपती संभाजीनगरकरांची वाट अवघड झाली आहे. त्यामुळे रस्ते त्वरित पुन्हा गुळगुळीत करण्याची मागणी शहरातील प्रत्येक वसाहतीतील रहिवाशांतून होत आहे.

जालना रस्त्याला लागून असलेल्या अनेक एकर जागेवर एस.टी. महामळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिडको एन-२ प्रबोधनकार ठाकरे नगरात एस.टी.काॅलनी वसाहत उभारली. खूप कर्मचाऱ्यांनी येथे प्लॉट घेऊन घरे बांधली. मोठ्या सोसायटीची स्थापन केली. पण अनेक वर्षांपासून रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नव्हता.अनेकवेळा नागरिकांनी महापालिकेकडे मागणी केली.‌ तेव्हा या भागातील रस्ते गुळगुळीत केले, ते  रस्ते देखील आता शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी होत्याचे नव्हते झाले आहेत. एस.टी. काॅलनीतील सर्व परिसर चिखलमय झालेला आहे प्रमुख  रस्तावर चिखल पसरलेला आहे. पाऊस आल्यावर चिखल आणि रस्ता वाळल्यावर नागरिकांना धुळीचा त्रास सोसावा लागत आहे. अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरून जाताना शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाणे कठीण होत आहे. महिन्याभरापूर्वी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी जर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण रस्ते करत नसेल, तर जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून किंमत वसूल करून रस्ते दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले होते. मात्र अद्याप त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. दुसरीकडे ५४ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे तूनतूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वाजवत आहे. मात्र अद्याप शहरातील कोणत्याही रस्त्याची दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे ही तरतूद कागदावरच आहे, असे दिसू लागल आहे.

जुन्या शहरासह नवीन शहर व सातारा - देवळाई परिसरातील सर्वच भागातील ७०० किमीचे रस्ते नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदून ठेवलेले आहेत. भर पावसाळ्यात हे काम केले जात असल्याने त्याचा पावसामुळे नागरिकांना अधिक त्रास होत आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी झालेले कोट्यावधींचे रस्ते होत्याचे नव्हते झाले आहेत; परंतु एकाही रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी कुणीही तसदी घेत नाही. पावसाळ्यात रस्ते चिखलमय झाल्याने जेष्ठ नागरिक, आजारी रूग्ण व गरोदर मातांना तसेच नागरिकांसह शाळकरी मुलांना घसरगुंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून शहरातील सर्वच रस्त्यांची माती झाल्याने कोट्यावधी रूपये खड्ड्यात आणि पाण्यात गेले आहेत.