Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : सुखना नदीवरील पूल बनला धोकादायक; 42 जणांचा बळी गेल्यानंतरही...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तालुक्यातील टाकळी शिंपी - टाकळी माळी - चितेपिंपळगाव - झाल्टा - सुंदरवाडी मार्गावरील सुखना नदीवरील पुलाची मुदत संपूनही जीवघेणी वाहतूक सुरू आहे. कठडे नसलेल्या पुलावर यापूर्वी अनेकांचा अपघाती मृत्यू झाला असून यापुढे किती जणांचा बळी घेतल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येईल, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे.

सुखना नदीपुलावर आसपासच्या शेतकऱ्यांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने पूल बांधला. त्यामुळे शेतमालाची वाहतूक होण्याबरोबरच सामान्य शेतकऱ्यांच्या शेतात येण्या-जाण्याचा प्रश्न देखील पुलामुळे मार्गी लागला. या पुलाला कठडे नसल्याने अनेक अपघातांमध्ये मागील दहा वर्षात ४२ लोकांचा  मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत.असे या भागातील शेतकऱ्यांनी "टेंडरनामा" प्रतिनिधीला सांगितले. सिमेंटचा हा पुल अत्यंत रूंद असून तीन फुटाची देखील रूंदी नाही. सध्या या पुलाला कठडे तर नाहीच शिवाय पुलाचे सिमेंट उखडून खड्डे पडल्याने शेतकऱ्यांनीच पदरमोड करून लोखंडी प्लेटा टाकलेल्या असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. विशेषतः झाल्यापासून काही अंतरात एका बाजुचा सिमेंट रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन वर्षांपूर्वी तयार केला. त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. दुसरीकडे चितेगाव - टाकळी शिंपी - सुखना नदी पुलापर्यंत दोन्ही बाजूचा रस्ता खड्डेमय झाला आहे.

परिसरात ऊस, डाळींब, मोसंबी व भाजीपाल्याचे क्षेत्र बर्‍यापैकी असल्याने वाहतूक केली जाते. परंतु, एका बाजूने रस्त्यावर खड्डे असून  सुखना नदीवरील धोकादायक जीवघेणा पुल पाहताच शेतकर्यांची धडकी भरते. पुलाखालून नदीचे पात्र खोलगट असल्याने व गावाच्या दिशेने मोठा तीव्र चढ असल्याने अवजड वाहतुकीला अडथळा येतो. तर टाकळी शिंपी ते चितेपिंपळगाव - आडगाव - निपानीच्या बाजुने रस्त्यावर चार किलोमीटर अंतरापर्यंत खड्डयांंचे साम्राज्य असल्याने वाहतूक धिम्म्या गतीने होते. विशेष म्हणजे सदर पुल कालबाह्य झाला असून याबाबत टाकळी शिंपी व टाकळी माळी येथील शेतकर्यांच्या वतीने ग्रामपंचायतीने, जिल्हापरिषद, बांधकाम विभाग, पंचायत समिती तसेच जिल्हा नियोजन समितीकडे पत्रव्यवहार करूनही काही उपयोग झाला नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात नदीला पुर येतो, असे असताना बांधकाम विभागाने वाहतुकीच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. संभाव्य अपघातांच्या घटना रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी केली आहे.