Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अवकाळीने वाढवल्या 'अवकळा'; कोणी रस्ते देता का रस्ते?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नावालाच स्मार्ट सिटी असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील उपनगराचा भाग असलेल्या बीड बायपास या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ लगत असलेल्या राजेशनगरात जाण्या-येण्यासाठी रस्ताच नसल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. कालच्या अवकाळी पावसाने तर त्यांची मोठी कसरत वाढली असून तारेवरची कसरत करत चिखल वाटेतून वाट काढावी लागत आहे. 

बीड बायपास ते राजेशनगर या मुख्य रस्त्याचे तीन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र ड्रेनेज आणि जलवाहिनीसाठी खोदण्यात आल्याने मुख्य रस्त्याची देखील चिखल वाट झाली आहे. या भागातील रस्त्यांच्या प्रश्नांकडे पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट तसेच महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. संबंधितांचे रस्त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. राजेशनगरात गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून सुमारे एक हजार कुटुंब राहतात. त्यांच्या दररोजच्या दळणवळणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगरातून जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांना पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ बीड बायपासला जोडले जाते.‌ बीड बायपासच्या नियोजन शून्य बांधकामाचा फटका राजेशनगरातील नागरिकांनाही बसला आहे. बायपासची उंची वाढल्याने राजेशनगर खड्ड्यात गेले आहे.

बायपासकडून राजेशनगराकडे जाताना मोढा चढ-उतार झाल्याने नागरिकांची दमछाक होत आहे. त्यात उतारावरून बायपासचे पावसाचे पाणी राजेशनगरात शिरत असल्याने वसाहतीला पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. राजेशनगरातील रस्त्यांची अवस्था पाहतात पावसाळ्यात चिखल वाटेतून प्रवास करताना कुणाचीही हिंमत होत नाही. गेल्या ३० ते ४० वर्षात या रस्त्यांवर साधा मुरूम देखील टाकला नाही. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जाण्या - येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून उपचारासाठी जाणाऱ्या रूग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्यांचे चिखल वाटेत रुपांतर होत असल्याने पायी चालणे कठीण होते. दरम्यान या रस्त्यांच्या विकासासाठी स्थानिक नागरिकांनी महापालिका, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांपासून आमदारांकडे पाठपुरावा केल्यानंतर देखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.