Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अखेर महावीर चौकातील अतिक्रमणांवर फिरला बुलडोझर

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या महावीर चौकात अतिक्रमणांमुळे वाहनचालक त्रस्त होते. यासंदर्भात टेंडरनामाने सोमवारी वृत्त प्रकाशित करताच मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने शहर वाहतूक शाखेच्या मदतीने वाहतुकीला अडथळा ठरणारे १३ अतिक्रमणे हटविली.

महावीर चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. नगर, पुणे, खुलताबादकडून येणारी वाहने याठिकाणी थांबतात. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते. त्यात काही अतिक्रमणधारकांनी रस्ता गिळंकृत केला होता. महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.

यापूर्वी टेंडरनामाच्या वृत्तानंतर तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानंतर महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाने तेथील व्यापारी, नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पण, दुकानदार, नागरिकांनी नोटीसांना प्रतिसाद दिला नव्हता. दरम्यान, याठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनचालकांमध्ये वाद होऊन सातत्याने तणाव निर्माण होत असे.  त्यामुळे महापालिकेच्या पथकाने २६ जुलै २०२२ रोजी पांण्डेय यांच्या आदेशानंतर  रस्त्यापासून पंधरा फुटापर्यंत अतिक्रमणे भुईसपाट केली होती.

दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी काही नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. पण, मूळ जागा मालकांनी सहकाऱ्याची भूमिका घेतली होती. अतिक्रमणे काढल्याने महावीर चौकात पंधरा फूट रस्ता मोकळा झाला होता. ही कारवाई महानगरपालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद यांच्या पथकाने केली होती. मात्र पथकाने पाठ फिरवतात येथे अतिक्रमण " जैसे थे " झाले होते.

महानगरपालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर राजरोसपणे अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ज्याला जिथे जागा दिसेल तेथे अतिक्रमण करून ठेवले आहे. अरुंद रस्त्यांवर वाहनांची बेकायदेशीरपणे पार्किंग करण्यात येते. फुटपाथवर पावलापावलांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मुख्य रस्त्यांवरून चालणेही जिकिरीचे ठरत आहे. या गंभीर प्रकाराकडे महानगरपालिका  प्रशासन अजिबात गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. मागील काही महिन्यांपासून न्यायालयाच्या आदेशानंतर देखील महानगरपालिका प्रशासन  राबवत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम निव्वळ पाट्या टाकणारी दिसत आहे.

‘टेंडरनामा’ने ५ फेब्रुवारी रोजी शहरातील प्रमुख रस्त्यांची अतिक्रमणांमुळे कशी वाईट अवस्था झाली आहे, याचा सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला होता. याची दखल पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतली. त्यांनी त्वरित उपायुक्त तथा शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शिलवंत नांदेडकर, महानगरपालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत, यांच्याशी संपर्क केला. महावीर चौकातील वळणमार्गावरच होत असलेल्या कोंडी बाबत चर्चा केली.

तद्नंतर महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानंतर पोलिस उपायुक्त तथा शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शिलवंत नांदेडकर यांच्या व क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या मदतीने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त मंगेश देवरे, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, शेख युनुस यांनी महावीर चौकातील डाव्या वळण मार्गाची वाहतूक सुरळीत राहावी, मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे असू नये , यासाठी  मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी तेथील मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई केली.   ‘टेंडरनामा’च्या वृत्ताची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.

इकडेही लक्ष द्या...

मुकुंदवाडीत रस्त्यावरच भरतो बाजार

सिडको एन - मुकुंदवाडी भाजीमंडईत थेट रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. मुकुंदवाडी ते दीपाली हॉटेल, नगरनाका ते कॅम्ब्रीज चौक या १४ किलोमीटर अंतरापर्यंत फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. आली. हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रोडवरील सर्व अतिक्रमणे जशास तशी आहेत.

चंपाचौक ते आझाद चौक

चंपाचौक ते आझाद चौक या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेली वाहने, हातगाड्या, व्यापाऱ्यांची मोठमोठी अतिक्रमणे यामुळे. या भागातून दुचाकी वाहनही सुरळीत नेता येत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, वाहनांची पार्किंग करण्यात येते. पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून या भागातून ये-जा करावी लागते.

हे आहेत धोकादायक चौक

लिंक रोड टी पॉइंट, रेल्वेस्टेशन चौक, जिल्हा न्यायालय चौक, क्रांतीचौक, अमरप्रीत चौक, आकाशवाणी चौक, सेव्हन हिल चौक, जळगाव टी पॉइंट, मुकुंदवाडी, महानुभाव आश्रम चौक, महावीर चौक, मिल्ट्री हॉस्पिटल टी पॉइंट, छावणी गणपती विसर्जन टी पॉइंट, आयकर भवन टी पॉइंट, नगरनाका, हॉटेल शरद टी पॉइंट, आंबेडकरनगर चौक, हर्सूल टी पॉइंट, एमआयटी चौक, गोदावरी चौक, देवळाई चौक, केम्ब्रिज चौक. 

कुंभारवाडा कॉर्नर

गुलमंडी चौकाजवळील कुंभारवाडा कॉर्नरवर अतिक्रमणांनी ७० टक्के रस्ता व्यापला आहे. या भागात महिला खरेदीसाठी मोठ्या संख्येने दररोज दाखल होतात. पादचारी महिलांना रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण असते. त्यातच दुचाकी, चारचाकी वाहनांची येथून सतत वर्दळ असते. जीव मुठीत धरून महिला सोमवारीही खरेदी करत असतात .

रंगारगल्ली... 

जुन्या शहरातील अत्यंत गजबजलेली बाजारपेठ म्हणजे रंगारगल्ली होय. अतिक्रमणांनी या गल्लीचा ‘रंग’च उडाला आहे. महानगरपालिका अतिक्रमण विभाग इकडे कधीच  मोहीम राबवत नाही . परिणामी परिस्थिती जशास तशी आहे. अतिक्रमणे एक इंचही कमी झालेली नाहीत.

निराला बाजार... 

शहरातील अत्यंत हायफाय मार्केट म्हणजे निराला बाजार. या भागातील मोठ-मोठ्या नामांकित कंपन्यांच्या शोरूमसमोर  फुटपाथच्या खाली चारचाकी वाहने अत्यंत शिस्तीत उभी असतात. वाहनांच्या या पार्किंगमुळे अर्ध्याहून अधिक रस्ता पार्किंगने व्यापला जातो. फुटपाथवर दुचाकी, रस्त्यावर चारचाकी, पादचाऱ्यांनी नेमके चालावे तरी कोठून याचे उत्तर महानगरपालिका, वाहतूक पोलिसांनी द्यावे.

पैठणगेट गेट चारही बाजूंनी रस्त्यावर हातगाड्यांवर कपडे विकणार्यांनी विळखा घातला आहे. टिळकपथ देखील फेरीवाल्यांनी व्यापला आहे. रस्त्यांवर उभी राहणारी वाहने, व्यापाऱ्यांचे अतिक्रमण याकडे महानगरपालिका प्रशासनाकडून नेहमी दुर्लक्ष करण्यात येते. गुलमंडीचे रस्तेच विक्रेत्यांनी गुल केले आहेत.

औरंगपुरा, जि.प. कार्यालयापर्यंत चप्पल बूट विक्रेते, चहा नाश्ता सेंटर वाल्यांनी फुटपाथ गायब केला आहे.  अत्यंत वर्दळीच्या शहागंज भाजी मंडई, फिश मार्केट कडे जाताना रस्त्यांचे दर्शन होत नाही. गजानन मंदिर ते जयभवानी नगर चौकाकडे जाताना रस्त्यावरच विक्रेत्यांनी बस्तान मांडल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.