Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : सिडकोतील विनय काॅलनीत दूषित पाणीपुरवठा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhtrapati Sambhajinagar) : सिडकोतील मकुंदवाडी परिसरातील विनय काॅलनीत महापालिकेच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा गेल्या महिन्यापासून दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील संतप्त नागरिकांनी विनय काॅलनीतील १२९ पेक्षा जास्त घरातील नागरीकांना आरोग्याचा घाट का घातला? पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीवर ड्रेनेजलाईन का जोडली? काॅलनीतील ८ ते १० दिवसांनी येणारे अस्वच्छ पाणी पुरवायचे की, काही लोकांचे हितसंबंध जोडण्यासाठी शेकडो लोकांच्या आरोग्याशी खेळायचे? गेल्या महिन्याभरापासून नागरिकांचे आरोग्य खराब झालेले आहे, याची जबाबदारी कुणाची? महापालिकेतील बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या कृपेने जलवाहिनीवर ड्रेनेजलाईन आणि चेंबर बनवले ते हटविणार कधी, याची दखल घेऊन महापालिका प्रशासन उत्तरे देईल काय, असे सवाल करत येथील करदात्यांनी महापालिका कारभाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. एवढेच नव्हेतर येथील सुजान नागरिकांनी महापालिकेने दुरूस्तीसाठी खोदलेल्या जलवाहिनीवर फलक लावून महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त व्हीआयपींसाठी कोट्यावधीच्या कामात अती लक्ष देणारे महापालिका प्रशासक यातून थोडी फुरसत काढून येथील सामान्य नागरिकांची दखल घेणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या महिनाभरापासून या भागात दुषित पाणीपुरवठा होत होता. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत या भागातील नगरसेविका सत्यभामा शिंदे यांचे पती दामोदर शिंदे यांनी तत्परतेने महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेला जागे करत येथील विघ्नहर्ता गणेश मंदिरालगत लिकेज शोधण्यासाठी मोठा खड्डा तयार करून जलवाहिनी खुली करण्यात आली. दरम्यान, येथील परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता याच काॅलनीला लागून असलेल्या रस्त्याच्या शेजारी महाजन काॅलनीतील मलःनिसारण वाहिनी जोडण्यासाठी जलवाहिनीलगतच चेंबर बांधण्यात आल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. शिवाय जलवाहिनीवर ड्रेनेजलाईन टाकून चेंबरला जोडण्यात आल्याचे दिसले. काम झाल्यावर आरपार खोदण्यात आलेला सिमेंट रस्ता देखील तसाच ठेवल्याने नालीतून दररोज अपघात होत आहेत. 

महापालिकेतील बेजबाबदार अधिकाऱ्यांचा असा हा उरफाटा कारभार पाहताच नागरिकांमध्ये असंतोष पसरला. यासंदर्भात परिसरातील शेकडो नागरिकांनी एकत्र जमा होत महापालिका प्रशासकांनी दखल घेऊन तातडीने पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीवरील चेंबर व ड्रेनेजलाईन तातडीने हटवावी व कालनीधा शुध्द पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून शहरात असूविधा होत आहे. तसेच महापालिकेच्या दुर्लक्षामुळे विनय काॅलनीच नव्हे, तर शहरात दुष्काळ असताना अनेक भागात दुषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील नागरी रोष व्यक्त करीत आहेत. शहराला विविध जलकुंभातून लहाणमोठ्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलवाहिन्यांची कालमर्यादा संपल्याने व आधीच पाण्याचा तुटवडा असल्याने त्या कधी स्वच्छ केल्या जात नाहीत. बहुतांश जलवाहिन्यात झाडांची मुळे आणि घुशींनी पोखरल्याने लिकेजचे प्रमाण वाढले आहे. जलवाहिन्यात गाळ तसेच मातीचे थर झाल्याने शहराला अनेक भागात दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा होत आहे.

ऐन सणासुदीच्या काळात सिडकोतील विनय काॅलनीसह शहरातील इतर भागात देखील  मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विविध भागात अशुद्ध व गढूळ पाणी पुरवठा असल्याने नागरिकांना शुद्ध पाण्याच्या जारमधील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करावा लागत आहे. यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या नागरिकांसाठी ही बाब नाहकचा भुर्दंड देणारी ठरली आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कुंभकर्णी झोपेत असलेल्या महानगरपालिका प्रशासनाने याची वेळेच दखल घेऊन शुद्ध पाणी पुरवठा करावा तसेच अवेळी येणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक निश्चित करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. आधीच शहराला आठ ते दहा  दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तसेच वेळेवर पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण फिरावे लागत आहे. त्यात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.