Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अनेक वर्षे रखडलेल्या 'या' बायपास रस्त्यावर‌ अखेर महापालिकेचा बुलडोझर

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मोबदल्यासाठी आडकाठीची बाब बनून झेंडा चौकाजवळील काही फुट रस्त्यासाठीच्या जागेचे अतिक्रमण ते सिमेंटीकरणापर्यंतचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले काम अखेर आता पूर्ण होणार आहे. महापालिकेच्या नगररचना, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. सलग दोन दिवस रस्त्याला बाधीत दोनशे घरांवर बुलडोझर फिरवल्याने व या रस्त्याचे तातडीने सिमेंटीकरण केले जाणार असल्याने आता जालना रस्त्याच्या वाहतूक कोंडीला व वारंवार होणाऱ्या अपघातांना ब्रेक लागणार आहे. चिकलठाणा विमानतळ ते रामनगर - विठ्ठलनगर - प्रकाशनगर - तानाजीनगर - संघर्षनगर - छत्रपतीनगर - पायलट बाबानगरी - झेंडा चौक - जयभवानीनगर - विश्रांतीनगर - मोरया मंगल कार्यालय - शिवाजीनगर - बीड बायपास देवळाई चौक ते थेट पैठणरोडला हा रस्ता जुळत असल्याने जालना रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उत्तम पर्याय होणार आहे. या संदर्भात "टेंडरनामा" सलग अडीच वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी अखेर अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्याची हिम्मत दाखवली.‌

सुमारे सात वर्षांपूर्वी जालनारोडपासून झेंडा चौकापर्यंतचा रस्ता महापालिकेने विकसित केला. झेंडाचौकापासून पुढे विश्रांतीचौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण झालेच नाही. मात्र, विश्रांतीचौकापासून पुढे शिवाजीनगरपर्यंत रस्ता दोन पदरी आणि विश्रांतीनगर ते झेंडाचौक अलीकडे रस्त्यावर दोनशे घरांचे बेकायदेशीर बांधकाम होते. येथील शहर विकास आराखड्यातील २४ मीटर रस्त्यावरील बेकायदेशीर घरांवर कारवाई रखडल्याने येथून वाहतूक करता येत नसे. रस्त्याच्या मधोमध व वाहतुकीसाठी बंद असलेला सुमारे ३७० मीटर अंतरात दोन्ही बाजूंना दोनशे घरांचा वाहतुकीसाठी अडळा बनला होता. यावर तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार व तत्कालीन महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी जालना रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अन नित्याचेच अपघात टाळण्यासाठी जालनारोड ते थेट बीड बायपासला जोडणाऱ्या उपरोक्त उल्लेखीत रस्त्यावर सात वर्षांपूर्वीच नगररचना विभाग व अतिक्रमण विभागामार्फत मार्किंग केली होती. मात्र बकोरिया आणि अमितेशकुमार या सिंगम फेम अधिकार्यांच्या बदलीनंतर आलेल्या महापालिका आयुक्तांनी या महत्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी बीड बायपासच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना बाळापूर रेल्वे गेट क्रमांक ५६ कडून कच्च्या रस्त्याने जाताना रात्री खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने व पावसाळ्यात चिखल डाबक्यातून वाट काढत कसरत करावी लागत असे, याशिवाय रस्त्याचा प्रश्न निकाली लागत नसल्याने जालनारोडवरील वाहतुक कोंडीचा प्रश्न व अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 

केवळ ३७० मीटर अंतरात अतिक्रमणांनी अडकलेल्या या रस्त्याच्या संदर्भात "टेंडरनामा"ने सातत्याने प्रहार केला. दरम्यान तत्कालीन महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीनंतर तत्कालीन प्रभारी आयुक्त सुनिल केंद्रेकर, डी.एम.मुगळीकर, डाॅ. विनायक निपुण, आस्तिककुमार पांण्डेय व जी. श्रीकांत , पूर्व मतदार संघाचे आमदार तथा राज्यमंत्री अतुल सावे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तद्नंतर संबंधित सर्व आयक्तांनी अधिकार्यांचा फौजफाटा सोबत घेऊन पाहणी केली. मागील पाच वर्षात पाच आयुक्तांनी पाहाणी केल्यानंतरही अतिक्रमणांचा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यात प्रशासनाला यश न आल्याने जागा संपादित झाली नाही. दुसरीकडे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याप्रमाणे रस्त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे पोलिस आयुक्त व त्यासाठी पाठपुरावा करणारे नेतृत्व या शहराला लाभले नाही. मात्र या महत्वाच्या बायपास संदर्भात "टेंडरनामा"ने पाठपुरावा सुरूच ठेवला होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या गॅस गळतीने जालनारोड व त्याला जोडणारे सर्व जोड रस्ते एक किलोमीटर पर्यंत बंद करण्यात आले होते. दरम्यान भल्या पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत सिडको हडकोसह शहरातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.‌ दरम्यान गॅस गळतीच्या ठिकाणी पाहणी करायला आलेले महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत तसेच पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच भविष्यात पुन्हा अशी अपघातमय घटना घडली तर शहराची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रस्त्याची कोंडी फोडण्यासाठी झेंडा चौक ते विश्रांतीनगर, लक्ष्मण चावडी ते कैलासनगर स्मशानभूमी ते एमजीएम, पीईएस काॅलेजचे रस्ते व दमडीमहल ते आकाशवाणी शहर विकास आराखड्यातील हे महत्वाचे पर्यायी रस्ते कधी मोकळे करणार , असा थेट सवाल करताच पोलिस आयुक्तांनी संध्या या गॅस गळतीच्या गंभीर संकटातून मोकळे होऊ यात नंतर तो प्रश्न हाती घेऊ, असे म्हणत मौन पाळले. तर दुसरीकडे लोकांनी दोन रूपयाच्या मोबदल्यासाठी वाटा अडवल्याचे म्हणत संताप व्यक्त केला होता.

मात्र "टेंडरनामा"च्या थेट सवालानंतर जी. श्रीकांत यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्यासाठी महापालिकेच्या अधिकार्यांसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह महावितरण कंपनी व शहर वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली.‌ मात्र समिती स्थापन होऊन १६ दिवसाचा कालावधी लोटल्यानंतर केवळ बैठका आणि चर्चेतच धन्यता मानत होते. जी. श्रीकांत यांनी सात दिवसात अहवालाची अपेक्षा व्यक्त केली असताना अहवाल गुलदस्त्यातच ठेवण्यात आला होता. यावरही " टेंडरनामा " खरपुस समाचार घेत वृत्त प्रकाशित केले व सातत्याने पाठपुरावा केला.तद्नंतर अहवाल सादर करण्याच्या हालचालींना देखील वेग आला असून पथक रस्त्यावर उतरले आहे. त्याचाच परिणाम म्हणून अखेर जी. श्रीकांत यांनी झेंडाचौक ते विश्रांतीनगर या मार्गावरील रखडलेल्या ३७० मीटर लांबीत सिमेंटीकरणाचा निर्णय घेतला. अन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याआधी रस्त्यावरील २०० बेकायदेशीरपणे बांधलेल्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचा निश्चय ठाम केला. त्यांनी महानगरपालिकेचा अतिक्रमण व नगररचना विभागासह पोलिस प्रशासनाला सज्ज केले. दरम्यान पथक वसाहतीत दाखल होताच. बेकायदेशीर बांधकाम करणार्यांनी जमाव जमवत पथकावर हल्ला चढवत दगड फेक केली. दरम्यान पथकाने जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र जमावाचा भडका अधिक उडाल्याने पथकाला लाठीमार व अश्रुधुराचा मारा करावा लागला. दरम्यान पथकातील काही अधिकारी व कर्मचारी तसेच लाठी हल्ल्यात जमावातील काही लोक जखमी झाले. मात्र,असे असले तरी जी. श्रीकांत यांनी कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे.

पैठणरोड पासून सातारा-देवळाई व बीड बायपास कडून शिवाजीनगर, मोरया मंगल कार्यालय ते नेहरू काॅलेज ते विश्रांतीनगर मार्गे थेट जालनारोड, धुत हाॅस्पीटल, चिकलठाणा विमानतळ तसेच सिडको बसस्थानक, हायकोर्ट व सिडको - हडको, मुकुंदवाडी, म्हाडा काॅलनी, मुर्तीजापूर, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीसह जालनारोडवरील इतर सरकारी व निमसरकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच, पैठणरोड, सातारा-देवळाई, बीड बायपास व शिवाजीनगर आणि गारखेडा व अन्य भागातून  दररोज लाखो नागरिक नोकरीनिमित्त या रस्त्याने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत ये-जा करतात. मात्र, आता संपूर्ण रस्ता दुहेरी आणी प्रशस्त होणार असल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. झेंडा चौक ते विश्रांतीनगर मध्येच रस्त्यात बेकायदेशीर बांधकामे असल्याने रस्ता रखडला होता. परिणामी वाहनचालकांना मोठा वळसा घेत जालना रस्त्याचाच वापर करावा लागत असे. वाहतुक कोंडीने जालना रस्त्यावर अपघात होत होते. मात्र, या रस्त्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात प्रशासनाला यश येत नव्हते. " टेंडरनामा " ने या रस्त्याचा श्वास मोकळा करून तात्काळ डांबरीकरण व्हावे म्हणून महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आता रस्ता बाधित बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात येत व तातडीने सिमेंटीकरण केले जाणार असल्याने वाहतुक विना अडथळा व सुरळीत होणार असल्याने संपुर्ण शहरवासी समाधान व्यक्त करत आहेत.

शासन अनुदानातून केलेल्या शाहुनगर ते मोरया मंगल कार्यालय ते सिडको १२ वी योजना या सात वर्षांपूर्वी महानगरपालिका मार्फत १४ कोटी २८ लाख ६६ हजार २२५ रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्याचा झेंडा चौक ते विश्रांतीनगर दरम्यान गळा दाबला होता. हा रस्ता १४ मीटर रूंद असून पहिल्या टप्प्यात २१०० दुसर्या टप्प्यात १६०० व तिसऱ्या टप्प्यात ३७० मीटर लांबीचा आहे. यातील पहिला टप्पा शाहुनगर ते झेंडा चौकापर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. दुसर्या बाजूने शिवाजीनगर १२ वी स्कीम ते मोरया मंगल कार्यालय ते विश्रांतीनंतर पर्यंत रस्त्याचे काम कंत्राटदार जे.पी. कंन्स्ट्रक्शन कंपनीने पूर्ण केले आहे. मात्र झेंडा चौक ते विश्रांतीनगर या ३७० मीटर रस्त्यात दोनशे घरांचे बांधकाम झाले आहे. सिडकोच्या विकास आराखड्यानुसार हा २४ मीटरचा रस्ता दर्शविण्यात आला आहे. मात्र सिडकोने नेमक्या या पट्ट्यात जमीन अधिग्रहण न केल्याने या रस्त्याचा गुंता कायम राहीला. यासंदर्भात हा रस्ता पुर्ण करण्याबाबत महानगरपालिकेकडे "टेंडरनामा" सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या रस्त्याचे काम पूर्ण झाले तर चिकलठाणाकडील बीड बायपास व पैठण रस्त्याकडे जाणारी वाहने विठ्ठलनगर - रामनगर - प्रकाशनगर - शाहुनगर -  तानाजीनगर - संघर्षनगर - छत्रपती नगर - पायलट बाबानगरी जयभवानीनगर-विश्रांतीनगर मार्गे थेट १२ वी स्कीम शिवाजीनगर मार्गे देवळाई चौकातून बीड बायपासला पोहोचतील यामुळे जालनारोडवरील १५ ते २० टक्के वाहतूकीचा ताण कमी होईल , असे महत्त्व देखील प्रशासनाला पटवून सांगितले होते.