Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : चिकलठाणा - पिंप्रीराजा शिव रस्त्याची का झाली दुरावस्था? शेतकर्‍यांनी का दिला आंदोलनाचा इशारा?

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सातारा - देवळाई - चिकलठाणा - जुना बीड बायपास - बकालवस्ती - झाल्टा - सुंदरवाडी - टाकळी वैद्य - टाकळी शिंपी - पिंप्रीराजा शिवारातील शिव रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे.

आता तर ऐन पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे मोठे जिकरीचे बनलय. रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने या रस्त्याचे आता खडीकरण - मजबुतीकरण न करता थेट सिमेंटचा अथवा डांबरी रस्ता करावा, अशी मागणी गणेश उत्तमराव दहिहंडे, हबीबखान पठाण, चिमाजी रिठे, किसन रिठे, सूर्यभान रिठे, अशोक रिठे, जमीर खान पठाण, हुसेनखान पठाण, भाऊसाहेब नवपुते, किसनराव दहिहंडे, दत्तू पाटील दहिहंडे, नानासाहेब बकाल, भाऊसाहेब बकाल आदी   शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी आमच्या जमिनी देखील द्यायला तयार असल्याचे शेतकऱ्यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले.‌

सातारा - देवळाई - चिकलठाणा - जुना बीड बायपास - बकालवस्ती - झाल्टा - सुंदरवाडी - टाकळी वैद्य - टाकळी शिंपी - आपतगाव - चितेपिंपळगाव - भालगाव - ठोंबरे आडगाव - पिंप्रीराजा शिवरस्ता हा शेती पुरक दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असल्याने या परीसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती देखील आहे. पाऊस झाल्यानंतर या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेती अवजारे शेती उपयोगी साहित्य शेतात नेणे हे तर मोठ आव्हानात्मक असते. या शिवरस्त्याचे भाग्य उजळले तर छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील दक्षिणेकडे असणाऱ्या दोनशे खेड्यांना फायदा होईल. सोलापूर - धुळे व छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी फुटण्यास मदत होईल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.

या रस्त्या अभावी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा शेतातील मालाची बाजारात ने - आण करताना मोठी दमछाक होते. या रस्त्याची दुरूस्ती करण्यासंदर्भात आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी खासदार रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे देखील शेतकऱ्यांनी मागणी केली होती. मात्र त्याची कुणीही गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. गत वर्षी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अनिता शेळके यांच्या स्थानिक विकास निधीतून जुना बीड बायपास ते चिकलठाणा - झाल्टा शिव रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करण्यात आले होते. यासाठी जवळपास २२ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र पावसाळ्यात चिखलाचा कायम त्रास होत असल्याने रस्ता असून खोळंबा, अशी गत होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यापूर्वी विद्यमान खासदार व तत्कालीन आमदार डाॅ. कल्याण काळे यांच्या काळात २०१० मध्ये खडीकरण व मजबुतीकरण करण्यात आले होते.‌ मात्र आम्हाला कायमस्वरूपी सिमेंटचा अथवा डांबरी रस्ता करून द्यावा या मागणीकडे कोणीही दखल घेतली नाही. लोकप्रतिनिधींनी तात्काळ या समस्यांची दखल घेऊन हा रस्ता तयार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सातारा - देवळाई - चिकलठाणा - जुना बीड बायपास - बकालवस्ती- झाल्टा- सुंदरवाडी- टाकळी वैद्य - टाकळी शिंपी- पिंप्रीराजा शिवारातील शिव रस्ता छत्रपती संभाजीनगर सह जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याला मिळतो. कालांतराने छत्रपती संभाजीनगर - जालना, पैठण जंक्शन महानुभाव आश्रम ते सावंगी बायपास - सोलापूर - धुळे, जुना बीड बायपास हे राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या शिवरस्त्याचा वापर कमी झाला. तेव्हापासून येथील शिव रस्त्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित राहिले. थातूरमातूर काम करून मोठे श्रेय घेण्याचे प्रयत्न काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाने केले. गावाचा संपर्क तुटला, रस्ता चिखलाने माखला, तरीही कोणत्याही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार नाही घेतला, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त व्यक्त केली.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सातारा, देवळाई, झाल्टा, सुंदरवाडी, टाकळी वैद्य, टाकळी शिंपी, भालगाव, आपतगाव, चितेपिंपळगाव, पिंप्रिराजा गारखेडा ही गावे भाजीपाला, आंबे, चिंच, मोसंबी, उस आदी बाबतीत प्रसिद्ध आहेत. देशातील कानाकोपऱ्यात इथला फळे, भाजीपाला, कापुस व मोसंबीची निर्यात केली जाते. चारही बाजूंनी राष्ट्रीय महामार्गाच्या मधून जाणारा हा शिव रस्ता दुर्लक्षित आहे. येथील सुखना नदीतील रेतीसाठी अधिकारी, पदाधिकारी हे वारंवार चकरा मारतात. तसेच आसपासच्या डोंगरातील मोठ्या प्रमाणावर गौणखनिजाची वाहतूक होत असल्याने व  मोठ्या प्रमाणात रेती उत्खननामुळे येथील रस्त्यांची वाट लागली आहे. याकडे मात्र अधिकारी व पदाधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. गावातील शिव रस्त्याचा वापर गौणखनिज वाहतुकीसाठी बंद करावा, असा आवाज ग्रामंस्थांनी केल्यास आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना साम - दाम - दंड - भेद याचा वापर करत गप्प बसवले जाते.

त्या - त्या भागातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत शाळा यांच्या पुढाकारातून व श्रमदानातून आपापल्या भागातील हद्दीतून जाणाऱ्या या चिखलाने माखलेल्या शिव रस्त्याची नागरिक दुरूस्ती करतात. शाळेची विद्यार्थी देखील सहभागी होत असल्याने ग्रामंस्थांनी सांगितले.‌ मग या अखंडीत शिवरस्त्यासाठी राजकारण्यांनी का पुढाकार घेऊ नये, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. चिखलाने माखलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी केवळ निवडणुकीच्या काळात आश्वासन दिली जातात. नंतर मात्र सगळ्यांना विसर पडतो, असेही ग्रामंस्थांनी सांगितले.

यापूर्वी पालकमंत्री शेत पाणंद रस्ता योजनेचे नामकरण करुन आघाडी सरकारने स्वार्थ साधला मात्र ग्रामीण भागातील पाणंद रस्ते, शिव रस्त्यांची दुर्दशा काही मिटलेली नाही. ते या शिव रस्त्यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच मातोश्री ग्राम समृध्दी शेत पाणंद योजना असे नामकरण करण्यात आले होते. मात्र, अद्याप छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील या शिव रस्त्याचे नशीब उजळले नाही. विशेषत: राज्याचे रोहियोमंत्री संदिपान भुमरे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी देखील या शिव रस्त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकारचा उद्देश आणि शेतकऱ्यांना चांगला रस्ता कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे.

ग्रामीण भागातील शेकडो गावांना जोडणाऱ्या या मुख्य शिव  रस्त्याची दुरावस्था झाली असून शेतीसाठी चांगला रस्ता असल्यावर शेतमाल वाहतुकीचा तसेच अत्याधुनिक यंत्रे शेतात घेऊन जाता यावीत या उद्देशाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेतून या शिव रस्त्याची दुरुस्ती व्हावी, तिथे रस्त्यासाठी जागा कमी पडेल, तिथे आम्ही आमच्या जमिनी द्यायला तयार आहोत, अशा आशयाचे शपथपत्रही गावकऱ्यांनी लिहून दिलेले असताना त्याअनुशंगाने जिल्हा प्रशासनाने त्या - त्या भागातील ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवने अपेक्षित होते.‌ शिवाय रस्ता कामास  मंजुरी देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाला या शिवरस्त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार हा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात कायम आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना असे नामकरण झाल्यानंतर या शिव रस्त्याचे नशीब उजळेल, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे.

आतापर्यंत रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतुकीचा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांची ईच्छा असून नगदी पिके घेता आली नाहीत. शिवाय यंत्र सामुग्री शेतामध्ये घेऊन जाणे शक्य झाले नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मतदार संघाचे आमदार संदिपान भुमरे रोहयो मंत्री झाल्यानंतर या शिव रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळेल,अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण प्रत्यक्षात शेत शिवारात रस्ता कामाबाबत कोणत्याच हलचाली नाहीत. अनेक पावसाळ्यात हाल सोसल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हालच होणार आहेत. ज्या तत्परतेने योजनेचे नामकरण झाले त्याच तप्परतेने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.