Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : नगरविकास योजनेतील 'या' रस्त्याचे काम निकृष्ट; ग्रामस्थांचा आरोप

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : राज्याच्या नगरविकास विभागाच्या एका विशिष्ट योजनेतून करण्यात आलेल्या कांचनवाडी नाथ व्हॅली स्कुल ते सातारा चोपडे वस्तीपर्यंत चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी काम अतिशय दर्जाहिन झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एकाच रात्रीत तयार झालेल्या या रस्त्याची अवकाळी पावसाने पोलखोल केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आता रस्ता दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाचे दार ठोठावले आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता कंत्राटदाराने खडीकरण मजबुतीकरण केल्यानंतर कारपेट न केल्याने त्यावर दंडात्मक कारवाई केली असल्याचा व नोटीस बजावण्यात आल्याचा खुलासा केला आहे. मात्र सदर काम पावसाळ्याआधी सुरू केले होते. खडीकरण व मजबुतीकरण झालेले आहे. पावसाळ्यात डांबरीकरण करता येत नाही. नंतर पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातल्याने कारपेट व सिलकोटचे काम बाकी असल्याचे कंत्राटदाराचे म्हणने आहे.‌ नगरविकास विभागातील एका विशिष्ट हेड खाली असलेल्या विशेष निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली या रस्त्याचे काम सुरू आहे.

सुमारे २० वर्षांनतर खड्डेमय असलेल्या या रस्त्याच्या कामास मोठ्या पाठपुराव्यानंतर काही महिन्यांपूर्वी काम सुरू करण्यात आले. हे काम करणारे कंत्राटदार असलेले रूद्रा कंन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत राजु वरकड यांनी रस्त्यावर खडीकरण करून डांबराचा अल्प वापर करुन एक लेअर पूर्ण केला. त्यानंतर पावसाळ्यात हे काम थांबवले. त्यात पावसाळ्यात तयार केलेल्या या रस्त्यावरील ठिकठिकाणी खडीकरण मजबुतीकरण उखडले जाऊन खड्डे पडले. त्यात अवकाळी पावसाने पुन्हा खंड्डयात भर टाकल्याने रस्ता होत्याचा नव्हता झाला आहे. दोन महिन्यांपासून या रस्त्याचे अपूर्णावस्थेत असलेले काम पुन्हा सुरू करणे गरजेचे असून, होत असलेल्या रस्ते कामांवर तातडीने बारीक कच वापरून डांबराचा योग्य वापर  करुन बारीक खडीचा थर देण्यात यावा , अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर अधिकार्यांनी कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. मात्र मध्येच अवकाळी पाऊस आल्याने जमिनीत ओलावा झाल्याने डांबरीकरण करण्यास कंत्राटदारापुढे अडचणी येत असल्याचे कंत्राटदार राजु वरकड यांनी दावा केला आहे. दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी एकाच रात्री कंत्राटदाराने काम केले , मग पुढील कामासाठी इतका विलंब का? , असा प्रश्न पडल्याने ग्रामस्थ व रस्त्यालगतच्या नागरिकांनी झालेल्या रस्त्याच्या अर्धवट डांबरीकरणाचे काम हाताने उकरले जात असल्याचे दाखवत निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केली.

सातारा गाव खंडोबा मंदिराला पैठणरोडपासून कांचनवाडी-सातारा-देवळाईला जोडणाऱ्या नाथव्हॅली ते सातारा खंडोबा मंदिर या रस्ते कामासाठी १ कोटी ६८ लाख ६४ हजार १८ रुपये मंजुर केले आहेत. छत्रपती संभाजीनगरातील रंगनाथराव बाबुराव वरकड यांच्या रुद्रा कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते.टेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी १.०४ इतक्या कमी टक्के दराने सहभाग नोंदवल्याने त्यांना या कामाचा ठेका देण्यात आला होता. या कामासाठी त्यांना १० मे २०२३ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. महापालिकेने याकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम सात महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. कंत्राटदाराने नाथव्हॅली ते सातारा रोड दरम्यान अंदाजपत्रकात डांबरी रस्त्याचा समावेश असताना या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून येथे सखल भागात पावसाचे पाणी साचत असल्याने १२५ मीटर लांबीचा सिमेंट रस्ता केला. पुढे नाथव्हॅली ते सातारा बटालियनपुलापर्यंत ३.२५ मीटर रूंदीकरण केले आहे. परंतु रस्त्यांचे कामे सुरू असतानाच पावसाळा लागला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर कंत्राटदाराने काम केले मात्र काम अर्धवट अवस्थेतच आहे.