Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : जीव्हीपीआरने शहरभर केले मृत्यूचे खड्डे

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नवीन योजनेतील मुख्य आणि अंतर्गत जलवाहिनीचे काम अनेक ठिकाणी मटेरियलचा तुटवडा असल्याने सबठेकेदार अर्धवट काम सोडून यंत्रणा पसार होत आहेत. त्यामुळे मुख्य आणि अंतर्गत जलवाहिनीसाठी केलेली विहिरीच्या आकाराची जीवघेणी भगदाड अगदी रस्त्याच्या मधोमध तर कुठे रस्त्याच्या कडेलाच असल्याने  मृत्युला आमंत्रण देत आहेत. धक्कादायक म्हणजे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात खेळकर मुले उतरत असल्याने मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

मुख्य आणि अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी जेसीबीने नाल्या खोदण्यात येत असल्याने दररोज कुठल्या ना कुठल्या भागात जुन्या जलवाहिन्यांना आणि मल: निसारण वाहिन्यांना धक्का लाऊन त्या फोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्येक भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत. यामुळे महापालिकेला एकाच वेळी दोन्ही वाहिन्यांच्या दुरूस्तीसाठी खर्च करावा लागत आहे. मध्यंतरी 'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर जीव्हीपीआर आणि पीएमसीला ५० लाखाचा दंड आकारण्यात आला होता. मात्र मुजोर ठेकेदाराने अद्याप एक छदाम देखील भरला नाही. ठेकेदाराच्या देयकातून तो वसूल करून महापालिकेच्या खाती जमा करण्यात यावा यासाठी मजीप्राला पत्रव्यवहार करण्याची नामुष्की महापालिकेवर आली.

मराठवाड्यात यंदा दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. अडीच महिन्यात एकही मोठा पाऊस नाही. त्यात जायकवाडी धरणातील जलसाठ्यात देखील पाण्याची आवक कमी आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार धरणात ३० टक्केही जलसाठा नाही. अशी स्थिती असताना जीव्हीपीआरने मागिल अडीच वर्षात छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेतील ३० टक्केही काम पुर्ण केले नाही. ५१ जलकुंभाचे काम देखील अर्धवट स्थितीत आहे. 

शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी २७४० कोटींच्या नवीन जलयोजनेचे काम अडीच वर्षांपासून सुरू आहे. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला दिले असून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिलिमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम देखील कासवगतीने सुरू आहे. दरम्यान पाणी येण्याआधी या जलवाहिनीसाठी खोदलेल्या नालीने पैठणरोडवर चार बळी घेतले. तरीही कंपनीचा संथगती कारभार सुरू आहे. आतापर्यंत केवळ २० किमीपर्यंत जलवाहिनी टाकली. शहरातही मुख्य आणि अंतर्गत पाइप टाकण्यासाठी जेसीबीद्वारे चर खोदले जात आहेत. यादरम्यान, रस्ते, फुटपाथची वाट लावली जात आहे. काम झाल्यावर रस्ते आणि फुटपाथ पूर्ववत करण्याकडे कंपनीकडून कानाडोळा केला जात आहे. त्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य आणि अंतर्गत जुन्या जलवाहिन्यांना जेसीबीचा सारखा धक्का लागून वाहिन्या  फुटत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन दुष्काळात तेरावा महिना भोगावा लागत आहे.त्यात ड्रेनेजलाईनला देखील धक्का लागत असल्याने शहरवासीयांना दुर्ग॔धीचा त्रास सोसावा लागत आहे. एकुणच शहरवासीयांना ठेकेदार कंपनीच्या यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे खड्डे, चिखल , दुर्ग॔धीतून वाट काढावी लागत आहे. दुसरीकडे जुन्या योजनांतील वाहिन्यांना धक्का दिल्याने महापालिकेचे अतोनात  नुकसान होत आहे.