मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्ग ते टाकळी वैद्य रस्ता झाला सुसाट

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७५३ छत्रपती संभाजीनगर - जालना ते टाकळी वैद्य रस्ता सुसाट झाल्याने ग्रामस्थांची खड्ड्यातून सुटका झाली आहे. छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्गापासून टाकळी वैद्यपर्यंत  आता राज्यमार्ग रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण आणि दोन पुलांचे काम झाल्याने वाहने सुसाट धावू लागली आहेत. खड्डा मुक्त रस्त्यावरून चालताना ग्रामस्थांचे हाल दूर झाले आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने यंदा या रस्त्याचे काम हाती घेऊन आता हे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालक, शेतकरी, विद्यार्थींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्गापासून टाकळी वैद्य हे गाव ३२१० मीटरवर असून गावात भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. तसेच येथील शेतकऱ्यांचा दुधाचा देखील मोठा व्यवसाय आहे. याशिवाय गावापासून जवळच शेंद्रा औद्योगिक वसाहत आहे. येथील मुख्य दळणवळणाची व्यवस्था असलेल्या रस्त्याची मातीमोल अवस्था झाली होती.

त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्ग ते दुसऱ्या टोकाला सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध टाकळी वैद्य हे गाव आहे. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाना जोडणारा टाकळी वैद्य हा ३२०० मीटरचा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बागायती शेती असल्याने येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. शाळा, महाविद्यालया पासून सरकारी कामकाजासाठी सातत्याने येणे जाणे ग्रामस्थांचे असते. त्यामुळे या रस्त्यावर दिवस रात्र वर्दळ होती.

गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. ग्रामंस्थांकडून अनेकदा आंदोलने ही झाली. मात्र त्यावर यंत्रणेला काही जाग येत नसे.‌ अखेर ग्रामस्थांनी 'टेंडरनामा'कडे कैफियत मांडली. त्यावर वृत्तमालिका प्रसिद्ध करून ग्रामसडक योजनेकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री तथा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कार्यकारी अभियंत्यांनी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे टाकळी वैद्य या रस्त्याच्या कामासाठी रुंदीकरण व डांबरीकरणाचा प्रस्ताव तयार केला.

महाराष्ट्र सरकार ग्रामीण विकास मंत्रालयाने दोन कोटीचा निधी मंजूर केला. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी टेंडर काढण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील अमन कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले. या रस्त्याच्या कामावर १ कोटी ८८ लाख ७४ हजार इतका खर्च करण्यात आला. त्यातून २९३० मीटर डांबरीकरण व २८० मीटर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. यात दोन ठिकाणी पुलमोऱ्या बांधण्यात आल्या.

सध्या स्थितीत छत्रपती संभाजीनगर - जालना राष्ट्रीय महामार्ग ते टाकळी वैद्य पर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. काही वर्षे या परिसरातील नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत होता. यामुळे अनेक अपघातही झाले होते. मात्र, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता पी. जी. खेडेकर यांनी यंदा हा रस्ता दर्जेदार करण्याबाबत 'टेंडरनामा'ला आश्वासन दिले होते. त्यानुसार, या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम गेल्या दोन महिन्यापूर्वी हाती घेण्यात आले होते. सध्या, हे काम आटोपले आहे. आता रस्ता गुळगुळीत झाल्याने  वाहन चालकांना मार्ग सुसाट झाला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे दोन वाहनांना सहजासहजी प्रवास करू शकतात असा रस्ता तयार करण्यात आला आहे. डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.