Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : वाहन अपघातात जीवघेणा ठरणारा 'हा' चौक का ठरतोय ब्लॅकस्पॉट?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या नावाने प्रचलित असलेल्या कॅम्ब्रीज चौक व आता शिंदे सरकारच्या काळात राजमाता जिजाऊ चौक असे नामकरण झालेला या चौकाने मागील दहा वर्षात चारशे लोकांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर व अनेक पादचाऱ्यांना व वाहनचालकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील हा सर्वात मोठा वाहन अपघातात ब्लॅक स्पॉट असल्याची चर्चा आहे. टेंडरनामा प्रतिनिधीने गुरूवारी येथील वाहतूक पोलिसांकडून माहिती मिळवली असता हा चौक का ब्लॅक स्पॉट आहे, याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, त्याचा हा खास ग्राऊंड रिपोर्ट.

छत्रपती संभाजीनगर-जालना राष्ट्रीय महामार्गावरील शहराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार असलेल्या या चौकाने शेकडो बळी घेतले आहे. अनेकांना कायमस्वरूपी अंथरूणात जायबंदी केले आहे. त्यामुळे  ठिकाण हे ब्लॅक स्पॉट असल्याचे म्हटले जात आहे. महामार्गावरील या ठिकाणी सातत्याने जीवघेणे अपघात होतात. या ठिकाणी अपघाताची काही विशिष्ट कारणे "टेंडरनामा " प्रतिनिधीने वाहतुक शाखेच्या अधिकाऱ्यांना विचारली असता, यामध्ये चिकलठाण्याकडून व जालन्याच्या दिशेने व सावंगीकडून झाल्टा फाट्याकडे जाताना रस्त्यावर तीव्र उतार व वाहन वळविण्यास मोठे वळण नाही, सरळ असणाऱ्या मार्गावर अचानकपणे वळण येत असल्याने अशा वेळी वाहन अपघात होत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यात जीवघेणे अपघात मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत.

एकाच ठिकाणी मागील तीन वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये १५ पेक्षा अधीक  व्यक्तींचा जीव गेला आहे.त्यामुळे हे ठिकाण 'ब्लॅक स्पॉट' असल्याचे म्हटले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघात टाळण्यासाठी याठिकाणी अपघात प्रवण ठिकाण असल्याचा इशारा देणारे फलक लावणे, सांकेतिक चिन्हांचे बोर्ड लावणे, वेग मर्यादा लागू करणे, दुभाजकाच्या कठड्याला काळे, पिवळे पट्टे मारणे चौकातील प्रमुख रस्त्यांच्या क्राॅसिंगवर पांढरे पट्टे मारणे व कॅट ऑइज (रेडियम दिवे व पट्टे) झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारणे, वाहतूक सिंग्नल यंत्रणा बसविण्यात यावी, आदी उपाय योजना आखल्या जाव्यात यासाठी महानगरपालिकेला शहर वाहतूक शाखेमार्फत वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याशिवाय, ब्लॅक स्पॉट असणाऱ्या या ठिकाणाजवळ रुग्णालयात अपघातातील जखमींवर उपचार होतील अशी रूग्णवाहिकेची व्यवस्था असणे अपेक्षित असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे. चौकात वाहतूक सिंग्नल नसल्याने वाहन चालक देखील वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. भर उन्हाळ्यात उन्हाचा मारा, पावसाळ्यात मुसळधार पावसाचा मारा आणि हिवाळ्यात थंडीचा मारा सहन करत कर्मचाऱ्यांना चौकात उघड्यावर उभे राहुन वाहन धारकांना हातवार्याने इशारे देत वाहतूक सुरळीत करावी लागते.

या ठिकाणी अनेकांचा बळी गेल्याने हा मोठा ब्लॅक स्पॉट असून चिकलठाण्याकडुन जालन्याच्या दिशेने रस्त्याच्या उतारावरून वाहने उतरताच वाहन वेगाने येतात. हा रस्ता उतरताना समोरंच सावंगी बायपासकडून झाल्टा फाट्याकडे जाताना रस्त्याच्या मधोमध क्राॅसिंग आहेत. त्यात जालना महामार्ग हा सहा लेन्सचा आणि सावंगी बायपास कडून येणारा रस्ता दोन लेन्सचा पुढे झाल्टा फाट्याकडून येणारा उतारावरील रस्ता चार लेन्सचा त्यामूळे चारही बाजूंनी अचानक सहा लेनमध्ये रूपांतर होतं आणि त्यावेळेस वाहनचालकांचा गोंधळ उडतो. त्यात वाहतुक सिंग्नल व रात्री दिव्यांची सोय नसल्याने वाहने धडकतात अशाच प्रकारे या ठिकाणी जीवघेणे अपघात झाले असून या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हा रस्ता बांधकाम विभागाच्या तीन विभागांकडे आहे. कॅम्ब्रीज चौक ते जालना व कॅम्ब्रीज चौक ते सावंगी बायपास. कॅम्ब्रीज चौक ते झाल्टा फाटा हा रस्ता जागतिक बॅंक प्रकल्प शाखेकडे आहे. मात्र कॅम्ब्रीज चौक या प्रमुख रस्त्यापासून तर चिकलठाणा विमानतळापर्यंत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. त्यामुळे या रस्त्याच्या व चौकाच्या समंस्यांबाबत तक्रारी कराव्या कोणाकडे, असा प्रश्न वाहतूक शाखेच्या अधिकार्यांना पडतो. सावंगी बायपास , झाल्टा बायपास व छत्रपती संभाजीनगर ते जालना येथे चार रस्ते एकत्र येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. तर सदरील रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तर काही अपघातामध्ये अनेक ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला आहे. या चौकात वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी गतीरोधक व सिग्नल बसविण्याची मागणी शहर वाहतूक शाखेच्या वतीने गत चार वर्षांपासून करण्यात आली आहे.यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. सदर प्रकरणी महानगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही . दुसरीकडे या चौकाचा मालक कोण याची स्पष्टता ही सार्वजनिक बांधकाम विभागातून केली जात नाही, असे म्हणत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी खेद व्यक्त केला आहे.