G Shrikant Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 4 आयुक्तांना जे जमले नाही ते G Shrikant यांनी करून दाखविले!

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-२ मुकुंदवाडी परिसरातील एका अर्धवट बायपास रस्त्याचे काम महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी मार्गी लावले असून कंत्राटदाराकडुन जोमाने काम सुरू करण्यात आले आहे. त्यांना याकामी शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, उप अभियंता एस. एस. पाटील तसेच नगररचना विभागासह अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभागाचे प्रमुख सौरभ जोशी यांचे मोठे सहकार्य लाभले.

मागील सहा वर्षांपासून रखडलेल्या या महत्वाच्या बायपास रस्त्याची जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांसह दोन महिन्यांपूर्वी पाहणी केली होती. यानंतर रस्त्याला बाधीत तब्बल दोनशे अतिक्रमणे काढण्यात आली होती. तद्नंतर तातडीने रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्याने आता जालना रस्त्यावरची कोंडी फुटणार आहे. याचप्रमाणे एमजीएम ते लक्ष्मण चावडी तसेच गोदावरी पाटबंधारे विभाग समोरून जालनारोड ते दमडीमहल या रस्त्यांंचे काम मार्गी लावल्यास बहुतांश जालनारोडला पर्यायी मार्ग उपलब्ध होतील.

टेंडरनामाने या महत्वाच्या बायपास रस्त्यांबाबत सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित करून वाचा फोडली होती. यानंतर प्रतिनिधीने सातत्याने महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत, शहर‌ अभियंता ए.बी. देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याचे महत्व कळाले. यानंतर जी. श्रीकांत यांनी रस्त्याची पाहणी केली होती.

दरम्यान शहर विकास आराखड्यातील योजनेनुसार जालनारोड - विठ्ठलनगर - शिवाजीनगर असा २४ मीटरचा रस्ता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी या रखडलेल्या या महत्वाच्या रस्त्याच्या कामाला गती दिली. यापूर्वी मागील सहा वर्षांत चार आयुक्तांचा पाहणीचा फार्स ठरला होता. मात्र जी. श्रीकांत यांच्याकडून अखेर रस्ता पूर्ण करण्याची कारवाई करण्यात आली.

सरकारी अनुदानातून शाहुनगर ते मोरया मंगल कार्यालय ते सिडको १२ वी योजना या बीड बायपास ते थेट जालना रस्त्याला जोडणार्या बायपास रस्त्याचे सहा वर्षांपूर्वी महानगरपालिका मार्फत १४ कोटी २८ लाख ६६ हजार २२५ रुपये खर्चून बांधकाम करण्यात आले होते. हा रस्ता १४ मीटर रूंद असून पहिल्या टप्प्यात २१०० दुसऱ्या टप्प्यात १६०० व तिसऱ्या टप्प्यात ३७० मीटर लांबीचा अंदिजपत्रकात दर्शविण्यात आला होता. यातील पहिला टप्पा शाहूनगर ते झेंडा चौकापर्यंत तर‌ दुसऱ्या बाजूने शिवाजीनगर १२ वी स्कीम ते मोरया मंगल कार्यालय ते विश्रांतीनंतर पर्यंत रस्त्याचे काम कंत्राटदार जे. पी. कंन्स्ट्रक्शन कंपनीने गुळगुळीत केले होते. मात्र पुढे झेंडा चौक ते विश्रांतीनगर या ३७० मीटर रस्त्यात पक्क्या घरांचे बांधकाम असल्याने  शहर विकास आराखड्यानुसार या २४ मीटरला गत सहा वर्षांपासून ग्रहन लागले होते.‌

सिडकोने नेमक्या या पट्ट्यात जमीन अधिग्रहण न केल्याने या रस्त्याचा गुंता कायम राहीला होता. यासंदर्भात टेंडरनामा वृत्ताची दखल घेत या भागाचे माजी नगरसेवक तथा गटनेते भाऊसाहेब जगताप, शहर सुधार समितीचे सभापती मनोज गांगवे, माजी नगरसेवक बाळासाहेब यांचा सदर अर्धवट रस्ता पूर्ण करण्याबाबत महानगरपालिकेकडे गत सहा वर्षांपासून पाठ पुरावा सुरुच होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, आता या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने  चिकलठाणा, जालनारोडकडून बीड बायपास व पैठण रस्त्याकडे जाणारी वाहने विठ्ठलनगर - रामनगर - प्रकाशनगर - शाहूनगर -  तानाजीनगर - संघर्षनगर - छत्रपती नगर - पायलट बाबानगरी जयभवानीनगर-विश्रांतीनगर मार्गे थेट १२ वी स्कीम शिवाजीनगर मार्गे देवळाई चौकातून बीड बायपासला पोहोचतील यामुळे जालनारोडवरील ५० टक्के वाहतूकीचा तान कमी होईल.

यापूर्वी तत्कालीन आयुक्त डी.एम. मुगळीकर, डाॅ. विनायक निपुण, आस्तिककुमार पाण्डेय, डाॅ. अभिजित देशमुख यांनी रस्त्याची पाहणी करून काम पूर्ण करण्यासाठी आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या पाहणीचा केवळ फार्स ठरला होता. यानंतर जी. श्रीकांत यांनी अर्धवट  झालेल्या रस्त्याची  पाहणी केली होती. या रस्त्यासाठी सरकारी अनुदानातील रकमेतून टेंडर झाले आहे. कंत्राटदार सुध्दा निश्चित झाला आहे. महानगर पालिकेकडे निधी उपलब्ध आहे. मात्र पक्क्या बांधकामाचा अडथळा असल्याने गत सहा वर्षांपासून या महत्त्वाच्या बायपासचे काम रखडले होते.‌

या रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत टेंडरनामाने सुरूवातीपासूनच वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. विशेषतः गॅस गळती झाल्यानंतर जालनारोडवरील कोंडीबाबत टेंडरनामाने अत्यंत अभ्यासात्मक वृत्त प्रकाशित केली होती. त्यामुळेच या रस्त्याबाबत जी. श्रीकांत यांनी झटपट निर्णय घेतला. उशिरा का होईना पण जी. श्रीकांत यांनी इतरांना जे जमले नाही, ते करून दाखवल्याने त्यांचे या कामाबाबत कौतूक होत आहे. १२ वी स्कीम शिवाजीनगर ते मोरया मंगल कार्यालय ते विश्रांतीनंतर पर्यंत रस्त्याच्या मधोमध विद्यूत खांब देखील हटविण्यात आले.