Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : लोकसहभागातून 'गाळमुक्त धरण', 'गाळयुक्त शिवार' योजना राबविणाऱ्या ग्रामस्थांवर...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : ४० ते ५० गावांची तहान भागविणारा दुधनवाडी, सोमठाणा शिवारातील अप्पर दुधना प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. ग्रामंस्थांनी आचारसंहिता लागण्यापूर्वीच काही महिने अगोदर जालना येथील पाटबंधारे उप विभाग क्र. १ चे उप विभागीय अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता व प्रशासक तसेच बदनापूर येथील सिंचन शाखा क्र. १ यांना "गाळमुक्त धरण", "गाळयुक्त शिवार" शिवार योजनेतेतून गाळ उपसा करण्याची मागणी केली होती. मात्र पाटबंधारे खात्याते कुठल्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून गाळ उपसा करण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरुवात केली. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून काम सुरू केले असतानाच पाटबंधारे विभागाकडुन‌ ग्रामस्थांच्या पाठीवर कौतूकाची थाप न मिळता याउलट कारवाईचे बक्षिस मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.‌ यामुळे ग्रामस्थांनी गाळ उपशाचे काम बंद केले आहे.‌

बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे पाटबंधारे विभागांतर्गत १९६५ मध्ये दुधनवाडी सोमठाणा शिवारात दुधना नदी पात्रात धरण बांधण्यात आले होते. या धरणाच्या पाण्यातून बदनापूर शहरासह परिसरातील २५ गावांची व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास १५ गावांची तहान भागवली जाते. मात्र गेल्या ६० वर्षात एकदाही धरणातील संपूर्ण गाळ न काढल्याने धरणातील पाणी साठवण क्षमता अंत्यंत कमी झालेली आहे. चालू वर्षी दुष्काळामुळे धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे.‌परिणामी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.‌या गावातील तहाण भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला टॅंकरसाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागत आहेत.मात्र या भागातील सर्वच पाण्याचे स्रोत आटल्याने भीषण दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. तालुक्यातील या धरणावर अवलंबून असलेल्या गावांची संख्या मोठी आहे. धरण कोरडे होऊनही धरणातील गाळ उपशाकडे पाटबंधारे विभागाचे कायम दुर्लक्ष होत आहे.बदनापूर तालुक्यातील व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धरणालगत असलेले शेतकरी शेतीसाठी गाळ स्वखर्चाने नेण्यासाठी इच्छुक होते. परिसरातील शेतकऱ्यांनी यासंदर्भात राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या ५ एप्रिल २०२४ च्या परिपत्रकानुसार "गाळमुक्त धरण", "गाळयुक्त शिवार" शिवार योजना राबविण्याबाबत पाटबंधारे विभागाकडे जोरदार मागणी लाऊन धरली होती. 

या धरणाच्या पाळूची लांबी ४३० मीटर आहे.‌पाळूलगत झाडी झुडपी वाढल्याने पाळूला देखील छती पोहोचली आहे. धरणातून अनेक वर्षांपासून गाळ न काढल्याने तो विहिरींपर्यंत पोहचून लगतच्या विहिरींचे झरेही बंद झालेले आहेत. यंदा तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याने विहिर आटल्याने तीन महिन्यांपासून परिसरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष गावागावात निर्माण झाले होते.‌अनेकांना पैसे देऊनही विकतचे पाणी मिळत नाहीऐ. धरणातील गाळामुळे अनेक गावांत व बदनापूर शहरातील नळांद्वारे येणारे पाणी एक महिन्याआड येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.‌शासकीय स्तरावर धरण गाळ मुक्त करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात.‌पण एकंदरीत सोमठाणा शिवारातील अप्पर दुधना प्रकल्पाची स्थिती बघता शासकीय योजना फंक्त कागदावरच असल्याचे चित्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे निर्माण झाले आहे.‌ यंदा मुबलक प्रमाणात पाऊस पडला नसल्याने परिसरातील सिंचन क्षेत्र धोक्यात आले आहेत.‌परिसरातील शेतकऱ्यांचा शेती उद्योग डबघाईस आल्याने उत्पादन खर्च देखील निघाला नाही. पिकपाणी अभावी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. लेकीबाळींची लग्नकार्य, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील आजारी व्यक्तीचा खर्च दररोजच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च, जनावरांच्या चारापाण्याचा खर्च भागविण्यासाठी देखील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशाही हालाखीच्या परिस्थितीत पदरमोड करून धरणातील जलसाठा वाढावा व टॅंकरमुक्त व दुष्काळमुक्त गावासाठी शेतकरी धरणातील गाळ स्वखर्चाने घेऊन जाण्यास तयार झाले होते. याउलट पाटबंधारे विभागानेच गाळ उपशाकरिता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च सीएसआरच्या फंडातून उपलब्ध निधीतून शासनाच्या "गाळमुक्त धरण", "गाळयुक्त शिवार या योजनेतून करणे अपेक्षित होते.

यासंदर्भात गाळ उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांनी जालन्याचे पाटबंधारे विभागाचे अभियंता तसेच छत्रपती संभाजीनगर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता व बदनापूर येथील सिंचन शाखेकडे रितसर अर्ज केला होता. मात्र अधिकार्यांनी गाळ उपसा करण्यासाठी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून हे काम केले. मात्र बदनापूर येथील सिंचन शाखा क्रमांक - १ च्या शाखा अधिकार्यांनी ३ जुन २०२४ रोजी अप्पर दुधना मध्यम प्रकल्पातून अवैधरित्या गाळाचे खोदकाम ब़ंद करून प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून गाळ उपसा कण्याचे २४ मे २०२४ रोजी उप अभियंता यांच्या पाहणीत समोर आल्याचे कारण जोडत महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ अन्वये कायदेशिर कारवाई करण्याची तंबी देत गाळ उपसा करतानाचे वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त करण्यात येईल , याची गांभीर्याने नोंद घेण्यात येईल, अशा स्वरुपाची नोटीस बजावत जलसाठ्यासाठी लोकसहभागातून काम करणार्या शेतकऱ्यांना नोटीस बजावत चांगल्या कामाचे कौतुक करण्याऐवजी एक प्रकारे दडपशाहीचे पत्र पाठविण्यात आले. पाटबंधारे विभागाच्या या कारवाईने बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकतेची वज्रमुठ बांधत आता पाटबंधारे विभागाला धडा शिकवणार असल्याचे घोषित केले आहे.