Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : कोट्यवधींचा खर्च करून दुरुस्ती केलेला क्रांती चौक उड्डाणपूल पुन्हा कोणी घातला खड्ड्यात?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना रस्त्यावर क्रांतीचौक  परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविताना दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) या पुलाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. G-२० दरम्यान कोट्यवधी रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी उड्डाणपुलावरील व पुलाखालील सेवा रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र महानगरपालिकेने विविध कामांसाठी खड्डे करून नागरिकांचे हाल वाढविण्याचे काम केले आहे.

छत्रपती संभाजीनगर - जालन्याकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याला पैठणगेटकडून रेल्वे स्टेशनकडे जाताना अडचण होती. सरकारच्या मान्यतेनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या भागात उड्डाणपूल बांधला. त्यामुळे वाहतुकीचा मोठा अडथळा दूर झाला. पुलाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी २०१८ पर्यंत राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होती, मात्र त्यानंतर पूल रितसर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला.

गेल्या काही वर्षांत जालना रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. साहजिकच रहदारीतही वाढ झाली. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १९ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्यात आला. राज्य रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन मुख्य अभियंता एम. झियाउद्दीन, अधीक्षक अभियंता दीपक टेकळीकर, विकास पाटील, कार्यकारी अभियंता विवेक दुबे, शरद अष्टपुत्रे, प्रमिला वनारे, नुतनकुमार बाफना यांच्या काळात उड्डाणपूल बांधण्यात आला.

या प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर येथील अतुल मिरजगावकर यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ठाण्यातील राजदीप बिल्डकाॅन व टेक्नोजेम प्रा. लि. या कंत्राटदारामार्फत पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र पुलाचे एकदा बांधकाम झाल्यानंतर त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते.

यावर न्यायालयाने ताशेरे ओढल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाने खड्डे बुजवले होते. यानंतर पूल रितसर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. दरम्यान, G - २० च्या काळात कंत्राटदार जी. एन. आय कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत पुलाची धावपट्टी व खालील सेवा रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. 

मात्र रेल्वे स्टेशनकडून क्रांतीचौक जलकुंभाकडे येणारी महानगरपालिकेची १९०० मीटर व्यासाची मोठी जलवाहिनी रस्त्याच्या मधोमध आहे. सदर जुनाट जलवाहिनी दुरुस्तीसाठी महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत वारंवार रस्ते खोदून खड्डे तयार केले जातात. पण खड्ड्यांची दुरुस्ती केली जात नाही. अमरप्रित सिग्नलकडून अदालत रोडकडे जातानाच्या पुलावरील रस्त्यावर सुरवातीलाच मोठे खड्डे पडले आहेत.

भरधाव येणारे वाहन या खड्ड्यात जाऊन अपघात होत आहेत. तेथून पुढे आले की रस्त्याच्या मधोमध छोटे - मोठे खड्डे पडले आहेत. पुलाखालील सेवा रस्त्यांचीही अशीच परिस्थिती आहे. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा फटका मात्र नागरिकांना बसतो आहे.