Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : रेल्वे पीटलाईनला मालधक्क्याचा धक्का; रूळासाठी रखडले काम

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : रेल्वेस्थानकावर होत असलेल्या पीटलाइन नव्या रेल्वे गाड्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची यामुळे दुरुस्ती आणि स्वच्छता होईल. तसेच शहरातील सर्वच औद्योगिक वसाहतीसाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र "टेंडरनामा" शनिवारी पीटलाईन कामाची पाहाणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी पीटलाईनचे ७० टक्के काम पुर्ण झाले आहे. मात्र पीटलाईनच्या बाजुने रेल्वे ट्रॅकसाठी मालधक्क्याचा मोठा धक्का बसला आहे.

पीटलाईनच्या उत्तर बाजुस ट्रॅक आहे. मात्र दक्षिण बाजुस रेल्वे उभ्या करण्यासाठी अजुन एका ट्रॅकची आवश्यकता आहे. मात्र मालधक्क्याचा त्याला विरोध असल्याचे "  टेंडरनामा " तपासात समोर आले आहे. प्रतिनिधीने यासंदर्भात अधिक खोलात जाऊन तपास केला असता जरी मालधक्क्याचा अधिकार्यांनी येथे ट्रॅकसाठी मंजुरी दिली, तरी पीटलाईन आणि मालधक्क्याचे गोडाऊन याचे अंतर हे जवळ असल्याने येथे येणारी अवजड वाहने मालधक्क्यावर मालाची चढ - उतार करताना रस्त्यावर आडव्या लावल्या जातात. त्यात रस्त्याची कमी रूंदी असल्याने व पीटलाईनला खेटुनच जड वाहने वळवली जात असल्याने येथे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधी येथील मालधक्का तातडीने हटविणे गरजेचे आहे.

मराठवाड्यात याआधी केवळ नांदेड, पूर्णा येथे पीटलाईनची सोय होती. छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर याआधी सोळा बोगींची पीटलाइनची सुविधा होती. मात्र बर्याच वर्षांपासून ती धुळखात होती. त्यामुळे चिकलठाणा रेल्वे हाॅल्ट स्टेशनवर २४ डब्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी पीटलाइनची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. छत्रपती संभाजीनगर हे शहर मराठवाड्याची राजधानी असून दक्षिण आणि उत्तर तसेच पश्चिमेकडील सर्व महत्त्वाच्या शहरांना रेल्वेने जोडलेले आहे. मात्र, येथील स्थानकात पीटलाईनची सुविधा नव्हती .‌त्यामुळे लांब पल्ल्याच्या अधिक गाड्या येथे दुरुस्ती किंवा स्वच्छतेसाठी थांबवता येत नाहीत. परिणामी त्यामुळे अनेक एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव रखडले आहेत. यासंदर्भात मराठवाडा रेल्वे विकास समिती तसेच रेल्वे प्रवासी सेनेने गत वीस वर्षांपासून पीटलाइनची मागणी केली होती. ही सुविधा उपलब्ध झाली तर हावडा, बेंगळूरू, चेन्नईसह अन्य ठिकाणी रेल्वे सेवा सुरू होऊ शकते , असे त्यांचे म्हणने होते.‌रेल्वेने‌ काही वर्षांपूर्वी  नांदेड येथील मालटेकडी येथे २४ डब्यांच्या पीटलाइनचे काम झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे पीटलाइनचे काम सुरू करू , अशी आश्वासनांची मुक्ताफळे उधळत निराशाच केली होती. चिकलठाणा येथे पीटलाईन झाली असती तर शेंद्रा येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला फायदेशीर ठरणार होती.

दक्षिण मध्य रेल्वेने पीटलाइनच्या उभारणीबाबतचा प्राथमिक अहवाल सिकंदराबाद मुख्यालयाला पाठवलेला होता. मात्र तेथे यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. दरम्यान गेली दहा वर्ष केवळ रेल्वेचे तंत्रज्ञ तसेच वरिष्ठ अधिकार्यांनी केवळ पाहणी आणि अहवालांचा फार्स रचत अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्याचेच काम केले. त्यातच चिकलठाण्याची पीटलाईन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्याला पळवली. त्यानंतर शहरात संतापाची लाट पसरली. दरम्यान दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानकावर पीटलाईनसाठी दहा कोटी मंजुर केले. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी पीटलाईनचे उद्घाटन देखील केले. दोन दिवसांपूर्वी जालन्याच्या पीटलाईनचे काम पूर्ण झाले. त्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील पीटलाईनचे काम दिड वर्षांपूर्वी सुरू केले असताना कामात आता मालधक्क्याचा अडथळा येत आहे.

आधी मालधक्का हटवा

 रेल्वे स्टेशनवर प्रस्तावित पीटलाइनचे काम पूर्ण करण्यासाठी मालधक्का स्थलांतर होणे आवश्यक आहे. यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या यंत्रणेने वेळकाढूपणा आणि कामात हलगर्जीपणा न करता यंत्रणा कामाला लावणे महत्वाचे आहे. मालधक्का हटविण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यापारी, मालवाहतूकदार प्रतिनिधींशी चर्चा देखील केली आहे. मालधक्का इतरत्र हलविल्यास काय परिणाम होतील, याबाबत व्यापारी आणि मालवाहतुकदार यांच्या प्रतिक्रीया घेत मालधक्क्यासाठी दौलताबाद, करमाड, पोटुळ आणि लासूर येथील पर्याय ठेवण्यात आले होते. यात दौलताबादलाच बहुतांश जणांनी होकार दिला , असे असले तरी अद्याप रेल्वे अधिकाऱ्यांनी जागा निश्चित केली नसल्याचे समोर आले आहे.‌

शहरासाठी २४ बोगींची पीटलाइन मंजूर झाली, कामही सुरू झाले. मात्र आता रेल्वे ट्रॅक साठी मालधक्क्याचा अडथळा येत आहे.हीच बाब पीटलाइनच्या पायाभरणीच्या समारंभात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपस्थित केली होती. दरम्यान त्यांनी २४ बोगींच्या पीटलाइनसाठी स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित करण्याची सुचना अधिकार्यांना केली होती. उद्योग, व्यापाऱ्यांशी चर्चा करून १० दिवसांत प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) केली होती. त्यानंतर ‘दमरे’ नांदेडचे विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक नागेंद्र प्रसाद; तसेच विभागीय वाहतूक व्यवस्थापक जय पाटील यांनी रेल्वे मालधक्क्यांशी संबंधित संघटना सदस्य, वाहतूकदार यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेतून मालधक्का स्थलांतरास सर्वांनी सहमती दर्शविली होती. दौलताबादेत मालधक्का स्थलांतरित केल्यास, व्यापाऱ्यांवर किंवा उद्योजकांनाही त्याचा लाभ मिळेल, असा निर्णय घेण्यात आला होता.‌मात्र अद्यापही मालधक्का हटविण्यासाठी निर्णय घेण्यात आला नाही.