Sukhana Dam Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : सुखना धरणाचे दु:ख कोणाला कळणार?; देखभाल दुरुस्तीकडे कानाडोळा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तालुक्यातील गारखेडा परिसरातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील सुखना मध्यम प्रकल्पांच्या धरणाच्या माती बंधाऱ्याचा थेट रस्ता म्हणून वापर केला जात आहे. दुचाकी, रिक्षा आणि इतर वाहने बंधाऱ्यावरून सुसाट धावतात. आधीच मातीचा बंधारा त्यावर दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे उगवल्याने बंधाऱ्याला अधिक धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कधीच गाळ काढला जात नसल्याने जलसाठा कमी क्षमतेने भरला जातो. या धरणातील गाळ काढल्यास १ एमएम दलघमी पाणी वाढेल, असे अधिकारी सांगतात. मात्र धरणाचे बांधकाम झाल्यापासून आजपर्यंत धरणातील गाळ काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने तत्परता दाखविली नाही. २० एप्रिल २०२३ रोजी ऐन पावसाळ्यात पाटबंधारे विभागाने ' गाळ मुक्त धरण,गाळयुक्त शिवार या योजनेतून सकाळी गाळ काढण्यासाठी यंत्रणा आणली तोच मुसळधार पाऊस झाल्याने यंत्रणाच गाळात फसली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गारखेडा परिसरातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील येणाऱ्या सुखना मध्यम प्रकल्पाच्या धरणाच्या माती बंधाऱ्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे आसपासच्या ग्रामस्थांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या माती बंधाऱ्यावर दोन्ही बाजूला मोठमोठे झाडे वाढल्याने त्यांच्या छटाईकडे पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे देखील ग्रामस्थांनी आरोप केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र तरीही धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यंदा एप्रिल महिन्यातच आसपासच्या विहिरींनी तळ गाठला आहे. धरणातील पाणीपातळी ज्योता पातळीखाली गेला आहे. अर्थात धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. याचा परिणाम या धरणावर अवलंबून असलेल्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. अजून संपूर्ण उन्हाळा बाकी आहे. त्यामुळे तालुक्यात टंचाईची भीषण समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. सरकारी पातळीवर पाणी वाचवा, पाणी आडवा, पाणी जिरवा, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, अशी कितीही ओरड होत असली तरी प्रत्यक्षात मात्र या धरणाची स्थिती पाहता धरणातील गाळामुळे बंधार्याची उंची अंत्यंत कमी झालेली आहे.‌ गत वीस वर्षात धरण कधीच भरले नव्हते. मात्र २०२२ मध्ये धरण पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र धरण गाळयुक्त असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटबंधारे खात्याने धरणातील गाळ काढून बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सुखना मध्यम प्रकल्पांतर्गत  गारखेडा- पिंप्रीराजा- आपतगाव - चितेगाव परिसरातील हे धरण सर्वात मोठे धरण आहे. पिंप्रीराजा येथील सखाराम पाटील या प्रगतीशील शेतकऱ्यांने हे धरण बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांना या कामाबद्दल पद्मभूषण पुरस्कार देखील मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.‌ १९६६ मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून हे धरण बांधण्यात आले होते.‌ तब्बल ७७५ हेक्टर जमीन भूसंपादन करून येथे धरण बांधले.‌ पावसाळ्यात शंभर टक्के धरण भरल्याच त्यात १८.५० दलघमी जलसाठा उपलब्ध होतो. बंधाऱ्याची लांबी ३.५ मीटर असून रूंदी २.५ मीटर आहे.बुडीत क्षेत्रापासून बंधार्या पर्यंत धरणाची उंची १५ मीटर आहे. या धरणात जळगाव रोडवरील चौकाघाटाकडून सुखना नदी तसेच पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून उगम पावलेल्या भोर नदीतून धरणात पाणी येते. आपतगाव, भालगाव, गारखेडा, चितेपिंपळगाव, हिवरा, पिंप्रिराजा आदी गावांसह केवळ शेतीसाठी वापरले जाते.सदर धरणात चिकलठाणा व शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील दुषित पाणी येत असल्याने सदर धरणातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याने या धरणातील पाणी पिण्यासाठी पाटबंधारे खात्याने बंदी घातलेली आहे. त्यामुळे या दुषित पाण्यावर केवळ दुबार आणि हंगामी पिके घेतली जातात. धरणातील दुषित पाण्यामुळे पिकावर देखील रोगराई पसरत असल्याचे व विहिरी देखील दुषित झाल्याचे टेंडरनामा पाहणीत आढळून आले. त्यामुळे या भागातील भूजल क्षेत्रच दुषित झाल्याने पावसाळ्यात देखील तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या धरणामुळे भाजीपाला, कपाशी फळबागा, उस , मोसंबी, डाळिंबाच्या बागा हिरव्यागार दिसतात मात्र दुषित पाण्याने विषारी भाजीपाला खायची वेळ आली आहे. यासंदर्भात कुंभेफळ, सटाणा, लाडगाव, शेंद्रा, हिवरा, पिंप्रिराजा, करमाड, झाल्टा, टाकळी शिंपी, टाकळी वैद्य, चिते पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी औद्योगिक विकास महामंडळ,छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे नागरी व औद्योगिक वसाहतीतीतील दुषित पाणी बंद करण्याबाबत अनेकदा निवेदने व आंदोलने केली. मात्र एक विभाग दुसर्या विभागाकडे बोट दाखवत धन्यता मानत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पिकांचा नाश आणि भूजळ पातळी तसेच जमीनीचा पोत देखील खराब झालेला आहे. या शिवाय या गावांतील नागरिकांना पिण्यासाठी येथील धरणातील पाण्याचा उपयोग करताच येत नाही. धरणात संध्या जलसाठा जोता पातळीखाली गेला आहे.धरण परिसरातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने त्रस्त झाली आहेत.धरणात दुषित पाणी असल्याने नागरिकांना बाराही महिने इतर गावाहुन जारचे पाणी विकत घ्यावे लागते. पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. त्यात नादुरुस्त बंधारा असल्याने पावसाळ्यात साचलेले पाणी गळतीद्वारे निघुन जाते.काही वर्षांपूर्वी जायकवाडी धरणातून पाइपलाइन द्वारे धरणात पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली. मात्र या धरणाच्या दुरुस्तीकडेच लक्ष दिले जात नाही, पाइपलाइन कोण टाकेल, असा आरोप केला जात आहे. तालुक्यातील या सर्वात मोठ्या धरणातील जलसाठा वाढावा, यासाठी गाळमुक्त धरण करणे, धरणातील झाडी झुडपी काढणे, बंधार्याची दुरूस्ती करणे, संपुर्ण बुडीत क्षेत्र विकसित करणे यासाठी जल अमृत योजना मंजुर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.‌ नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करणे गरजेचे आहे. धरण उशाला अन् कोरड घशाला धरणातील दुषित पाणी पुरवठा बंद केला , तर येथील ग्रामीण भागात सुरु असलेल्या पाणीटंचाईवर मात करता येईल. धरणात जलसाठाच नसल्याने उन्हाळ्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत.‌ धरणासाठी शेकडो हेक्टर जमीनी भूसंपादीत केल्या शेतकऱ्यांना मोबदला दिला.‌ मात्र ७० ते ७० हेक्टर जमीनीवर शेतकरी गाळपेरा करतात. येथे पावसाळ्या व्यतिरिक्त शेती कसली जाते. अनावश्यक तन जाळले जाते. शेतकरी यंत्रसामुग्री वापरतात. त्याचा आवाज होत असल्याने धरणातील देश - विदेशातील २८ विविध प्रजातीच्या पक्षांना बाधा पोहोचत असल्याने पक्षी संख्या घटल्याचे निदर्शनास आले.

या धरणातून पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांना पाणी वाटपातून दरवर्षी ४० ते ५० लाखाचे उत्पन्न मिळते, असे असताना धरणाची डागडुजी करून ते पाणी वापरात आणणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील व पाटबंधारे विभाग तसेच औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दुषित पाणी बंद केल्यास येथील‌ ग्रामीण भागातील पाणीटंचाई दुर होईल.‌ धरणातील शुध्द पाणी ग्रामस्थांना मिळाले तर त्यांची वणवण थांबेल. धरणातील गळती थांबण्यासाठी पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर डागडुजी करणे गरजेचे आहे.