Chhatrapati Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar : चंपाचौक ते महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत रस्त्याचे भिजत घोंगडे कायम

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर: शहरातील चंपाचौक ते महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी कैफियत 'टेंडरनामा'कडे असंख्य व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांनी मांडली. 

चंपाचौक - महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारती दरम्यान शाहबजार, चेलीपुरा, लोटाकारंजा, बुढ्ढीलेन हा रस्ता उत्तरेकडील व्हीआयपीरोडवरील गणेश काॅलनी, म्युनिसिपल काॅलनी, लेबर काॅलनी, किलेअर्क, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय, शासकीय महाविद्यालय, ज्युब्लीपार्क, हिमायत बाग, सलीम अली सरोवरसह अन्य शेकडो वसाहतींना जोडतो. या शिवाय दक्षिणेकडील गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज परिसरातील शहरातील जुन्या बाजारपेठांना देखील जोडतो. सिडकोतील जळगाव रोड ते बजरंग चौक - मौलाना आझाद चौक - रोशनगेट - चंपाचौक - शाहबजार- चेलीपुरा - लोटाकारंजा - बुढ्ढीलेन - महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत हा शहरातील सिडको आणि जुन्या शहराला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.

महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या अनेक बाजार पेठांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पार चाळणी झाली आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. परिणामी वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती केल्यास जालना रस्त्याची कोंडी फोडण्यास मोठी मदत मिळणार आहे. कारण शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी जालना रस्त्याच्या समांतर हा महत्वाचा रस्ता गणला जातो. मात्र या महत्वाच्या रस्ता दुरूस्ती कडे ना अधिकाऱ्यांचे, ना पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून या रस्त्याचे नशीब उजळणार अशा वल्गना करत दोन महिन्यांपूर्वी महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती. मात्र त्यानंतर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांना या रस्त्याचा विसर पडला.आता सद्यस्थितीत अवकाळी आणि पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होणार, हे माहित असूनही कारभाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. रस्त्यातील खड्डे आणि दगडगोट्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

स्मार्ट सिटीमार्फत शहरात १११ रस्त्यांसाठी ३१७ कोटी रुपये मंजूर केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नसल्याचे समोर आल्यावर तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांनी रस्त्यांची संख्या कमी केली. मात्र नंतर आलेले महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांनी रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी स्मार्ट शहर बसेवेसाठी राखीव ठेवलेल्या निधीची एफडी मोडून १५० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.‌ त्यात १११ पैकी ८० रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आल्याचा दावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी केला आहे. मात्र यातील एकही रस्ता धडाचा नसल्याचे व तांत्रिक दृष्ट्या चुकीचे काम असल्याचे टेंडरनामाने सातत्याने उघड केले.‌ मोठ्या पाठपुराव्यानंतर आयआयटीच्या तपासणीत देखील ते सिध्द झाले. मात्र मिंध्या प्रशासनाने कंत्राटदारावर कुठलीही कारवाई केली नाही.‌

जुन्या शहराला सिडको हडकोला जोडणारा चंपाचौक ते महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत या मार्गावर प्रचंड खड्डे आहेत. सदर रस्त्याचा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या यादीत समावेश असल्याचे म्हणत महानगरपालिका प्रशासनाने गत चार वर्षांपासून कसलीही डागडुजी केली नाही.‌ दोन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने याच मार्गावरील मंजुरपुरा ते रोशनगेट दरम्यान अतिक्रमणे काढली होती. १९९१ च्या शहर विकास आराखड्यानुसार हा रस्ता १८ मीटर अर्थात ६० फुटाचा दर्शविण्यात आला आहे. त्यानुसार या रस्त्यासाठी १४ कोटीहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात मंजुरपुरा ते चंपाचौक असे काम करण्यात येणार होते. मात्र ठरल्याप्रमाणे महानगरपालिकेने गत दोन महिन्यांपासून जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या स्थलांतरित केल्या नाहीत.‌ रस्त्याचे मोजमाप आणि अतिक्रमण काढताना या भागातील नागरीकांना आता खड्ड्यापासून सुटका मिळेल, या आशेवर मात्र पाणी फिरले. यासंदर्भात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांना विचारले असता जून महिन्यात काम सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. मात्र सरकारी धोरणानुसार पावसाळ्यात रस्त्यांचे खोदकाम करण्यास मनाई असते, पण अशा धोरणांना बगलेत ठेऊन हे काम सुरू केले तर खोदकाम दरम्यान रस्ता निसरडा होईल त्यात जवळपास सर्वच बाजारपेठांवर परिणाम होईल. यासाठी दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम आधीच केले असते, तर छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा मिळाला असता.