Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 14 गावांची तहान भागविणाऱ्या 'त्या' प्रकल्पाकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जयपूर - बनगाव - दुधड लहुकी मध्यम प्रकल्पातील धरणाला पावसाळ्यात गळती लागते. पाटबंधारे विभागाचे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप जयपूर व बनगाव येथील शेतकऱ्यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना केला. 

दगडी बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने पावसाळ्यात धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. धरणाच्या बंधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात जंगली झाडे वाढली आहेत. यामुळे हे धरण अखेरचा श्‍वास घेत आहे.

छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभागाच्या मालकीचे लहुकी मध्यम प्रकल्पांतर्गत लहुकी धरण आहे.‌ गेल्या काही वर्षांत धरणाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याबाबत प्रतिनिधीने शाखा अभियंता विराज बोलने यांच्याशी संपर्क केला असता दोन वर्षांपूर्वी धरणातील बंधाऱ्यालगत झाडे झुडपे काढण्यासाठी दोन लाख रुपये खर्च केला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र पावसाळ्यात पाळू अथवा धरणाच्या दगडी भिंतीतून पाणी गळती होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे ग्रामस्थांनी धरण दुरुस्तीची कार्यवाही करावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. चौका घाटातील डोंगरदऱ्यांमधून वाहत येणारे पाणी धरणात साचते.

सध्या लहुकी मध्यम प्रकल्प जानेवारी महिन्यातच कोरडा पडला आहे. धरणात ५० ते ६० विहिरी आहेत.‌ त्या देखील आटल्याने दुधड, करमाड व शेंद्राबन पाठोपाठ चौदा गावांवर पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.

जयपूर - बनगाव - दुधड परिसरातील लहुकी या मध्यम प्रकल्पातून शेतीपाठोपाठ करमाड, दुधड, गाढेजळगाव, शेवगा, भांबर्डा, बनगाव, जयपूर, कुबेर-गेवराई, वरुड, वरझडी, करंजगाव, मुरुमखेडा, वडखा, शेंद्राबन या चौदा गावांना या धरणातून पाणी पुरवठा होतो. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने येथील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे.

धरण बांधल्यापासून आजतागायत धरणातील गाळ उपसा झाला नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.‌ काही गावातील नागरिक धरणाच्या पाळूचा शेतात येण्यासाठी वापर करतात.‌ त्यामुळे त्याची दुरुस्ती करावी, असे ग्रामस्थांनी सांगितले. धरणातील गाळ आणि झाडे काढणे गरजेचे आहे. धरणातील भूसंपादन केलेल्या काही जागेत अनधिकृतपणे शेततळे तयार केल्याचे दिसून आले. धरणात जल मिशन योजनेंतर्गत विहिरीचे काम सुरू आहे. धरण बांधल्यापासून १० ते १२ वेळा भरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा आहे धरणाचा लेखाजोगा

- धरणासाठी भूसंपादन केलेले एकूण बुडीत क्षेत्र : २०१.५६ हेक्टर

- बंधाऱ्याची लांबी : ११६२ मीटर

- धरणातील साठवण क्षमता : ६.५८ दलघमी

- धरणाचे बांधकाम व झालेला खर्च : १९७२/३४ लाख १८ हजार

- बुडीत क्षेत्रापासून बंधाऱ्याची उंची : १५ मीटर