Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 'या' कारणासाठी खोदणार 292 कोटींचा रस्ता

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरकरांना प्रतीक्षा असलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आलेले असतानाच आता मजीप्राच्या अधिकाऱ्यांकडून दुःखद बातमी हाती लागलेली आहे. येत्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगर नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी हा रस्ता सात ठिकाणी खोदला जाणार आहे. यासंदर्भात रस्त्याचे काम चालु असतानाच मजीप्राने सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्पाकडे जलवाहिनी टाकण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, तेव्हा नाकारण्यात आली होती. रस्त्याचे बांधकाम झाल्यावर रस्ता दुरूस्ती शुल्क ३५ लाख रूपये भरून परवानगी दिल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. यामागे (P.W.D) जागतिक बँक प्रकल्पाचे काय गौडबंगाल हा हा खरा संशोधनाचा विषय आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. आधीच कंत्राटदाराने या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट काम केलेले आहे. दोष निवारण कालावधीआधीच रस्त्यावर अनेक ठिकाणी कमी जास्त आकाराच्या भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याचे पोट फाडून खडी बाहेर येऊन खड्डे पडायला सुरवात झालेली आहे. रस्त्याचे कामच चुकीच्या पद्धतीने केले गेल्याने अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत प्रवाशांना रस्ता पार करावा लागत आहे. कंत्राटदाराच्या चुकीमुळे सातारा, देवळाई व बीड बायपासकरांना दिलासा मिळण्याऐवजी मनस्ताप सोसावा लागत आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नाने हायब्रीड अन्यूटी उपक्रमातून या रस्त्याचे मजबुतीकरण केले जात आहे. त्या अंतर्गत तब्बल २९२ कोटींतून होणाऱ्या या रस्त्यावर तीन चुकीचे उड्डाणपूल आणि मृत्युचा सापळा रचणारा उंच दुभाजक बनविण्यात आला आहे. ३० अंतरातच सहा पदरी अरूंद रस्ता तयार करून त्यातच सर्व्हिसरोड तयार केल्याने विरुद्ध दिशेला जाणाऱ्यांचे वाढते प्रमाण अपघाताचे कारण ठरत आहे. पैठण-आपेगाव रस्त्याचे वाटोळे केल्याने त्यात काळ्या यादीत समावेश केलेल्या 'जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचर'ला हे काम मिळाले आहे. मात्र आता दक्षिणेकडील सातारा आणि देवळाई येथील जलकुंभाचे काम झाल्यावर तेथून बीड बायपास उत्तरेला असलेल्या रेल्वे रूळानजीक वसाहतींना पाणी पुरवठा करण्यासाठी नाईकनगर, देवळाई चौक, संग्रामनगर, एमआयटी चौक व महानुभाव आश्रम, रेणूका मातामंदीर कमान, पटेल लाॅन्स आदी आठ ठिकाणी हा नवा कोरा रस्ता खोदला जाणार आहे.

गेल्या मागील तीन वर्षांपासून या रस्त्याचे कासवगतीने काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू होण्यापुर्वी एमआयडीसीने वाळुज जलशुध्दीकरण केंद्र ते चिकलठाणा या मुख्य जलवाहिनीचे काम करून घेतले. त्याचप्रमाणे मजीप्राने देखील काम करून घेणे गरजेचे असताना आता रस्त्याचे काम झाल्यावर जलवाहिनी टाकण्यासाठी वराती मागुन घोडे दामटवले आहे. दरम्यान नागरिकांना पुन्हा वळण मार्गांचा अवलंब करून त्रासात भर पडून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय तब्बल आठ ठिकाणी खोदकाम केले जाणार असल्याने रस्त्याच्या दर्जावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाचे वाटोळे होणार असल्याचा संताप शहरभर व्यक्त केला जात आहे. हा पैसा जागतिक बँक प्रकल्प शाखेतील व मजीप्राच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसुल केला जावा, अशा प्रतिक्रीया शहरभर उमटत आहेत.